Monday, July 4, 2011

महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल म्हणजे कोण?


महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठल हे एक रहस्यच बनुन बसले होते. विष्णुच्या 24 अवतारांत आणि विष्णु सहस्त्रनामांतही न सापडणारा आणि तरीही एवढे माहात्म्य पावलेला देव कोणता? कोठुन आला? पुराणांतरीही त्याचे कोठे चरित्र का येत नाही? असे असंख्य प्रश्न घेवून संशोधकांनी श्री विट्ठलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. लोकदेव इटल-ब्रमल पासून ते विष्णू शब्दाच्या अपभ्रंशित रूपातही तो शोध घेतला गेला. खरे तर पांडुरंग, पुंडरिक, पंढरपुर आणि पौंड्रिक क्षेत्र या व्यक्ती/स्थलनामांतच श्री विट्ठलाचे मुळ चरित्र दडलेले आहे या्कडे दुर्दैवाने संशोधकांचे लक्ष गेले नाही. परंतु श्री विठ्ठल म्हणजे अन्य दुसरे कोणी नसुन पौंड्र या प्राचीन पशुपालक समाजातीलच एक महान शिवभक्त होता व त्यालाच आज आपण पांडुरंग विट्ठल म्हणुन पुजतो आहोत.भजतो आहोत, हे वास्तव अनेक पुराव्यांच्या प्रकाशात दिसते.

श्री विट्ठलाची सर्वमान्य उपाधी आहे ती म्हणजे पांडुरंग. पांडुरंग या शब्दाने कर्पुरगौर शिवाचा निर्देश होत असला तरी विट्ठल हा गौर नसून काळासावळा आहे, त्यामुळे ही उपाधी का, हे कोडेही संशोधकांना पडले होते. विठ्ठलाला आता विष्णु वा कृष्णाचे चरित्र बहाल केले गेले असले तरी ते त्याच्या मुळच्या शैव रुपाचे वैष्णव उन्नयन आहे असे मत माणिकराव धनपलवार व डा. रा.चिं.ढेरे यांनी सिद्ध केलेले आहे. तो गोपवेषातील रुसलेल्या रुक्मीणीची समजुत काढायला गोपवेषात आलेला कृष्णच आहे अशी संत-भक्तांची श्रद्धा आहे. ज्या पुंडरिकासाठी म्हणुन विट्ठलाचे आगमण झाले अशा कथा स्थलमाहात्म्यात येतात, त्या पुंडरिकाची म्हणुन जी समाधी आज आहे ते प्रत्यक्षात शिवालय आहे हेही डा. ढेरेंनी सिद्ध करुन दिले आहे. स्थलपुराणात पंढरपुरचा निर्देश पौन्ड्रिक क्षेत्र म्हणुन येतो. एवढेच नव्हे तर या स्थलपुराणांचे नाव "पांडुरग माहात्म्य" असे आहे, "विट्ठल माहात्म्य" नव्हे हेही येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

पौंड्रिक क्षेत्र म्हणुन पुरातन काळापासुन प्रसिद्ध असलेले हे स्थान. पुंडरिक हे शिवालय. पांडुरंग ही विट्ठलाची विशेष उपाधी आणि पंढरपुर हे स्थलनाम यावरुन मी शोध घेतला असता एक वेगळेच रहस्य उलगडले गेले, आणि ते असंख्य पुराव्यांवरून सिद्धही होते. "पांडुरंग" ही उपाधी नसून ते श्री विट्ठलाचे कुलनाम आहे आणि हे क्षेत्र त्याच्याच कुळाने स्थापन केले असल्याने त्याला पौंड्रिक क्षेत्र हे नाव लाभले, एवढेच नव्हे तर पंढरपुर या शब्दाची व्युत्पत्ती पंडरंगे वा पांडरंगपल्ली या कानडी नावात शोधण्याची गरज नसून ते पौंड्रिक...या शब्दातच दडली आहे.

पुंडरिक हा शब्द पौंड्रिक या शब्दाचे सुलभीकरण आहे हे उघड आहे. त्यामुळे मुळ "पौंड्र" कोण होते या प्रश्नाचा शोध घेणे आवश्यक होते. आणि पौंड्र या एकेकाळच्या पशुपालक, शुद्र समाजाचे मुळ सापडते ते इसपु. आठव्या शतकातील ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात. विश्वामित्राच्या 100 मुलांपैकी मधुच्छंदापेक्षा लहान पौंड्र, औंड्र, शबर, मुतीब ई. ५० मुलांनी विश्वामित्राने दिलेल्या शापामुळे दक्षीणेत येवुन राज्ये वसवली असे ऐतरेय ब्राह्मणावरुन दिसते.  विश्वामित्राच्या शापामुळे ते शूद्र झाले असेही ऐतरेय ब्राह्मण सांगते. महाभारतानुसार पौंड्र, औंड्रादि हे बळीराजाचे पुत्र होते व त्यांनी बंगाल, आंध्र, ओडिसा (आंध्र व ओडीसा ही औंड्र या शब्दांचे अपभ्रंश आहेत.) येथे सत्ता स्थापन केल्या. हे वैदिक परंपरेने शुद्र मानले गेलेले अवैदिक समाज असून मुळचे पशुपालक होत. पौंड्रांनी दक्षीण भारतातही आपल्या वसाहती केल्या याचे पुरावे आता स्पष्ट होत आहेत. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले होते.

पंढरपुर हे पौंड्रपुरचे ९अथवा पुंड्रपूरचे) सुलभीकरण आहे हे तर स्पष्टच आहे. दक्षीणेतील तिरुवारुर, चिदंबरम या शहरांची पर्यायनामे पुंड्रपुर अशी आहेत. महत्वाची बाब म्हणजे  या शहरांत विठ्ठल मंदिरेही आहेत. बंगालमधील पौंड्रांनी तेथील पुंड्रपुर नावाच्या शहरातुनच  राज्यकारभार चालवला होता असे ह्यु-एन-त्संगने नोंदुन ठेवले आहे व महास्थानगढ येथे या नगराचे आता अवशेषही सापडले आहेत. महाभारतात विदर्भाबरोबरच पांडुराष्ट्राचाही उल्लेख आहे. हे पांडुराष्ट्र पौंड्रांशी निगडीत असणार. पौंड्र समाजाने सर्वप्रथम दक्षीण भारतात वसाहती केल्या हे यावरुन सिद्ध होते आणि हा काळ औंड्रांच्या (आंध्र सातवाहनांच्याही) पुर्वीचा, म्हनजे किमान इसपु पाचव्या शतकापुर्वीचा असावा. म्हणजे महाराष्ट्रातील, पंढरपुर (मूळ पौंड्रपुर वा पुंड्रपूर) ही प्राचीन काळातील पौंड्रांची राजधानी होती हे यावरुन स्पष्ट होईल व या क्षेत्राला पौंड्रिक क्षेत्र का म्हटले गेले असावे हे आता सहज लक्षात येईल. पौंड्रांच्या स्वामित्वाखालील प्रदेश ते पौंड्रिकक्षेत्र आणि ही पुरातन आठवण स्थलमाहात्म्यांनी स्पष्टपणे जपलेली आहे.

श्री विट्ठलाची विशेष उपाधी आहे...पांडुरंग. या शब्दाने विद्वानांना चकवा दिला होता. पांडुरंग हे नाव मुळात विट्ठलाची शिव-निदर्शक उपाधी आहे असाच समज जोपासला गेला असला तरी ते तसे नसून ते त्याचे कुळनाम आहे, हे आता स्पष्ट आहे.. महाभारतात पौंड्रवंशीय वासुदेव म्हणुन राजा होता. तो "पौंड्रंक वासुदेव" या नावाने ओळखला जात होता. तो कृष्णाचा प्रतिस्पर्धी असून त्याला पुढे कृष्णाने ठार मारले. म्हणजे पौंड्रवंशीय राजे स्वत:ला "पौंड्रंक" अशी उपाधी लावत होते हे यावरुन स्पष्ट होते. "पौंड्रंक" या शब्दाचे मराठी सुलभीकरण म्हणजे "पांडुरंग" होय. "पौंड्रंक" विट्ठलाचेच पुढे "पांडुरंग विट्ठल" असे सुलभ रूप बनले, कारण तोही पौंड्रवंशीय होता.

याचा साधा सरळ अर्थ असा कि पौंड्र समाजातील, जे पशुपालक, धनगर, कुरुब होते, त्या समाजातील विट्ठल नामक आद्य वसाहतकार वा शिवभक्त सम्राटाची पशुपालक वेशातील ही मुर्ती आहे. तो स्वता: विष्णुही नाही कि कृष्णही नाही, पण त्याचे हे गोपध्यान पाहून यादव काळात विट्ठलाचे वैष्णवीकरण करतांना त्याचे गोपवेषधारी कृष्णाशी तादात्म्य साधले गेले असे स्पष्ट होते. (प्रत्यक्षात पौंड्रवंशीयांचे कृष्णाच्या यदूवंशाशी हाडवैर होते. महाभारत युद्धात पौंड्र हे दुर्योधनाच्या बाजुने लढले हे मी वर लिहिलेच आहे.) मुळच्या अवैदिक पण देवतास्वरुप मानल्या गेलेल्या शुद्रवंशीयाचे हे वैदिकीकरण अक्षरश: स्तीमित करणारे आहे. असे असले तरी पांडुरंगाचे मुळ अवैदिक स्वरुप त्यांना बदलता आले नाही म्हणुन आपण आज सत्यापर्यंत पोहोचु तरी शकतो.

पौंड्र, औंड्रादि मंडळी हे शिवभक्त होते. आंध्रात असंख्य शिवमंदिरे आहेतच. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही कारण येथील मुळ वसाहतकार पौंड्रच होते. पौंड्र राजांनी आपली राजधानी पंढरपुर (पौंड्रपुर) येथे शिवालय स्थापन करणे स्वाभाविकच होते. या मंदिराला पुंड्रिकेश/ पुंडरिक असे संबोधले जाते. पौंड्रांचे जे आराध्य तो पुंड्रिकेश/पौंड्रिकेश म्हणुनच संबोधला जाणार हे उघड आहे, आणि तो तसा केला गेलेलाही आहे. भक्त पुंडरिकाची कथा कोणाही विद्वानाने मान्य केलेली नाही. विट्ठलाच्या पंढरपुरातील प्रकटीकरणाच्या ज्या वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात त्या एकमेकांशी विसंगत आहेत. त्र्यंबकेश्वरचे लघुरुप त्र्यंबक जसे होते तसेच पौंड्रिकेशाचे संक्षिप्तीकरण पुंडरिक झाले हे स्पष्ट आहे. ते नाम कधीही "विट्ठलेश्वर" नव्हते, याचा दुसरा अर्थ असा कि तो शिव केवळ "विट्ठल" या व्यक्तीचा इष्ट देव नव्हता तर त्याच्या संपुर्ण पौंड्र समाजाचा अधिदेव होता. स्वत: श्री विट्ठलही अनन्य शिवभक्त असून त्याच्या माथ्यावर शिवलिंग आहे अशी संतांची श्रद्धा आहे, हेही येथे उल्लेखनीय आहे.

विट्ठल या नावाच्या व्युत्पत्तीबद्दल विद्वानांनी अनेक तर्क केले आहेत. बिट्टीदेव या राजाच्या नावापासुन वा इटल-ब्रमल या जोडदेवतांतुन इटल-विट्ठल नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. पण आठव्या शतकातील राष्ट्रकुट राजांच्या कारकिर्दीत पंढरपुरच्या एका "जयद्विठ्ठ" नामक ब्राह्मणाला जमीन दान केल्याचा ताम्रपट उपलब्ध आहे. म्हनजे तोवर विठ्ठ-विट्ठल हे सामान्य नाम बनावे एवढी त्या नामाची प्रसिद्धी आठव्या शतकापर्यंत झालेलीच होती. म्हनजे विट्ठल हा त्याहीपेक्षा पुरातन असुन दैवत प्रतिष्ठा प्राप्त करून बसला होता. इटल-ब्रमल हे नंतर कधीतरी त्याच पशुपालक समुदायातुन आलेले वीरदेव असावेत. पंढरपुरच्या विट्ठलाशी त्याचा संबंध दिसत नाही, कारण विठ्ठल पुरातन आहे. विट्ठलमुर्ती अनादि आहे अशी संतांची श्रद्धा आहे, आणि ही पुरानता पहाता ती योग्यही आहे. विट्ठल नावाची व्युत्पत्ती अन्यत्र शोधण्यापेक्षा ते आहे तसेच व्यक्तिनाम म्हणुन स्वीकारावे लागते. (हे नाव विष्णुच्या 24 अवतारांतही नाही वा विष्णु सहस्त्रनामातही नाही हेही येथे लक्षात घ्यावे लागते. किंबहुना अन्यत्र कोठेही हे नाव सापडत नाही, पण जेथे जेथे पौंड्रांच्या राजधान्या होत्या तेथे मात्र विट्ठलाच्या मुर्ती मिळालेल्या आहेत. यावरुन विट्ठल या पुराणपुरुषाची महत्ता सिद्ध होते.)

थोडक्यात पौंड्र या महाराष्ट्रातील आद्य पशुपालक समाजाने जी राजधानी केली ती पौंड्रपुर (पुंड्रपूर) तथा आजचे पंढरपुर. या पौंड्रांचा, जे अवैदिक असल्याने पुराणांतरीही शुद्र मानले गेले, त्या पशुपालक/धनगर/कुरुबांचा सम्राट वा कोणी महान शिवभक्त विट्ठल हा पौंड्रंक (पांडुरंग) विट्ठल. या पौंड्रांचे आराध्य शिवाचे मंदिर ते पौंड्रिकेश तथा पुंडरिक. त्यामुळे पुंडरिक हे शिवालयच पंढरपुरचे मुख्य स्थान असून 11 व्या शतकापर्यंत उघड्यावर असलेली विट्ठलाची मुर्ती हे दुय्यम स्थान होते हे आता लक्षात येईल. शके 1111 च्या लेखात विट्ठलदेव नायक या देवगिरीच्या पंढरपुरच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले असे नोंदले आहे. पुंडरिकेश शिवाचे मंदिर त्यापेक्षा पुरातन आहे हे स्पष्ट आहे. आपल्या विस्म्रुतीत गेलेल्या महानायकाची पुजा तत्पुर्वीही उघड्यावर होतच होती. त्याच्या मुर्तीसाठी मंदिर बनवणारा सुद्धा विट्ठलदेवच होता, हेही येथे उल्लेखनीय आहे. दिवंगत महापुरुषांच्या मुर्ती/प्रतिमा बनवण्याची प्रथा औंड्र सातवाहनांनीही पाळली असे दिसते. (नाणेघाटचे प्रतिमाग्रुह) विठ्ठलमंदिर मुळचे बौद्धधर्मीय स्थान असावे असे मानण्याचा एक प्रघात आहे. प्रत्यक्षात सन ११८९ पर्यंत मुळात विठ्ठलाचे मंदिरही अस्तित्वात नव्हते, त्यामुळे या तर्कात काहीही अर्थ नाही. भगवान बुद्धाचेही वैदिकीकरण करण्याच्या नादात त्यांनाही विष्णुचा अवतार घोषित केल्याने आणि श्री विठ्ठल विष्णुचेच रूप आहे अशी मान्यता पसरल्याने विठ्ठल ह बुद्धरुपातही पाहिला जाणे स्वाभाविक होते, एवढेच!

थोडक्यात विट्ठलाला वैष्णव मानने व विट्ठलाला विष्णू/कृष्णरुपी मानने हे अनैतिहासिक आहे हे यावरुन सिद्ध होते. तो पशुपालक समाजाचा पौंड्रवंशीय श्रेष्ठ पुरुष होता आणि महान शिवभक्त होता हेच काय ते सत्य आहे. परंतु विट्ठलाचे वैदिकीकरण/वैष्णवीकरण करण्याच्या नादात ज्या भाकडकथा निर्माण केल्या गेल्या त्यामुळे मुळ सत्यावर जळमटे पडली होती...पण आता तरी नवीन दृष्टीकोनातुन त्याकडे पहावे.

(या विषयावर माझे "विठ्ठलाचा नवा शोध" हे पुस्तक सुगावा प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले आहे.)

72 comments:

  1. मूर्तिपूजा ही मुळांत हिंदू धर्मातील पितृपूजक संप्रदायाची देणगी आहे. तेव्हा विठ्ठल ही शिवपूर्व देवता असणे शक्य आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. शरयू - माझ्या अंदाजानुसार मूर्तीपूजा हि आजच्या हिंदू समाजाने तत्कालीन बौधा धर्मापासून घेतली असावी,. कारण हिंदू धर्म ज्या गोष्टीवर उभा आहे त्या वेदात कुठेच मूर्तीपूजेला स्थान नाही. सिंधी संस्कृतीत आणि आदिवासी संस्कृतीमध्ये ती होती पण त्याला एवढे मोठे स्थान पारपत झाले नवते. बुद्धाचेच रुपांतर विष्णू मध्ये झाले ह्याला खूप पुरावे आहेत. बुद्ध विष्णूचा अवतार म्हणण्या पेक्ष्या बुद्धानेच विष्णूला जन्म दिला असे मी म्हणेन. कारण वेदकालीन ब्राह्मण हे गोमास भक्ष्य होते आणि यज्ञ करणारे होते.

      Delete
  2. Thanks for this curious & precious information...
    नाहीतर अशी माहिती सहजासहजी वाचायला मिळणे अशक्यच.

    ReplyDelete
  3. APRATIM.SADHAR VIVECHAN.SAMARPAK YUKTIVAD.AJVARCHYA SARVACH SANSHODHANALA NAVI DISHA DENARI ABHINAV MANDANI.

    ReplyDelete
  4. शरयू - माझ्या अंदाजानुसार मूर्तीपूजा हि आजच्या हिंदू समाजाने तत्कालीन बौधा धर्मापासून घेतली असावी,. कारण हिंदू धर्म ज्या गोष्टीवर उभा आहे त्या वेदात कुठेच मूर्तीपूजेला स्थान नाही. सिंधी संस्कृतीत आणि आदिवासी संस्कृतीमध्ये ती होती पण त्याला एवढे मोठे स्थान पारपत झाले नवते. बुद्धाचेच रुपांतर विष्णू मध्ये झाले ह्याला खूप पुरावे आहेत. बुद्ध विष्णूचा अवतार म्हणण्या पेक्ष्या विश्नुनेच बुद्धाला जन्म दिला असे मी म्हणेन. कारण वेदकालीन ब्राह्मण हे गोमास भक्ष्य होते आणि यज्ञ करणारे होते.

    ReplyDelete
  5. वरच्या पोस्त मध्ये मला - बुद्धानेच विष्णूला जन्म दिला आहे असे म्हणायचे होते - चूकभूल माफ

    ReplyDelete
    Replies
    1. शरयू - माझ्या अंदाजानुसार मूर्तीपूजा हि आजच्या हिंदू समाजाने तत्कालीन बौद्ध धर्मापासून घेतली असावी, कारण हिंदू धर्म ज्या गोष्टीवर उभा आहे त्या वेदात कुठेच मूर्तीपूजेला स्थान नाही. सिंधी संस्कृतीत आणि आदिवासी संस्कृतीमध्ये ती होती पण त्याला एवढे मोठे स्थान प्राप्त झालेले नव्हते. बुद्धाचेच रुपांतर विष्णू मध्ये झाले ह्याला खूप पुरावे आहेत. बुद्ध विष्णूचा अवतार म्हणण्या पेक्षा बुद्धानेच विष्णूला जन्म दिला असे मी म्हणेन. कारण वेदकालीन ब्राह्मण हे गोमास भक्ष्यक होते आणि यज्ञ करणारे होते.

      Delete
    2. मूर्तीपूजा हि हिंदूंतून बौद्ध धर्मात आलेली आहे।।। हो बाळ

      Delete
    3. Read Book 'Devalancha dharm ani dharmachi devale, Prabodhankar K S Thakarey

      LINK: http://prabodhankar.org/node/260

      Delete
  6. आपला हा लेख फारच सुंदर आहे.वाचनीय आणि संग्राह्य आहे.
    त्यावर श्री,रा,चिं.ढेरे साहेबांच्या " विठ्ठल ;एक महासमन्वय " याची छाप आहे असे भासले.
    मला अजुन एक सुचवावेसे वाटते ,
    मी पूर्वी असे वाचले होते की शैव आणि वैष्णव यांनी पण एकमेकांच्या मंदिरांची नासधूस केली आहे.
    उभे आणि आडवे गंध लावण्यामुळे बरेच तंटे झाले आहेत.
    मी असे पण ऐकले आहे की हा पांडुरंग म्हणजे जैन दैवत आहे.हिंदू नव्हे .
    आपण आता जे मानतो की अमुक नासधूस मुस्लिमानी केली त्याऐवजी असेपण असू शकेल का की ती आधीच हिंदुनीच आपापसात केली असावी.
    इरावती कर्वे यांनी त्यांच्या युगांत या पुस्तकात वासुदेव हे विशेषण आणि वासुदेव हे एक पद मानून उहापोह केला आहे .त्याचाच धागा पकडून आपण काही लिहिले तर ते वाचायला आनंद होईल.खात्री आहे की ते वाचनीय असेल.
    मनःपूर्वक धन्यवाद.

    ReplyDelete
  7. WHAT ABOUT SANT TUKARAM,DNYNANESHWAR,GORAKUMBHAR

    ReplyDelete
  8. संजयजी खालील मुद्दे सुद्धा विचार करावयास लावणारे आहेत!

    ‘पंढरीचा विठोबा , पंढरी महात्म्य वाचा . त्यात किती तथ्यांश आहेः यांचे वर्णन करा . देवस्थानापासून लोकांच्या जीवांची , द्रव्यांची व उद्यागांची किती हानी होत आहे याची कल्पना करा . विठोबा हा बौद्धावतार मानीला आहे . विठोबाचे मंदिर बौद्ध लोकांनी बांधलेले आहे . त्यात बुद्धाची मूर्ती स्थापित केलेली होती . जेंव्हा बौद्ध धर्मानुयाई लोकांचा मोड झाला ; तेंव्हा आर्य धर्म संथापाकानी ते देवूळ बळकावून त्या मूर्तीला विठोबा नाव दिले ’. (पहा “सार्वजनिक सत्यधर्म ”, जोतीराव फुले , प्रस्थावना : डॉक्टर . विश्राम रामजी घोले )

    संतवचने :
    संत नामदेव : मद्धे झाले मौन देव निजे ध्यानी I बौद्ध ते म्हणोनी नावेरूप I (२१०५ )
    संत तुकाराम : बौद्ध अवतार माझिया अत्ताष्ठ I मौन्य मुखे निष्ठा धरियेली I
    संत एकनाथ : नववा बैसे स्थिररूप I तया नाम बौद्धरूप I संत तया दारी I तिष्ठताति निरंतरी I (अभंग २५६० )
    बौद्ध अवतार होवून I विटे समचरण ठेवून पुंडरीक दिवटा पाहून I तयाचे द्वारी गोंधळ मांडीला I बया दार लाव I बौद्धई i बया दार लाव I (३९११ )
    बोधुनी सकळही लोक I बोधे नेले विविध तपावो I बौद्धरूपे नांदसी I बोलेविना बोलणे एक वो I साधक बाधक जेथे एकपणेची बोधविसी वो I उदो म्हणा उदो I बोधाई माऊलीचा हो I (३९२० , साखरेकृत सकाळसंतगाथेतील एकनाथांच्या ओव्या )
    लोक देखोनी उन्मत्त I दारांनी आसक्त I न बोले बौद्धरूप I ठेविले जघनी हात II........धर्म लोपला I अधर्म जाहला I हे तू न पाहसी I या लागे बौद्धरूपे पंढरी नांदसी II

    संत जनाबाई : होवूनिया कृष्ण कंस वधियेला I आता बुद्ध झाला सखा माझा I (३४४ )
    गोकुळ अवतारू I सोळा सहस्त्रांवरू I आपण योगेश्वरू I बौद्धरूपी I (१०५३ )
    व्रतभंगासाठी बौद्ध अवतार I झाला दिगंबर अवनीये I (१०९६ ) ऐसा कष्ठी होऊनी बौद्ध राहिलासी I (१०९८ )
    महिपतीबुवा ताहाराबादकर: आणि कलियुगी प्रत्यक्ष पाषाणरूपी I बौद्धरूपे असता श्रीपती I जनांसी दाखवुनी नाना प्रचीती I वाढविली कीर्ती संतांची I (भक्तविजय -५७ -९० )
    कालीयुगामाजे साचार I असत्य भाषण फार झाले I यास्तव बौद्ध अवतार I देवे सत्वर घेतला I (संतविजय अध्याय १० )

    संजय सोनवणी : याचा विचार कराल काय?

    विवेक पाटिल.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर

      Delete
  9. होय पंढरपूरचा विठ्ठल हा बुद्धच :

    कवी जयदेव हा बाराव्या शतकात झाला. त्याने पुराणांच्या आधारावर नववा अवतार म्हणून बुद्धाचे गुणगान केले. मराठी संतांनी आपले आराध्यदैवत विठ्ठल यालाच बुद्ध मानले आहे. संत एकनाथ बुद्धालाच विठ्ठल मानताना म्हणतात, ’लोकांना उन्मत व धन-दारात आसक्त पाहून हे विठ्ठला, तू बुद्धरूप धारण करून, कमरेवर हात ठेवून, बौद्धावतार घेऊन विटेवर उभा आहेस’
    याच संदर्भात ‘पद्मपुरणाच्या ’ उत्तर खंडात दिलेली विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती लक्षात घेतली पाहिजे. त्यातील पाचव्या अद्ध्यायाचा विसावा श्लोक असा :
    विदा ज्ञानेन ठाण शून्यान लाति गृन्हानि या स्वयम I
    तस्मात विठ्ठल मी नामत्वं ध्यायस्व मुनीश्वर II
    विदा म्हणजे ज्ञानाने; ठाण म्हणजे अडाणी लोकांना, पतितांना, अपराध्यांना, लाति म्हणजे जवळ करतो. जो पतित लोकांना ज्ञान देवून जवळ करतो तो विठ्ठल (संत, पंत आणि तंत, माटे). भारतीय अध्यात्मिक साधनेच्या इतिहासात पतितांना ज्ञान देवून जवळ करणारा बुद्धाशिवाय दुसरा कोण महापुरुष झाला बरे? यातून बुद्धाचाच बोध होतो असे म्हणणे अत्युक्त वाटू नये. आणि संत जेव्हा बुद्धाला विठ्ठलच म्हणतात, तेंव्हा या संदर्भात विठ्ठल शब्दाचा उपरोक्त व्युत्पत्तीला खास अर्थ आहे हे नाकारता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट अशी कि, बुद्धाने पंचवर्णीय भिक्षुंना आषाढी पौर्णिमेला प्रथामोपादेश केला. ह्या पौर्णिमेला गुरु पोर्णिमा म्हणतात (भागवत : सिद्धपुरुष व त्यांचा संप्रदाय , चिपळूणकर). आणि पंढरपूरला आषाढी पौर्णिमेलाच यात्रा भरते. या दृष्ठीकोनातून पंढरपुरचे विठ्ठल, पितांबर आणि गुरु-महात्म्य हे बौद्ध परंपरा व इतिहासाशी जुळत असल्याचे बौद्ध प्रभावाचेच द्योतक आहे, हे लक्ष्यात घेतले पाहिजे. अशा प्रकारे महायान धर्मातीलच न्हवे तर मूळ बौद्ध धर्मातील अनेक तत्वांचा आणि बौद्ध विहार व मूर्तींचा शैव व वैष्णव संप्रदायात समावेश करण्यात आला. पंढरपूर व तेथील विठ्ठल हे बौद्धधाम व बुद्धरूप असल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अ रा कुलकर्णी यांचीमते सर्वश्रुतच आहेत. खुद्द संत नामदेव आणि एकनाथ विठ्ठलाला बुद्धच मानतात .

    अरुण सावंत

    ReplyDelete
    Replies
    1. शास्त्र-पुराणांमध्ये विठठलाला बौध्य वा बोधराज म्हटले आहे. गरुड पुराणामध्ये वर्णन केल्याप्रमाणे बौध्य हा विशाल भाल असलेला, तेजस्वी नेत्रांचा, मौन धारण केलेला, कटि-कर ठेवून उभा असा आहे. हे वर्णन पूर्णपणे विठ्ठ्लाला लागू पडते. - wikipedia # विठ्ठल #

      Delete
  10. चित्र आणि शिल्प या माध्यमातून विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा प्रकट होते. दीर्घकालपर्यंत पंचांगांच्या मुखपृष्ठावर दशावताराची चित्रे छापत. या चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी विठ्ठलाचे चित्र छापलेले असते. या चित्रावर बुद्ध असे नावही आढळते.

    दशावतारात बुद्धाच्या जागी विठ्ठल असलेली दोन शिल्पे आढळतात १. तासगाव येथे गणेशमंदिराच्या गोपुरावर आढळते. २. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्राकारातील एका ओवरीत आढळते.

    विठ्ठलाच्या बौद्धात्वाचे पुरावे :
    १. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात दगडी खांबावर ध्यानस्त बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात.
    २.विठ्ठलाचा इतिहास कोठेच दिसत नाही. रामाचा रामायणात, कृष्णाचा भागवत पुराणात किंवा महाभारतात; मग विठ्ठलाचा इतिहास का आढळत नाही?
    ३.विठ्ठल मूर्ती एकटीच का? शेजारी कोणीच स्त्री नसून तो एकटाच विटेवर उभा आहे. रुक्मिणी (?) विठ्ठलाच्या शेजारी नसून दुसऱ्याच मंदिरात आहे. संन्याशाचे (श्रमण) स्त्री असणे असंभवनीय होय. विठ्ठल हा एकटाच असल्याने बुद्ध असणे संभवनीय आहे.
    ४.विठ्ठलाचा हात कमरेवर , हातात शस्त्र नाही.
    ५.मूर्तीचे सूक्ष्म अवलोकन केले तर तीत बुद्धत्वाच्या खुणा दिसतात. विठ्ठलाचे कान सुद्धा बुद्धासारखे लांब दिसतात. विठ्ठल पितांबरधारी आहे. बौद्ध श्रामाणांची वस्त्रे ‘पीत’ असतात.
    ६.वारकरी (मूळ शब्द्द वारीकारी) ह्या संप्रदायात प्रवेश करतो तेंव्हा त्याला (तुळशीची माळ घालताना) शपथ घ्यावी लागते. हि शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील (सदाचाराचे पाच नियम) होय. १) मी प्राण्याची हिंसा करणार नाही. २) मी चोरी करणार नाही. ३) मी व्यभिचार करणार नाही. ४) मी खोटे बोलणार नाही आणि ५) मी अपेयपान करणार नाही, हे ते पाच नियम होत.

    पंढरीच्या वारीला निदान पंढरपुरापुरते स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून एकत्र गोळा होतात. चातुर्मासात वारी हे वैदिक संप्रदायाप्रमाणे अयोग्य होय. बुद्ध हा जातिभेदा विरुद्ध होता. जातीव्यवस्ता व अस्पृश्यताविरोध हे बौद्धधर्माचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

    पंढरपूरचा विठ्ठल बुद्धच आहे, अशी महाराष्ट्रात परंपरा आहे. विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती पुढीलप्रमाणे होय. विट + ठल. विट हा मराठी तर ठल हा पाली शब्द्द आहे. ठल या पाली शब्दाचा अर्थ स्थळ असा आहे. विट आहे स्थळ ज्याचे तो विठ्ठल. सम्राट अशोकाने बुद्धाची ८४ हजार देवळे बांधली, त्यापैकी हे एक मंदिर असावे. सुप्रशिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या “ Memoir of the Cave Temple” या ग्रंथात हे मंदिर बुद्ध मंदिर असल्याचे म्हटले आहे (धर्मपद, अ रा कुलकर्णी या ग्रंथाचे परिशिष्ठ पाहावे). म्हणजेच पंढरपूरचा विठ्ठल हा शैव वा वैष्णव आहे असे म्हणणे चुकीचे ठरणारे आहे.

    अलोक चोपडे

    ReplyDelete
  11. मुस्लिमांनी अनेक हिन्दू मंदिरे पाडून त्याजागी मशीदी बांधल्या असा हिंदुत्ववाद्यांचा उर्फ वैदिकांचा एक लाडका सिद्धांत आहे. बाबरी मशिदीच्या जागी आधी राम मंदिर होते, व बाबराने ते पाडून तिथे बाबरी मशीद बांधली असेही हे लोक छातीठोक पणे सांगत असतात.
    भारतात आपण कोणत्याही ठिकाणी उभे राहिलात आणि ५० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पाहिलेत, तर तुम्हाला सगळ्यात जूने अवशेष हे बौद्धांचेच दिसतील. महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या किल्ल्यांवर बौद्ध लेणी दिसतात. खुद्द पुणे जिल्ह्यातच कार्ले, भाजे, जुन्नर, लेण्याद्री या ठिकाणी तुम्हाला प्राचीन बौद्ध लेणी दिसतील. याउलट हिंदूंची जी कांही 'जूनी' धार्मिक ठिकाणे आहेत, ती फार नंतरची आहेत, आणि तीही बौद्धान्च्या लेण्यात घूसखोरी करून बनवण्यात आली आहेत. याची कांही उदाहरणे म्हणजे खुद्द पुण्यातील पातालेश्वर लेणी, कार्ल्याची एकवीरा देवी आणि लेन्याद्रीचा गणपती ही आहेत. अगदी अशीच स्थिती महाराष्ट्रभर आणि देशभर आहे.
    पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर मूळ बौद्ध मंदिर असावे याचे अनेक पुरावे आहेत.
    बौद्ध गयेचे प्रसिद्द मंदिर बौद्धांचे असुनही आज देखील ब्राम्हणांच्या ताब्यात आहे व ते त्यावरील आपला ताबा सोडायला तयार नाहीत.
    बाबरी मशीद येथे अगोदर राम मंदिर होते याचे पुरावे हिंदुत्ववादी देवू शकले नाहीत. भाजप सरकारने कोर्टात जे पुरावे दिले ते तेथे बौद्ध मंदिर होते याचे दिले! पुढे तेथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले, बौद्ध मंदिरांचे रूपान्तर हिन्दू मंदिरांत कसे झाले याच्या सुरस कथा आपल्याला शिवलीलामृत या पोथीत वाचायला मिळतील.
    पांडव लेणी हा शब्द आपण ब-याचदा ऐकला-वाचला असेल. कांही पांडव लेणी आपण स्वत: बघितलीही असतील. ही पांडव लेणी पांडवांनी एका रात्रीत बनवली अशी एक भाकड कथा सांगितली जाते. त्या भाकडकथेचा अर्थ एवढाच की कोणीतरी एक रात्रीत त्या मूळच्या बौद्ध लेण्यात घुसखोरी करून ती आपल्या ताब्यात घेतली, आणि तिथे आपले देव बसवले.

    ReplyDelete
    Replies
    1. तुम्ही कुपमनडुक वृत्तीप्रमाणे फार थोडी उदाहरण देऊन नसलेली गोष्ट सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात. जरा दक्षिण भारतात बघा, केरळ, तामिळनाडू ई. मध्ये कुठे दिसतात हो बौद्ध वास्तू मोठ्या प्रमाणात? तिथे तर 2000 वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत जी इतिहासाने मेनी केली आहेत

      Delete
    2. चुप, खोटारड्या!

      Delete
  12. पंढरीचा पांडुरंग भगवान बुद्धच!
    -विशू काकडे

    पंढरीचा पांडुरंग हा प्रत्येकाला आपला वाटत आला आहे. मग याच मातीतले संस्कार पचवणारे बौद्धधर्मीय त्याला अपवाद कसे असणार. पंढरपूर हे बौद्ध तीर्थक्षेत्र असल्याचे दावे ऐतिहासिक संदर्भ आणि खुद्द संतकवींच्या रचना यांच्या आधारे नेहमीच केले जात आहेत.
    ...............................

    गेली अडीच हजार वर्षे भगवान बुद्ध आपणा भारतीयांचा मार्गदर्शक राहीला आहे. त्याच्या प्रभावापासून त्याच्या कडव्या विरोधकांनाही कधी मुक्त होता आले नाही. बुद्धाची तात्त्विक उसनवारी करीतच त्यांना आपला प्रपंच प्रतिष्ठित करावा लागला. इतकंच नव्हे तर भगवान विष्णूच्या दशावतारांचा इमलाही त्यांना बौद्ध सिद्धांताच्या पायावरच उभारावा लागला. त्यांनी बुद्धाला विष्णुचा अवतार मानले आणि त्यांनीच बुद्धाला शिव्याशापही दिले. इतिहासात इतिहासात बुद्धासंतांवर शस्त्र-शास्त्रांच्या माध्यमातून अनेकदा आक्रमणं झाली. पण ती सर्व आक्रमण पचवून बुद्ध जगभर पसरला. भारताला गौरवांकित केले. बुद्धाच्या हयातीतच महाराष्ट्रात बुद्ध धर्माचे आगमन झाले होते. त्यानंतर पंधरा-सोळाशे वर्षे तो इथे बहरत होता. त्याच्या तात्कालीन वैभवाच्या शिल्पखुणा महाराष्ट्रातील प्रत्येक पर्वतराजी उरीपोटी बाळगून आहे. बौद्ध धर्माच्या इतिहासात महाराष्ट्राची कामगिरी अत्यंत भूषणास्पद आहे. सांप्रत भारतात जवळपास १२०० बौद्धलेणी आहेत. त्यातील ७०० पेक्षा जास्त लेणी एकट्या महाराष्ट्रात आहेत. काही लेण्यांवर बौद्धेतर कब्जा करुन बसले आहेत तर काही बौद्ध विहारांचे मंदिरात रुपांतर करण्यात आले आहे. पंढरपूरचे विठोबाचे मंदिर हे त्याचे एक उदाहरण आहे.

    इसवी सनाच्या आठव्या शतकातील पुराणींनी बुद्धाला विष्णूच्या दशावतारात स्थान दिले. महाबलीपूरम येथील एका शिलालेखात बुद्ध विष्णूचा नववा अवतार असल्याचे लिहिलेले आहे. हा शिलालेख आठव्या शतकातील आहे. वेरुळ येथील दशावतरांची लेणीही आटव्याच शतकातील आहे. आर. सी हाजरा विष्णूच्या दशावतारांची निश्चितक्रम परंपरा (मत्स्य ते कल्कि) आठव्या शतकापासूनच सुरू झाल्याचे सांगतात. आठव्या शतकातील राष्ट्रकूट - चालुक्य राजवटीतील एका शिलालेखात त्याचा मराठीत अर्थ होतो. ' टेकडीवरचा पांडुरंग ' असा उल्लेख आहे. यावरुन पंढरपूरचा विठ्ठल पांडुरंग म्हणून आठव्या शतकापासून ओळखिला जात असावा असे वाटते. परंतु या पांडुरंगाला अत्यंत लोकप्रिय केले ते मात्र मध्ययुगीन मराठी संतकवींनी. त्याला कारणही तसेच बलवत्तर होते !

    भारताचा मध्ययुगीन इतिहास हा परकीय आक्रमकांचे भयानक हल्ले, कत्तली, त्याबरोबरच धार्मिक आणि सांस्कृतिक विनाशाचा इतिहास आहे, हे काही अंशी खरे आहे. तरी त्यामुळेच आक्रमकांच्या मुळे का होईना, सनातन्यांनी चालविलेल्या कर्म छळाला शह बसला होता. म्हणूनच भारतीय इतिहासातील सध्यकाळ मूलतः पतन काळ होता, असे म्हणता येत नाही. कारण याच मध्ययुगात संतकवींनी उभी केलेली भक्ती चळवळ ही एक युगांतकारी घटना होती. महाराष्ट्रात या चळवळींचे नेतृत्त्व ज्ञानेश्वर - ज्ञाती बहिष्कृत ब्राम्हण (१२२९-७२), नामदेव- शिंपी (१२७०-१३५०), एकनाथ- ब्राम्हण (१५३३-९८), तुकाराम वाणी (१५२९-७२), नरहरी - सोनार, सावता - माळी, गोरोबा - कुंभार, सेना - न्हावी, चोखोबा - महार, शेख महंमद - मुसलमान, तुकाराम शिष्या बहिणाबाई - ब्राम्हण आणि कान्होपात्रा - नर्तकी इत्यादींनी केले. काही अपवाद वगळता हे सर्वच संतकवी बहुजन समाजातील होते. वरील सर्वांनाच सनातनी अत्याचारांच्या अनुभवातून जावे लागले होते. चातुर्वर्ण्य ब्रम्हाने वा कृष्णाने निर्माण केले असेल पण म्हणून का स्त्री, शूद्र, अतिशूद्रांना गुराढोरांसारखे वागवायचे ? आम्हालाही माणसांसारखे वागवा असा संतांचा आग्रह होता आणि तो त्यांनी चातुर्वर्ण्याच्या चौकटीत राहूनच व्यक्त केला !

    तरीही ब्रम्हवृंदांचे वर्चस्व असलेली धर्मसत्ता पाझरली नाही. शेवटी माणुसकीला पारखी झालेली बहुजन जनता पांडुरंगाला शरण गेली. त्यांची समतेची आणि ममतेची भूक करुणासागर पांडुरंगाने भागविली. तेव्हापासून संतांचा - भक्तांचा मेळा पांडुरंगाभोवती गोळा होऊ लागला. या करुणाकराची करुणा भाकताना भक्तांनी भगवंतांला कधी ' माऊली ', कधी ' बा ' तर कधी ' राया ' म्हणून पुकार केला. भगवंताचा आणि भक्तांचा हा सोयर संबंध आता एका विशाल संप्रदायात परिणाम झाला आहे. भगवंताचे दारी पंढरीची वारी करण्यासाठी भगवंत आणि भक्त वारकरी पंढरपूरी मोठ्या श्रद्धेने येत असतात. शेकडो वर्षांपासून चालू झालेला हा जनाचा प्रवाह आज बहुजनांची वहिवाट झाली आहे.

    आज पंढरीची वारी करणारे वारकरी पांडुरंगाला विश्वरुप मानत असो वा शिव रुप मानत असोत वा विष्णू शिवाचे एकात्म रुप मानत असोत. पण संतश्रेष्ठ एकनाथ महाराज आणि संत शिरोमणी तुकाराम महाराज मात्र पंढरीच्या पांडुरंगाला बुद्धरुपच मानत होते. CONT............

    ReplyDelete
  13. एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात.

    लोक देखोनी उन्मत्त वारानी आसक्त ।
    न बोले बुद्धरुप ठेवीले जयनी हात ।।
    संत तया दारी तिष्ठताती निरंतरी ।
    पुंडलिकासाठी उभा धन्य धन्य विठ्ठल शोभा ।
    बौद्ध अवतार घेऊन विटे समाचरण ठेवून ।।
    धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी ।
    या लागे बौद्धरुपे पंढरी नांदसी ।।

    संतशिरोमणी तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात

    बौद्ध अवतार माझिया अदृष्टा ।
    मौन्य सुखे निष्ठा धरियेली ।।

    वरील अभंगावरुन संतश्रेष्ठ विठ्ठलालाच बुद्धरुप मानत होते हे स्पष्ट होते. संत साहित्यावर बौद्ध मताचा प्रभाव का आहे, याचे उत्तर या अभंगात आहे. मराठी संत कवींच्या उदयापूर्वीच महाराष्ट्रात बौद्धधर्माचा - हास झाला होता तरी बुद्धसंत मात्र बहुजन मानसात तग धरुन होते म्हणूनच संत साहित्यातून ते अभिव्यक्त झाले.

    मा. शं. मोरे आपल्या महाराष्ट्रातील ' बुद्धधम्माच्या इतिहास ' या ग्रंथात मानतात. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा लोप झाल्यावर अनेक बौद्ध विहार, लेणी, बौद्ध धार्मिक स्थळांचे हिंदुकरण करण्यात आले. एकनाथ, तुकाराम हे संतश्रेष्ठच जर विठ्ठलाला बुद्धरुप मानतात तर मग पंढरपूरचे विठ्ठल मंदिर बौद्धांचा विहार होता. हे सिद्ध करण्यासाठी आणखी पुराव्याची गरज काय ? सुप्रसिद्ध पाश्चात्त्य पंडित जॉन विल्सन आपल्या ' मेमॉयर ऑफ दी केव्ह टेंपल ' या ग्रंथात पंढरपूरचे विठठ्ल मंदिर बौद्ध असल्याची साक्ष देतो.

    या मंदिराच्या सभामंडपातील दगडी खांबावर ध्यानस्थ बुद्धाच्या कोरीव मुर्ती असले, वारकरी संप्रदायात प्रवेश करताना जी शपथ घेतली जाते ती बुद्धाचे पंचशील असणे. वारकरी संप्रदायातील लोकांनी निदान पंढरपूरपुरतं तरी जातिबंधनं, श्रेष्ठ - कनिष्ठता न पाळणे. कारण, जातिभेद नष्ट करणे ही बुद्धाची शिकवण आहे. पंढरपूरची यात्रा आषाढी पौर्णिमेस करणे कारण त्यादिवशी तथागतांनी पंचवर्गीय भिक्खुंना पहिले प्रवचन देऊन धर्मचक्र प्रवर्तन केले होते. CONT..............

    ReplyDelete
  14. बुधवारच्या दिवशी पंढरपूर न सोडणे, विठ्ठल पितांबरधारी असणे कारण बुद्धाने स्वतःसाठी व भिक्खुंसाठी पिवळे व वस्त्र धारण करण्याचा नियम केला होता. याच ग्रंथात मोरे यांनी वासुदेव गोविंद आपटे यांच्या ग्रंथातील मजकूर उद्धृत केला आहे. त्यात ' विठोबाची मूर्ती खडकावर खोदलेल्या बुद्धमुर्ती, याच्या स्वप्नातील सदृश्य व विठोबा - रखूमाई यांची पृथक पृथक मंदिरे असणे, गोपाळकाल्याच्यावेळी जातीभेदाला फाटा देणे या गोष्टी सांप्रदायिक पद्धतीला सोडून आहेत. यावरुन हे क्षेत्र मूळचे बौद्ध असावे. बौद्ध धर्माच्या -हासानंतर बामण धर्माने त्या मूळच्या बौद्ध धर्माच्या आपल्या धर्मात समावेश करुन घेतला परिस्थितीजन्य पुरावा पहाता आजचे विठ्ठल मंदिर हा बौद्धांचा विहार होता त्याचे हिंदूकरण करण्यात आले हा त्यांचा निष्कर्ष अगदी योग्य आहे.

    डॉ. आ. ह. साळुखे (सर्वोत्तम भूमिपुत्रः गोतम बुद्ध) यांनी डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या ' श्री विठ्ठल महासमन्वय ' या ग्रंथातील काही वाक्य उद्धृत केली आहेत. डॉ. ढेरे लिहितात ' मराठी संत साहित्यात विठ्ठल हा बुद्ध असल्याची धारणा जशी वारंवार शब्दात प्रकट झालेली आहे तशीच ती महाराष्ट्रात चित्र आणि शिल्प या माध्यमातूनही प्रकट झाली आहे. महाराष्ट्रात शिळाप्रेसवर पंचांगे छापली जाऊ लागल्यावर दिर्घ काळपर्यंत पंचांगांच्या मुखपृष्ठावर नवग्रहांची अथवा दशावतरांची चित्रे छापीत असत. या दशावताराच्या चित्रात नवव्या अवताराच्या स्थानी सर्वत्र न चुकता विठ्ठलाचे (एखाद्याचे अथवा रुक्मिणीसहीत) चित्र छापलेले दिसते. आणि त्याबाबतीत आपल्याला कसलीही शंक उरू नये, म्हणून त्या चित्रावर बुद्ध वा बौद्ध असे नावही छापलेले आठवते.... दशावतारातील बुद्धाच्याजागी विठ्ठल असल्याची दोन तरी शिल्पे मला माहीत आहेत. एक तासगाव (जिल्हा सांगली) येथे विंचूरकरांनी बांधलेल्या दक्षिणी शैलीच्या गणेश मंदिराच्या गोपूरावर आहे आणि दुसरे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराच्या प्रकारातील एका ओवरीत आहे. जानोबा-तुकोबांनी ज्या इंद्रायणीच्या प्रवाहातून वैश्विक करणेचा महापूर महाराष्ट्रभर पसरविला. त्या इंद्रायणीचा उगम तथागताच्या करुणामय जीवितातून स्फूर्ती घेणा-या असंख्य भिक्षुंच्या निवासभूमीत झाला आहे, हे सत्य सहजी डावलता येण्यासारखे नाही.

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपली पत्नी रमाबाईची पंढरीला जाण्याची इच्छा पूर्ण करता आली नाही. पण बौद्धाची स्वीकारापूर्वीचे त्यांच्या मनात पंढरीच्या विठ्ठल बुद्धरुपच असल्याचे पक्के झाले होते. आपल्या एका भाषणात त्यांनी ' पंढरपूरच्या विठोबाची मूर्ती ही वस्तुतः बुद्धाची आहे. आणि या विषयावर मला एक प्रबंध लिहायचा आहे. तो पूर्ण झाल्यावर पुणे येथील भारत संशोधन मंडळाच्या पुढे मी तो वाचणार आहे. विठ्ठलाचे पांडुरंग हे नाव पुंडलिक या शब्दापासून बनलेले आहे. पुंडलिक म्हणजे कमळ आणि कमळालाच पालीमध्ये पांडुरंग म्हणतात. म्हणजे पांडुरंग दुसरा कोणी नसून बुद्धच होय. ' मार्च १९५५मध्ये त्यांनी या विषयावर प्रबंध लिहायला सुरुवातही केली होती. परंतु पुढे हा प्रबंध अपुराच राहीला अशी नोंद त्यांचे चरीत्रकार धनंजय कीर यांनी केली आहे.

    संत शिरोमणी एकनाथ - तुकाराम यांनी विठ्ठलाला बुद्धरुप मानले आहे. विद्वानांनी विचारवंतांनी त्याला पूरक असे संशोधन केले आहे. त्याचा निष्कर्ष पंढरीचा पांडुरंग भगवान बुद्धच आहे याची खात्री पटविणार आहे.
    END.

    ReplyDelete
    Replies
    1. बाराव्या शतकापर्यंत विठ्ठलाची मुर्ती उघड्यावर होती. विठ्ठलदेव नायक या पंढरपुरच्या यादवांच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले. तसा शिलालेख उपलब्ध आहे. ्त्यामुळे विठ्ठलमंदिर मुलचे बौद्ध होते हा निष्कर्ष टिकत नाही. नंतर त्याचे वैष्नवीकरण झाले. तोवर बुद्ध हा विष्णूचाच अवतार मानला गेल्याने "वैष्णव" संत विठ्ठलात स्वाभाविकपणे कृष्ण-विष्णुबरोबरच बुद्धही पाहू लागले.


      Delete
    2. सोनवणी तुमची वरील टिप्पणी निखालस खोटी आहे!

      "सम्राट अशोकाने बुद्धाची ८४ हजार देवळे बांधली, त्यापैकी हे एक मंदिर असावे. सुप्रशिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या “ Memoir of the Cave Temple” या ग्रंथात हे मंदिर बुद्ध मंदिर असल्याचे म्हटले आहे".

      मा. शं. मोरे

      Delete
    3. Sanjay SonawaniMarch 31, 2014 at 2:44 AMबाराव्या शतकापर्यंत विठ्ठलाची मुर्ती उघड्यावर होती. विठ्ठलदेव नायक या पंढरपुरच्या यादवांच्या सामंताने तेथे लहानसे मंदिर बांधले. तसा शिलालेख उपलब्ध आहे. ्त्यामुळे विठ्ठलमंदिर मुलचे बौद्ध होते हा निष्कर्ष टिकत नाही. >>>>>>> हो तसा शिलालेख उपलब्ध आहे पण त्या शिलालेखात पुढे ' या देउळास जो तोशिस पोहोचवेल त्यास विठ्ठलाची आण असेही पुढे म्हटले आहे म्हणजे आधी सुद्धा तेथे मंदीर होते व झालेल्या हल्ल्यामुळे ते दुरुस्तीच काम केल असा निष्कर्ष निघतो म्हणजेच ते मंदीर मुळात बौद्ध विहार होते हिंदु आणि बौद्धांच्या संघर्षामध्ये त्या मंदीराला हानी पोहोचवली गेली होती

      Delete
  15. bhosari ( bhojnagari) hi nava nusar mag bhoj rajane vasavali asavi mag. vithal , Ram , Krishna he tatkalin samrthyashali raje nantar dev banavale gele he manya. Pan te vedik brahman hote vaa avaidik pashu palak hote asa mhanane kitpat khara ahe he mahit nahi?

    ReplyDelete
    Replies
    1. वैदीक व अवैदीक भेदाभेद हा राजकीय डावपेचांचा भाग असल्याचे जाणवते.

      Delete
  16. itihaskarani Yaavar Sanshodhan kele Pahije.....

    ReplyDelete
  17. संजय सोनवणी साहेब, वरील सर्व प्रतिक्रिया वाचल्यानंतर तुम्ही विठ्ठलावर लिहिलेले पुस्तक आणि हा लेख म्हणजे ओढून-ताणून केलेली कसरत आहे, असेच म्हणावे लागेल! पौंड्र आणि पौंड्रिक या शब्दांचे मनाला वाटेल त्या पद्दतीने अर्थ लावून, नुसता संशोधनाचा आव आणून "खोटे बोला पण रेटून बोला" अशी तुमची अवस्था झालेली आहे. सुताला पकडून स्वर्ग गाठण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न, बाकी काहीही नाही! तुम्ही आपल्या महान संतांना सुद्धा खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही दिलेला शिलालेखाचा पुरावा अजिबात ग्राह्य मानता येणार नाही, कारण बाराव्या शतकात होऊन गेलेल्या कवी जयदेव याने सुद्धा विठ्ठलावर जे कवित्व केलेले आहे ते तुमच्या संशोधनाला अजिबात पूरक नाही. भावात्मक दृष्टीकोनातून या गोष्टींचा विचार करा, खोटे संशोधन बाद करून खरे संशोधन करून पूर्ण सत्य लोकांसमोर आणाल हीच अपेक्षा!!!

    ReplyDelete
    Replies
    1. आपली अपेक्षा फोल ठरू नये हीच अपेक्षा. वैदीक-अवैदीक करून हींदूंमध्ये आणखी फूट पाडण्याचे षड़यंत्र तर नाही?

      Delete
  18. तुम्ही बौद्ध आहात का? मग कदाचीत बरोबर असेल तुमचे मत!!

    ReplyDelete
  19. संजय सोनवणी हा मनुष्य प्रत्येक प्रसिद्ध व्यक्तीला "धनगर" सिद्ध करण्याचा अत्यंत शिकस्तीने प्रयत्न करतो.
    त्यामुळे सोनवणी हा प्राणी स्वभावाने आणि 'जातीने ' धनगर आहे हेच काय ते ह्या आणि ह्याच्या इतर लेखांवरून सिद्ध होते.

    ReplyDelete
  20. पण बाबासाहेब आंबेडकर तर म्हणत होते की ठिकाण बौद्ध धर्माचे आहे. तिथल्या विठ्ठलाचा चेहरा हा गौतम बुद्धाच्या चेहराश्या साध्यर्म राखतो.

    ReplyDelete
  21. संजय सोनवणी साहेब, वरील सर्व प्रतिक्रिया वाचल्यानंतर तुम्ही विठ्ठलावर लिहिलेले पुस्तक आणि हा लेख म्हणजे ओढून-ताणून केलेली कसरत आहे, असेच म्हणावे लागेल! पौंड्र आणि पौंड्रिक या शब्दांचे मनाला वाटेल त्या पद्दतीने अर्थ लावून, नुसता संशोधनाचा आव आणून "खोटे बोला पण रेटून बोला" अशी तुमची अवस्था झालेली आहे. सुताला पकडून स्वर्ग गाठण्याचा तुमचा केविलवाणा प्रयत्न, बाकी काहीही नाही! तुम्ही आपल्या महान संतांना सुद्धा खोटे ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही दिलेला शिलालेखाचा पुरावा अजिबात ग्राह्य मानता येणार नाही, कारण बाराव्या शतकात होऊन गेलेल्या कवी जयदेव याने सुद्धा विठ्ठलावर जे कवित्व केलेले आहे ते तुमच्या संशोधनाला अजिबात पूरक नाही. भावात्मक दृष्टीकोनातून या गोष्टींचा विचार करा, खोटे संशोधन बाद करून खरे संशोधन करून पूर्ण सत्य लोकांसमोर आणाल हीच अपेक्षा!!!---------------> Real criticism....

    ReplyDelete
  22. पण डॉ आंबेडकर म्हणत होते की हे पुर्वीचे बौद्ध विहार होते म्हणुन .

    ते पौंड्र वेगैरे फारसे पटत नाही .

    ReplyDelete
  23. मग विठ्ठलाच्या पंढरपूर येथील मूर्तीच्या मस्तकावर शिवलिंग कोरलेले आहे, जे अभिषेकाच्या वेळी स्पष्ट दिसते त्याबद्दल काय स्पष्टीकरण आहे?

    ReplyDelete
    Replies
    1. काही नाहि. निळ्या कोल्ह्यांना इतरांच्या बापाला स्वतः चा बाप म्हणवून घ्यायची हौस.

      Delete
    2. आज विठ्ठलाच्या डोक्यावर असलेला उभट उंचवटा म्हणजे शिवलिंग आहे, अशी बहुतेकांची गैरसमजूत आहे. महापूजेच्या वेळी, पहाटे विठ्ठलमूर्तीला स्नान घालण्यासाठी जेव्हा देवाची वस्त्रे-आभूषणे उतरवली जातात, त्या वेळी देवाच्या मस्तकावरील उंचवटा ठळकपणे दिसतो.

      Delete
  24. काही पळपुटे 1956 मधे आपल्या नेत्यासहित हिंदू धर्म सोडून पळून गेलेत. बरं गेले तर गेले. शांत तरी बसावं ना? तर तसे अजिबात नाही. स्वतःला अतिविद्वान आणि माझं तेवढंच खरं असे माणणा-या बौध्द इतिहासकारांचे एकच पेव फुटले आणि यांना कधी बालाजी बौध्द दिसू लागला तरी कधी विठोबा आणि संदर्भ कुठले तर ज्या व्यक्तींनी इतिहासाची पाने न चाळता फक्त आपल्या अनुयायांना स्वतःच्या सोयीपुरते देणा-या व्यक्ती. ना फुलेंच्या लेखनाला ऐतिहासिक संदर्भ आहेत ना आंबेडकर ांच्या. एक दोन ओवीमधे कुठे बौध्द, बूध्द असा उल्लेख आला कि लागले ओरडायला. विठ्ठल हा बौध्द आहे. अरे गाढवांनो तुम्ही कोणत्याही संताचे दाखले द्या. त्यात एक दोन ठिकाणी बुध्दाचा उल्लेख आढळतो; मात्र हरी, हर, विष्णू अशा हिंदु देवतांचा उल्लेख पदोपदी आढळेल। हिंमत आहे तर वारकऱ्यांसमोर हेच वाक्य म्हणून दाखवा.

    ReplyDelete
  25. अहो, परशु धाकटे तुम्ही कोणत्या जगात वावरत आहेत. काय हि भाषा, काय हे लिखाण, डोके ठिकाणावर ठेऊन लिहीत चला! ना वाचन, ना अभ्यास उगीचच आकांडतांडव करीत बसायची तुमची जुनीच खोड आहे, असे दिसते. उगीच एखाद्या समाजाबद्दल असे वेडेवाकडे लिहिणे बरे नव्हे. वरच्या प्रतिक्रियांवर एक नजर जरी टाकली असती तर असे लिहिण्याची गरज पडली नसती.

    -अंकुश यादव.
    मलकापूर.

    ReplyDelete
  26. पांडुरंग-विठ्ठल

    सत्यशोधक

    विठ्ठलावर आज पर्यंत अनेकांनी पुस्तक व लेख लिहिले. सर्वानी आपआपल्या परीने विठ्ठलाचं मूळ शोधण्याचा प्रयत्न केला.

    आजही त्याचं मूळ शोधण्याचा प्रयत्न संपलेला नाही. काही यशस्वी हि झाली असतील. आणि काही अपयशीही. तरी प्रत्येकाची काही ना काही मत आहेत. त्यांचा आधार घेत मी माझी मतं तयार केलेली आहेत. अर्थात सध्याच्या घडीला ती मी माझ्या पुरता अंतिम मानत असलो तरी नवीन माहिती समोर आल्यावर ती मी बदलूही शकतो.

    रा.ची. ढेरे 'विठ्ठल : एक महासमन्वय' या पुस्तकात म्हणतात:-
    "विठ्ठल या नावाचा स्पष्ट उलगडा अजून व्हायचा आहे. आणि कदाचित त्या उलगड्यातूनच विठ्ठलाच्या मुलरूपाचा शोध लागण्याचा संभव आहे......त्या आदिरूपाचा शोध घेण्यासाठी विठ्ठल नावाची निःशंक व्युत्पत्ती सापडायला हवी"

    ह्याच विठ्ठल नामाच्या व्युत्पत्तीच्या शोधासाठी हा लेख मी लिहिलेला आहे.

    महाराष्ट्राचं एकमेव प्रसिद्ध लोकदैवत म्हणजे विठ्ठल.

    विठ्ठलाला विठू, विठोबा, पांडुरंग, पंढरीनाथ या नावाने देखील ओळखलं जातं.

    विठ्ठलाच्या नावाची व्युत्पत्ती काही मान्यवरांनी सांगितलेली आहे ती पुढील प्रमाणे :-

    १. डॉ. रा. गो. भांडारकर यांनी 'विष्णु' या शब्दाचे कानडी अपभ्रष्ट रूप ' बिट्टी' असे होते. व बिट्टी वरून विठ्ठल हे रूप तयार झाले असे म्हटले आहे.

    २ वि. का. राजवाडे यांनी विठ्ठल हा शब्द ' विष्ठल ' म्हणजे दूर रानावनातील जागा यातून निष्पादावा असे म्हटलेले आहे.

    ३ विश्वनाथ खैरे यांनी 'इटु' शब्दाचा तामिळ अर्थ ' कमरेवर ज्याने हात ठेवले तो' असा अर्थ सांगितला आहे.

    ४ डॉ. रा. चि. ढेरे यांच्या मते धनगरांच्या इटल-ब्रमल या जोडदेवांपैकी एक असलेल्या इटलाच विठ्ठल रूप झाले असावे अस त्यांच म्हणणे आहे.

    ५ विटेवर उभा म्हणून विठ्ठल अशीही एक व्युत्पत्ती सांगण्यात येते.

    या सर्वांमध्ये वि. का. राजवाडेनी केलेली विठ्ठल नावाची व्युत्पत्ती बरीच जवळ जाताना दिसते. याची चर्चा आपण पुढे करणार आहोत.

    पांडुरंग या नावामुळे विठ्ठलाच बौद्ध रूप ध्यानी येत. अस अनेक विद्वानांच मत आहे.

    याबाबत डॉ. आंबेडकर म्हणतात - विठोबाचे ' पांडुरंग ' हे नाव पुंडरिक या शब्दापासून बनलेले आहे. पुंडरिक म्हणजे कमळ आणि कामळालाच पालीमध्ये पांडुरंग म्हणतात. म्हणजे पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून बुद्धच होय ( डॉ. आंबेडकर चरित्र, कीर, पृ. ५०१)

    'सद्धर्म पुंडरिक' हा महायान पंथाचा प्रमुख ग्रंथ आहे.

    पृष्ठ १

    ReplyDelete
  27. इंडियन अँटिक्वेरी (भाग दहावा) मध्येही पंढरपूर हे स्थान पूर्वी बौद्धांचे होते आता हिंदूंचे झाले असा उल्लेख आहे.
    ( श्री विठ्ठल आणि पंढरपूर, लेखक - ग. ह. खरे, पृ. १४९)

    बौद्धपूर्व या ग्रंथाचे लेखक श्री. वा. गो. आपटे यांनीही असेच मत व्यक्त केले आहे. (पृ. १६७)

    वारकरी पंथाचा भगवा झेंडा जो मराठा राज्याने स्वीकारला तो बुद्धाचाच होय. भगवा रंग हा भिक्षुचा वस्त्राचा रंग आहे. भगवान हे बुद्धाचेच नाव आहे.
    (पुराणकथा आणि वास्तवता, लेखक दामोदर धर्मानंद कोसंबी, पृ. ४१)

    अशोकाने बुद्धाची ८४ हजार देवळे बांधली त्यापैकी हे एक मंदिर असावे. सुप्रसिद्ध पाश्चात्य पंडित जॉन विल्सन यांनी आपल्या memoior of the cave temple या ग्रंथात मंदिर बौद्ध असल्याचे म्हटले आहे.
    (धर्मपद, अ. रा. कुलकर्णी, या ग्रंथाचे परिशिष्ट पहा)

    या मान्यवरांच्या मतानुसार विठ्ठल हा बौद्ध धर्माशी संबंधीत असावा हि खात्री पटते.

    संतांनी सुद्धा विठ्ठलाला बौद्धरूपात पाहिलेलं आहे :-

    होऊनिया कृष्ण कंस वधियेला ।
    आता बुद्ध झाला सखा माझा ।।- संत जनाबाई
    (३४४)

    बौद्ध अवतार घेऊन विटे समचरण ठेवून ।
    पुंडलिक दिवटा पाहून । तयाचे द्वारी गोंधळ मांडीला ।।बया दार लाव ।। बौद्धाई बया दार लाव ।।- संत एकनाथ
    (३९११)

    गोकुळी अवतारु सोळा सहस्त्रांवरू ।
    आपण योगेश्वरु बौद्धरूपी ।।
    व्रतभंगासाठी बौद्ध अवतार ।
    झाला दिगंबर अवनिये ।।- संत नामदेव
    (१०९६)

    बौद्ध अवतार माझिया अद्रुष्टा । मौन्य मुखे निष्ठा धरीयेली - संत तुकाराम

    मध्ये झाले मौन देव निजध्यानी । बौद्ध ते म्हणोनी नावेरूप - संत नामदेव
    (२१०५)

    अश्या प्रकारे संतानी विठ्ठलाला मौनी बुद्ध म्हणून पाहिलेलं आहे हे आपल्या समोर आहे.

    पृष्ठ २

    ReplyDelete
  28. आता आपण विठ्ठल संबंधाने काही भौतिक पुरावे व काही चालीरीती पाहू.

    १ पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या सभा मंडपात दगडी खांबावर ध्यानस्त बुद्धाच्या कोरीव मूर्ती आढळतात.

    २ जुन्या काळी दशावताराची चित्रं छापताना नवव्या अवताराच्या ठिकाणी बुद्धा ऐवजी विठ्ठलाचे चित्र असे डॉ. रा चि. ढेरे यांनी नोंदवून ठेवले आहे.

    ३ दरवर्षी आषाढ पौर्णिमेला पंढरपूरची महायात्रा भरते. या पौर्णिमेला बौद्ध वाङमयात फार महत्वाचे स्थान आहे.

    ४ वारकरी ( मूळ शब्द वारीकरी) या संप्रदायात प्रवेश करते वेळी शपथ घ्यावी लागते. ही शपथ म्हणजे बुद्धाचे पंचशील होय.

    ५ चातुर्मासात वारी हि हिंदू संस्कृती प्रमाणे अयोग्य होय.

    ६ विठ्ठल पीतांबर धारी आहे. पीतांबर म्हणजे चिवर. बुद्ध जसे चीवर धारण करतात तेच चिवर विठ्ठलाला नेसवतात ज्याला पीतांबर म्हणतात.

    ७ पंढरपूरच्या वारीला निदान पंढरपूर पुरता तरी स्पृश्य-अस्पृश्य भेद विसरून सर्व एकत्र गोळा होतात.

    ८ बहिनाबाईंनी संत तुकाराम महाराज व विठ्ठलाच्या प्रेरणेतूनच बौद्ध महाकवी अश्वघोषाच्या वज्रसूची या चातुर्वर्ण्यविरोधी ग्रंथाचा मराठी अनुवाद केला.

    या परंपरामधून व भौतिक पुराव्यातूनही विठ्ठल बौद्ध धर्माशी संबंधित असावा असा निष्कर्ष निघतो

    विदा ज्ञानेन ठान शुन्यान लाति ग्रुव्हतिच स्वायम ।
    तस्मात विठ्ठल म नामत्व, ध्यायस्व मुनिश्वर ।।

    विठ्ठल हा शून्य तत्वज्ञान ग्रहण करून आपल्या ज्ञानाने इतरांच अज्ञान दूर करणारा आहे

    शून्य तत्वज्ञान हे महायान पंथाचा प्रवर्तक नागार्जुनाने बुद्धाच्या प्रतित्यसमुत्पाद यालाच पर्याय समजून घेतले आहे.

    पृष्ठ ३

    ReplyDelete
  29. तोचि बौद्धरूपे जाण । पुढा धरिल दृढ मौन ।
    तेव्हा कर्माकर्म विवंचना । सर्वथा जाण कळेना ।
    तो तटस्थपणे सदा । प्रवर्तील महावादा ।

    इतर दृष्टीकोनातून विठ्ठलाचे स्वरूप थोडक्यात पाहूया.

    काही मान्यवरांनी विठ्ठल प्रमुख देव नसून पुंडरीकच (शिव)प्रमुख दैवत असून विठ्ठल हा शिवभक्त आहे असे म्हटलेले आहे.

    पुंडरिक हा शिव आहे. हे कळावं म्हणून त्यांनी काही घटक आपणासमोर ठेवलेली आहेत.

    १ पुंडरिक मंदिरात भव्य शिवलिंग आहे. पुंडरिकाची कसलीही मूर्ती नाही.

    २ पुंडरिक मंदिरा बाहेर आता विस्थापित असला तरीही एक नंदी आहे.

    ३ पुंडरिक लिंगाची पूजा शिवाप्रमाणे बेल फुल वाहून होते.

    ४ महाशिवरात्रीस येथे माघ वद्य दशमी पासून पाच दिवस उत्सव होतो.

    (विठ्ठलाचा नवा शोध - संजय सोनवणी)

    हे पुरावे पुंडरिक शिव होता. यासाठी प्रबळ आहेत. परंतु विठ्ठलाच काय ?

    तो हि शिवभक्तच होता काय ?

    लगेचच असा निष्कर्ष काढन चुकीचं होईल. इतिहास काय सांगतो ते आधी आपण पाहूया

    आद्य शंकराचार्यानी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला भेट दिली होती असा उल्लेख 'चिदविलासयती' च्या शंकरविजयात आहे.

    पृष्ठ ४

    ReplyDelete
  30. आचार्य दर्शनाला गेले आणि त्यांच्या तोंडून उदगार निघाले:-

    महायोगपीठे तटे भिमरथ्या वरं पुंडरिका दातृ मुनींद्रे: ।
    समात्याग तिष्ठता मानंदकंद परब्रह्म लिंग भजे पांडुरंगम ।।

    शंकराचार्य यांचा इतिहास आपण पाहिला तर बौद्ध धर्माच्या विरूद्ध त्यांनी आपल तत्वज्ञान निर्माण केलं व बौद्धांच्या विरोधात जीवन वाहून घेतलं होत.

    जगन्नाथ पुरी च्या संदर्भात माहिती देताना एल. एम. जोशी म्हणतात :-
    आद्य शंकराचार्य द्वारे स्थापित केंद्रांपैकी एक ओरिसातील पुरी येथे होते.स्वामी विवेकानंद जे शंकर संप्रदायाचे अर्वाचीन काळातील प्रमुख शिक्षक आहेत त्याच्या अनुसार ' जगन्नाथाचे मंदिर एक जुने बौद्ध मंदिर आहे , त्याला आणि तशाच काही अन्य मंदिरांना आम्ही घेऊन त्यांना हिंदू मंदिर बनवून टाकले. पुढे सुद्धा आम्हाला अशा प्रकारची अनेक कामे करावयाची आहेत. ( श्री. एल. एम. जोशी पृ. ५१ - १९७७)

    बदरीनाथ बद्दल श्री. दवे आणि एल. एम. जोशी यांच्या ग्रंथाचा दाखला देत डॉ. के. जमनादास यांनी आपल्या ग्रंथात नमूद केले आहे की परंपरेनुसार इ.स. ८-९ व्या शतकात आदय शंकराचार्याद्वारे बद्रीनारायनाच्या मंदिराचे निर्माण झाले. त्यांनी नारद कुंडात खोल डुबकी मारून तेथून हरवलेली मूर्ती काढून स्थापित केली. व इथे चार प्रमुख मठापैकी एकाची स्थापना केली.ज्याला उत्तरान्मय ज्योतिर्मठ म्हटल्या जाते.

    या विषयी लालमणी जोशी आवर्जून सांगतात की ही मूर्ती बुद्धाची आहे
    " बौद्धाची अन्य अनेक मंदिर ज्यांनी हिंदूंनी घेतली. त्यामध्ये उल्लेखनीय आहे गढवाल येथील बद्रीनाथाच मंदिर तेथे आज सुद्धा पूर्वीचीच आद्य बुद्धमूर्ती आपल्या स्थानी स्थित आहे आणि विष्णू म्हणून पूजल्या जात आहे. (श्री. एल. एम. जोशी, पृ. ५१ : १९७७)

    सारनाथ स्तूपाजवळ आजही त्याची मान्यता आहे की स्तूपाचं शिवलिंग करण्याचं काम शंकराचार्यानी केलं.
    (हिंदी संस्कृती आणि अहिंसा - कोसंबी)

    बौद्धांच्या मुरत्यांची नासधूस करून त्याला शंकर मूर्तीचा बाप्तिस्मा दिला.
    (देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे - प्रबोधनकार ठाकरे)

    बुद्धाच्या विहाराशेजारीच ब्राह्मणांनी आपली विहारे बांधण्यास सुरवात केली......परकीय आक्रमणामुळे बुद्धभिक्खू देश सोडून गेले. त्यांच्या गैरहजेरीत ब्राह्मणांनी बुद्धाच्या नावाचा समूळ लोप करण्याच्या उद्देशाने बुध्द विहाराना पांडव लेणी म्हणू लागले. व बुद्धाच्या मूर्ती फोडून त्या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना करू लागले.
    (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड-२०, पृ.३३४)


    पृष्ठ ५

    ReplyDelete
  31. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आधी बौद्ध धर्माचे व नंतर शैव धर्माचे ठाणे होते
    (कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे)

    पुष्यमित्र शुंगाने कपटाने बृहद्रथाचा खून केला. सत्ता हस्तगत केल्यानंतर त्याने बौद्ध भिक्खुंचा छळ केला, हत्या केल्या.

    बुद्धगया हे हे बौद्ध धर्मियांचे एक अत्यंत पवित्र स्थान आहे. त्याला बौद्धांची काशी म्हणतात. येथे बुद्धाची एक भली जंगी मूर्ती होती. ती काढून पुष्यामित्राने तिच्या जागी शिवाची मूर्ती स्थापन केली. (अशोक चरित्र - वा. गो. आपटे)

    अशी इतिहासातील अनेक उदाहरणे आपणाला देता येतील.

    रा.ची.ढेरे आपल्या विठ्ठल : एक महासमन्वय या ग्रंथात म्हणतात :-
    "विठ्ठलाच्या उन्नयन प्रक्रियेत प्रथम शैवीकरणाची अवस्था सर्वत्र येते आणि नंतरच वैष्णविकरणाची अवस्था येते. असे सिद्ध होऊ शकत नाही.हि उन्नयन प्रक्रिया एकरेशीय नाही. तर बहुरेशिय आहे. उन्नयन प्रक्रियेत सापडलेल्या विठ्ठल-बिराप्पाच्या प्रत्येक ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारे उन्नयन घडत राहिले आहे. हे सत्य केवळ विठ्ठल बिराप्पापुरतेच मर्यादित नाही, तर मुरुगन -अय्यपन -अय्यनार यांसारख्या दक्षिणेतील लोकदेवांच्या ठाण्यात अथवा लज्जागौरीसारख्या आदिम मातृदेवीच्या ठाण्यातही आपणास उन्नयनप्रक्रिये संबंधीच्या या सत्याचा स्पष्ट प्रत्येय घेता येतो"

    माणिकराव धनपलवार म्हणतात:-
    "विठ्ठलाचे जसे वैष्णवीकरण घडले तसे त्याचे शैविकरण हि घडले होते; शैविकरणाची प्रक्रिया हि वैष्णविकरणाच्या पूर्वी पार पडली होती."

    रा.ची ढेरे यांच्या मते विठ्ठल व त्यासारख्या इतर दैवतांचे शैवीकरण व वैष्णवीकरन झालेले आहे पण नेमकं आधी काय झालं व नंतर काय झालं हे सांगता येत नाही. व माणिकराव धनपलवार यांच्या मते विठ्ठलाचे वैष्णवीकरणाआगोदर शैवीकरन झालेलं आहे.

    बौद्ध विहाराच्या जागा (आर्य)हिंदूंनी बळकावल्या. व त्याचे हिंदू मंदिरात रूपांतर केलं गेलं. (उदा: लेण्याद्री) आजही हि क्रिया थांबलेली नाही. महाशिवरात्रीच्या दिवशी हजारो संख्येनं हिंदू भाविक बौद्ध लेण्यातील चैत्य स्तूपाना शिवलिंग म्हणून पुजताना दिसतील. काही ठिकाणी तर नारळ फोडून चैत्य स्तूपाना नुकसान पोहचवण्याच काम हि भाविक मंडळी करताना दिसतात. अश्या प्रकारे आजही बौद्ध लेण्यांचे हिंदुकरण करण्यात येत आहे.

    पृष्ठ ६

    ReplyDelete
  32. पण सध्या जागरूक असणाऱ्या काही बौद्ध अनुयायांमुळे हे प्रमाण कमी होताना दिसत आहे.

    जगन्नाथ हे बौद्ध मंदिर होते हे अनेक विद्वानांनी सिद्ध केले आहे. जगन्नाथाला मौनी बुद्ध मानण्याची परंपरा आहे तसेच विठ्ठलाला देखील मौनी बुद्ध मानण्याची परंपरा आहे.

    स्कंद पुराणात पुंडरिकाशी संबंधित कथा आलेली असून त्याचा संबंध जगन्नाथ पुरीशी आलेला आहे.

    पुंडरिकाचा उल्लेख आगोदरच्या साहित्यात फार कमी वेळा उल्लेखलेला आहे.

    पांडुरंग व पुंडरिक हे नावदेखील एकसारखंच ( पुंडरीक च पांडुरंग झालेलं आहे ) आहे.

    पुंडरीक दुसर तिसरं काही नसून शिवलिंग आहे. हे पण आपण पाहिलं.

    याचा अर्थ मूळ विठ्ठलाची कीर्ती कमी करण्याच्या हेतूने विठ्ठलाच्या नावेच तिथे शिवलिंग मुख्य देव म्हणून उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला ?

    श्री. म. माटे हे आपल्या 'पांडुरंगाचे स्थलांतर आणि पुंडलिकाचे रूपांतर' या लेखात काय म्हणतात ते पाहूया.

    " दुसरी गोष्ट ध्यानात घेण्यासारखी आहे. पुंडलिकाच्या देवळात पुंडलिकाची मूर्ती नाही. तेथे शिवाचे लिंग आहे; आणि लिंगावर पुजारी लोक पितळेचा मुखवटा घालतात. जर ती पांडुरंगाची समाधी आहे, तर पद्धती प्रमाणे पादुका बसवावयास हव्या होत्या. आणि त्या बसवलेल्या असत्या, म्हणजे पुजार्यानी पितळेचा मुखवटा बसवला असता असे वाटत नाही. तथापी समाधीवर महादेवाचे लिंग बसवण्याची चालही आहे. आणि पुंडलिकाची समाधी ज्यांनी बांधली, त्यांनी कल्पनेप्रमाणे शिवलिंगाची स्थापना केली असेल. पण या ठिकाणी एक विकल्प मनात येतो. या पुंडलिकाच्या देवळातले पुजारी कोळी आहेत. अनेक ठिकाणी महादेवाची पुजा कोळ्यांकडेच असते. पूजेचा पहिला मान कोळ्यांकडे किंवा जंगमांकडे असून त्यांच्यामागून ब्राह्मणांनी पूजा करावी अशी चाल असते पण हि चाल एखाद्या समाधीवर बसवलेल्या शिवलिंगाच्या बाबतीत नसावी, असे मला वाटते. मग येथे पुंडलिकाची समाधी आहे, आणि हे मूळचेच महादेवाचे स्थान नाही तर येथली पूजा कोळ्यांकडे कशी, या प्रश्नाचाहि शोध करावा लागेल"

    पृष्ठ ७

    ReplyDelete
  33. येथे श्री. म. माटे यांच्या मते पुंडरीक मंदिरात शिवलिंग आहे. त्याला पितळी मुखवटा बसवलेला आहे. ते शिव मंदिर असण्याचीही शक्यता आहे. पण त्याच बरोबर ती समाधी असण्याची शक्यता दर्शवून समाधीवर लिंग उभारण्याची प्रथा आहे असेही ते सांगतात. पण त्यांच्या मनात एक शंका आहे ती म्हणजे अन्य महादेव मंदिरात प्रथम पुजेचा मान कोळी किंवा जंगम यांना असतो नंतर ब्राहमण पुजारी तेथे पूजा करतो. मग पुंडरीक मंदिरातील पुजारी कोळी कसे हा त्यांचा प्रश्न आहे.

    याच उत्तर त्यांनी पुंडलिक लिंगा ऐवजी आगोदर तेथे पुंडलिकाची मूर्ती असावी व नंतर तेथे लिंगाची स्थापना केली असावी असे मत त्यांनी मांडलेलं आहे

    रा.ची ढेरे यांनी मात्र त्यांच पहिले मत उद्धृक्त करून पुंडरीक हा लिंग स्वरूपातील शिव आहे असे मानतात.

    त्याला कारण म्हणजे त्यांच्याही मनात तोच प्रश्न आहे पुंडरीक मंदिरातील पूजारी कोळी कसे ?

    आणि हा प्रश्न स्वाभाविक आहे. त्याच उत्तर असे कि पुंडरीक हा स्वतः कोळी समाजातील प्रसिद्ध व्यक्ती होती. याचे दाखले लीळाचरित्र व धनगरी कथेत आलेले आहेत. लिलाचरित्रात स्पष्टपणे विठठलाचा आणि कोळी समाजातील एका व्यक्तीचा संबंध आलेला असून धनगरी साहित्यातील म्हालिंगराय ह्या विठ्ठल भक्तांचा संबंध असून कोळी समाजातील व्यक्तीच समजली जाते.

    अस जर असेल तर पुंडरिकाची पूजा कोळी लोकांनी करणं स्वाभाविकच आहे. पुंडरीक ज्याला म्हटलं जात तो कोळी समाजातील विठ्ठलाचा परम भक्त आहे. त्याच्या मृत्यूनंतर आदिम पद्धतीप्रमाणे त्यावर लिंग उभारणं हे हि स्वाभाविकच आहे ( लिंगपूजेचा संबंध प्रथम शिवपूजेशी नव्हता नंतर तो जोडण्यात आला हे वेगळ्या लेखात सविस्तर लिहीन)

    लीळाचरित्र व श्री.म. माटे यांनी 'पांडुरंगाचे स्थलांतर आणि पुंडलिकाचे रूपांतर' हा लेख वाचल्यावर हे कळेल कि आज जो पुंडरीक म्हणून ओळखला जातो ती एका कोळी समाजातील व्यक्तीची समाधी आहे. लिळाचारित्रात विठठलाबरोबर त्या कोळी व्यक्तीचा देखील संदर्भ आलेला आहे. आदिम समाजात समाधीवर पिंड उभारण्याची प्रथा असून ती प्रथा काही समाजात आजही टिकून आहे. त्याचप्रकारे ती बांधलेली असून त्याचे पुजारी कोळी आहेत. या समाधीचा आणि विठ्ठलाचा संबंध नंतर जोडला गेलेला आहे ? कि खरच तो विठ्ठल भक्त आहे ?

    पृष्ठ ८.

    ReplyDelete
  34. तो भक्तच आहे व ती समाधीच आहे अशी संत परंपरा मानते व ते योग्य आहे. पण शैविकरण करताना पुंडरिकाला शिव बनवण्याचा प्रयत्न झाला. जसा मल्लीकार्जुन या जवळच्याच स्थानाचा झाला. बारा जोतिर्लिंगातील मल्लिकार्जुन हा मल्लाचं मूळ होय असे श्री. चांदोरकरांनी म्हटलेलं आहे.

    मल्लीकार्जुन या नावात अर्जुन असणं आणि विठ्ठलाला कृष्ण म्हणन हि गोष्ट या दोघांना गुरू शिष्य असल्याचे तर निदर्शक नाही ना ?

    इटल-ब्रमल या जोडदेवांपैकी विठ्ठल हा इटल आहे. तर ब्रमल हा विरमल्ल आहे असे रा.ची. ढेरे म्हणतात

    त्याच बरोबर ते असेही म्हणतात कि इटल हा कधीच एकटा नसतो. त्याच्यासोबत विरमल्ल असतोच असतो. पण पंढरीतला विरमल्ल कोण हे ते सांगत नाहीत.

    तो विरमल्ल मल्लिकार्जुनच आहे. त्याचेही आधी शैवीकरण करून त्याला शिव बनवले गेले.

    या मल्लिकार्जुनालाच मल्लिनाथ म्हटलं गेलेलं आहे. खंडोबाला देखील मल्लिनाथ म्हटलं गेलेलं आहे. कदाचित खंडोबा देखील विरमल्ल तर नाही ?

    विरमल्ला ला अर्जुन म्हणणं हे तो राजा असण्याशी संबंधित असून विठ्ठलाला कृष्ण म्हणनं हे त्याच्या गुरुत्वा कडे निर्देश करणारे आहे.

    विठ्ठलाला लीळाचरित्र व अन्य पुराण कथा ब्राह्मण म्हणतात. श्रमणांना ब्राह्मण बनवण्याची परंपरा वैदिकांमध्ये पूर्वीपासूनच आहे. विठ्ठल हा श्रमण असण्याची शक्यताच अधिक आहे.

    पुंडरीकमल्लिकार्जुनाच्या अग्र दर्शनाचा मान असण्याचं कारण हे दोनीही भक्त विठ्ठलाशी संबंधित लोकप्रिय भक्त होते.

    रखुमाईची मूर्ती विठ्ठलापेक्षा दूर अंतरावर आहे हेही विठ्ठल श्रमण असण्याचं निदर्शक आहे. रखुमाई हि काल्पनिक आहे असं माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही. धनगरी गीतात रखुमाईचा मृत्यू झाल्याचे वर्णन आहे. अस जर असेल तर विठ्ठलाने सन्यास घेऊन श्रमण बनला असण्याचीही शक्यता आहे. आणि म्हणून विठठलाबरोबर राखुमाईची मूर्ती अंतरावर ठेवण हे त्यावेळी लोकांना योग्य वाटलं असावं. विठठलाला लिळाचरित्राने व अन्य पुराण कथानी ब्राह्मण का म्हटले असेल त्याचा अर्थ असा आहे.

    पृष्ठ ९

    ReplyDelete
  35. विठ्ठलाचा काळ :-

    श्री.रघुनाथ भास्कर गोडबोले हे 'भरतखंडाचा अर्वाचीन कोश' या ग्रंथात लिहितात

    " पुंडरीक हा जातीचा ब्राह्मण होता व मोठा विद्वानही असे. जैन लोक असे म्हणतात कि युधिष्ठिर शक १७२४ मध्ये विद्यारत्नाकर नावाच्या एका जैन पंडिताशी याचा वाद होऊन याचा पराभव झाला. व हा जैन धर्म स्वीकारून अहिंसा धर्माप्रमाणे आचरण करू लागला. हा वाद भिमारथीच्या तीरी म्हणजे भीमा नदीच्या काठी असणाऱ्या लोहदंड क्षेत्रात झाला. व त्यावेळी चंद्रगुप्तांचा मुलगा व अशोक राजाचा बाप वारीसार याची राज्यकीर्ती होती"

    जैन लोक मल्लिकार्जुन व खंडोबाला मल्लिनाथ म्हणून ओळखतात. खरंतर जैनांच्या मल्लिनाथचा काळ व विठोबा आणि खंडोबाचा काळ यात फार तफावत आहे. फक्त नाम साधरम्यामुळेच ते खंडोबाला किंवा मल्लिकार्जुनाला जैनांचा मल्लिनाथ मानतात. मल्लिकार्जुन व खंडोबा हे मल्लिनाथ आहेत पण जैन लोक जो मल्लिनाथ मानतात तो मल्लिनाथ हे नाहीत.

    श्री. गोडबोले यांच्या मतानुसार युधिष्ठाराचा राज्याभिषेक होऊन १७२४ वर्षांनी हि घटना घडलेली आहे.
    श्री. काणे आणि श्री. अय्यर यांच्या मते महाभारताचा काळ इ.स.पु. १२०० हा आहे. मग हि तारीख खरी असेल तर पुंडरिकाचा काळ इ.स ५०० ठरतो. चंद्रगुप्त व अशोक हे मौर्य काळातील चंद्रगुप्त अशोक नसून गुप्त काळातील चंद्रगुप्त व अशोक आहेत (चंद्रगुप्त चा मुलगा समुद्रगुप्त हा स्वतःला अशोक म्हणवून घेत होता अस काही अभ्यासकांच मत आहे. ह्या काळातील मल्ल लोकांचा इतिहास शोधला तर सर्व माहिती मिळण्याची शक्यता आहे)

    श्री. त्र्यं. गं. धनेश्वर यांनी 'वेरूळची लेणी' या पुस्तकात खंडेराव हि इ.स. ६२० मध्ये होऊन गेलेली एक बौद्ध विरोधक एक ऐतिहासिक व्यक्ती असावी असे म्हटलेले आहे.

    श्री धनेश्वर यांच्या मतानुसार खंडोबाचा काळ इ.स. ६२० मानला आहे. जवळ-जवळ तोच काळ पुंडरिकाचा आहे हे श्री गोडबोले यांच्या दाखल्यावरून दिसून येते. धनेश्वरांनी खंडोबाला बौद्ध विरोधक व्यक्ती मानलेली आहे. खरंतर मिळणार्या पुराव्या वरून नेमकी परिस्थिती याच्या उलट दिसतेय.

    पृष्ठ १०

    ReplyDelete
  36. विरमल्ल हा जर खंडोबा आहे व विरमल्लाचा आणि विठ्ठलाचा संबंध आहे. तर खंडोबा हा बौद्ध विरोधक व्यक्ती न ठरता बौद्ध समर्थकच ठरण्याची शक्यता आहे. जसा अशोक धनगर होता व बौद्ध होता. सातवाहनांना देखील काही लोक धनगर मानतात तेही बौद्ध धर्माबद्दल आदर दाखवत होते हे त्यांच्या काळातील बुद्ध लेण्यांवरून दिसून येईल तसेच धनगरांचा खंडोबा हा बौद्ध व्यक्ती नसली तरी बौद्ध विरोधक आहे याला कोणताही आधार दिसत नाही किंबहुना वरील विवेचनावरून ती बौद्ध समर्थक असावी अशीच शक्यता अधिक दिसते.

    तिरुपती बालाजी हा विठोबाचं आहे. त्याच्याही परंपरा बौद्ध धर्माशी संबंधित आहे. त्याला तिरुमल्ल म्हटलं जातं

    पुराणात पांडुरंग माहात्म्य या नावाखाली वेगवेगळया कथा पसरवून सुरुवातीला इतर देवतांना पांडुरंग बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तोही फसला.

    विठ्ठलाची कीर्ती ढळत नाही म्हटल्यावर विठ्ठलाच मूळ स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला गेला. त्यात विठ्ठलाच कृष्णकरण कऱण्यात आले व शिवाचा भक्त दाखवण्याचा प्रयत्न झाला.
    कृष्ण भक्त असणारे महानुभाव यांच्या पवित्र ग्रंथात लिळाचारित्रात विठ्ठलाचे तुच्छतापूर्वक वर्णन आहे.

    रामायणात राम भक्ताने बुद्धाला चोर म्हटले तश्याच प्रकारे लिळाचरित्रात कृष्ण भक्ताने विठ्ठलाला चोर म्हटले आहे.

    स्कंद पांडुरंग महातम्यातील वर्णनानुसार

    १ श्री. विठ्ठल बालाकृष्ण आहे.

    २ श्री. विठ्ठलाच्या हृदयावर षडाक्षरी मंत्र कोरला आहे ( यांच्या कूट मंत्राचा अनुवाद रा. चि. ढेरे यांनी श्री.कृष्णाय नमः असा केला आहे)

    ३ श्री. विठ्ठलाच्या कपाळावर तृतीय नेत्र आहे

    अशी लक्षणे असलेली मूर्ती माढे येथे स्थापित करण्यात आली. (पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीवर अशी कोणतीच लक्षण नाहीत) परंतु तिला पंढरपूर येथील विठ्ठला एवढ महत्व आलं नाही.

    पृष्ठ ११

    ReplyDelete
  37. ...सर्व आदित्यांमध्ये मी विष्णू आहे....मी रुद्रामध्ये शंकर आहे...(भगवदगीता)

    सौप्तीक पर्वात महादेव अश्वत्थामा याला म्हणतात - कृष्णाने माझी पूजा केली. कृष्णाचा कार्योत्सव मोठा आहे. सत्य युद्धता प्रामाणिकपणा सहनशीलता चातुर्य स्वयंनियंत्रण हे श्री कृष्णाचे गुण आहेत. आता मला श्री कृष्णाहून प्रिय कोणी नाही.

    उपन्याया कडून कृष्णाने शैव पंथाची दीक्षा घेतली

    उपन्याया ब्राह्मणाने आठव्या दिवशी मला शास्त्रानुसार दीक्षा दिली. मी शीर्ष मुंडन केले. धृतमर्दन केले, हाती दंड घेऊन कुशमर्द घेऊन वल्कले धारण केली. कटीमेखला होतीच त्याने प्रायश्चित घेतले. मग त्याला महादेवाचे दर्शन घडले.

    अनुशासन पर्वातील उतारा :-

    पितामह ब्रह्मा पेक्षा हरी हा उच्च आहे. तो शाश्वत पुरुष आहे. तोच कृष्ण. सुवर्णकांती असलेला , मेघहीन आकाशात उगवलेला सूर्य , दश शस्त्रधारी , बलशाली , देवांच्या शत्रू चे नीरदालन करणारा , श्री वत्स लांछन असलेला तोच हा हृषीकेश देवाणीही ज्याची स्तुती करावी असा हा त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेव निर्माण झाला मी ( शिव ) त्याच्या मास्तकातून निर्माण झालो.......

    (हिंदुत्वाचे कोडे - डॉ. आंबेडकर)

    अश्या प्रकारे कृष्ण शिवही आहे व विष्णूही. तो शिवभक्तं हि आहे. आणि शिवही त्याचा भक्त आहे.

    शास्त्राचा आधार आधीच होता कींवा निर्माण केला गेला. याचा उपयोग विठ्ठलाला कृष्ण करण्यात व पुंडरीक लिंगाला तेथे स्थापना करण्यास हातभार लागला.

    या सर्व गोष्टी करून सुद्धा विठ्ठलाच लोकांमधील स्थान त्यांना हलवता आलं नाही. त्याच स्थान तेच राहील जे आधी होत. त्याच्या स्वरूपा मध्ये बदल करण्यात मात्र (आर्य) हिंदू धर्मीय यशस्वी ठरले.

    अतिवादी नव्हे शुद्ध या बिजाचा । ओळखा जातीचा अंत्यज तो ।।

    पृष्ठ १२

    ReplyDelete
  38. लेखाच्या सुरुवातीलाच विठ्ठल नावाची व्युत्पत्ती बघत असताना वि. का. राजवाडे यांनी दिलेली व्युत्पत्ती विठ्ठल नावाच्या सर्वात जवळ जाणारी आहे हे आधीच सांगितलेलं आहे.

    पुन्हा एकदा त्यांनी दिलेली व्युत्पत्ती आपण पाहूया.

    त्यांनी विठ्ठल हा विष्ठल म्हणजे दूर रानावनातील जागा यातून निष्पादावा असे म्हटलेलं आहे.

    विष्टि + ठल (पाली शब्द) = विष्ठल (विठ्ठल)

    पद्म पुराणात पुंडरिकाची जी कथा आली आहे त्या कथेत पुंडरिकाने विष्णूला बसायला दिलेल्या आसनासाठी "विष्टिर" हा शब्द वापरलेला आहे. (विष्टिरे तं निवेशितमं | २१५.२१)

    विष्टि चा अर्थ सांगताना कॉ. शरद पाटील यांनी म्हटलेले आहे:-

    विष्टिचा अर्थ सामंत प्रथाकाळात वेठबिगार असा होऊ लागला तरी अर्थशास्त्राने त्याचा मूळ अर्थ जतन केलेला आहे. विष्टी म्हणजे दासश्रम.

    डॉ. पी. ए. गवळी यांनी देखील बेगार पर्शियन शब्द किंवा वेठ (संस्कृत विष्टी चे रूपांतर) यांनी मिळून वेठबिगारी ही संकल्पना तयार झालेली आहे असे म्हटलेलं आहे.

    विष्टिच नारकीय जीवन यातना, तीव्र वेदना, पीडा, बाधा, व्यथा, कष्ट, प्रसूती वेदना, इ. दुखानी भरल्याचे अमरकोष म्हणतो (४६५-४६७)

    वि. का. राजवाडे यांनी केलेली विठ्ठल शब्दाची व्युत्पत्ती व त्याचा दिलेला अर्थ ( दूर रानावनातील जागा म्हणजे गावाबाहेरील जागा असेही आपण म्हणू शकतो) शरद पाटील यांनी विष्टी चा दिलेला अर्थ अमरकोष मधील विष्टी बद्दल माहिती यामुळे विठ्ठलाचा संबंध अंत्यजांशी असावा असे वाटते.

    वेठबिगारीच्या तापदायक रुढीमुळे कित्येक अस्पृश्याना गाव सोडून जावे लागे (प्रस्तावना - गंगाधर पानतावणे , पेशवेकालिन गुलामी व अस्पृश्यता)

    पृष्ठ १३

    ReplyDelete
  39. बेगार म्हटले की महार पाहिजेच. तो नसेल तर बायको ती नसेल तर म्हातारा म्हातारी लहान मुलं रात्री-बेरात्री परंतु हजर पाहिजेच.

    अर्थशास्रानुसार (२:३१) खालील व्यक्तीची विष्टी वा वेठबिगार बनते.

    मार्जक - झाडूवाला

    आरक्षक - पहारेकरी

    धारक - वजन करणारा

    मापक - मापाडी ( चर्मकार ?)

    ......

    ......


    यातील महार म्हणजे जे आरक्षक म्हणून होते व त्या क्षेत्रात त्यांची पदोन्नती होऊन आरक्षकांचा प्रमुख (नायक) महाआरक्षक = महारक्षक = महार म्हणवला गेला. पुढे हीच पदवी प्राप्त करणार्याची जात बनलेली आपणास दिसते.

    पंढरपुरात मिळालेल्या प्राचीन लेखाचा डॉ. श. गो. तुळपुळे यांनी दिलेला मतितार्थ असा :-

    "श्री. शालिवाहन सौर शके १११ या वर्ष सौम्य संवत्सरी, शुक्रवार दिनी समस्त चक्रवर्ती (भिल्लम यादव राज्य करीत असताना) महाजन देव परिवार, मुद्रहस्त विठठ्ल देव नायक या सर्वानी (हे) लहान असे देऊळ (स्थापिलें)"

    हा लेख पंढरपुरात मिळाला आहे. त्या काळी पंढरपुरात दुसरी सुद्धा मंदिर असू शकतात. त्यामुळे त्या लेखात जे विठ्ठल देव नायक म्हणून जे नाव आहे ते विठ्ठल मंदिराचा निर्देश करण्याच्या हेतूनं दिलेलं आहे अर्थात ते नाव विठ्ठलाचे असावे असे वाटते. आणि नसले तरी त्याच्या पुढच्या वंशजाचे असावे.

    महारांच्या मागे लागणारा नाक हा शब्द नायक (नाईक) शब्दाचा अपभ्रंश असावा असे कित्येक विद्वानांच मत आहे.

    तर काहींच्या मते नाग या शब्दाचा अपभ्रंश नाक आहे

    महाभारताच्या शांतीपर्वात (१०९-९) अंत्यजांचा उल्लेख सैनिक असे करण्यात आला आहे.

    पृष्ठ १४

    ReplyDelete
  40. कोरेगाव युद्धात महारानी जो पराक्रम गाजवला त्यातील काही नावे पुढील प्रमाणे :-

    १ सोमनाक कमळनाक नाईक

    २ रायनाक येसनाक नाईक

    ३ ......

    ४......


    जोहार हा एक प्रभावशाली शब्द आज महारातच आहे. व तो त्यांच्या पुरातन महार संस्कृतीशी निगडीत आहे.

    जोहार हा महारात अभिवादन करण्याचा प्रकार आहे. हा त्या जातिशिवाय इतर दुसर्या कोणत्याच जातीत आढळून येत नाही.

    ज्ञानेश्वरांपासून ते तुकारामांपर्यंत जोहाराचा वापर सर्वांनी केला.

    संत एकनाथांची जोहार कविता प्रसिद्ध आहे.

    ज्ञानेश्वरांनी जोहार रूपक प्रसिद्ध केलं आहे.

    तुकाराम महाराजानी जोहार लिहिले आहे.

    या संतांपैकी कुणीही महार नसताना त्यांना जोहार आपलासा करावा का वाटल असेल बरे ?

    ब्राह्मण तो नव्हे, सत्य त्याचे वेळे घडीला व्यभिचार । मातेशी व्यवहार अंत्यजाचा ।।

    ता. १५ मे २००३ रात्री गोपाळ कृष्ण नावाच्या ब्राह्मणाने पंढरपूरला तीर्थ कुंडात लघवी केली.

    (पकडला गेल्यावर त्याने आमची हीच परंपरा आहे असे सांगितले असे वाचनात आले परंतु या गोष्टीला माझ्याकडे भक्कम पुरावा नाही.)

    प्रेत बाहेर घालिजे । का अंत्यजू संभाषण त्याजिजे । हे असो हाते क्षाळिजे । कश्मळाते ।
    पृष्ठ १५

    ReplyDelete
  41. प्रेताला स्पर्श करू नये , परंतु त्यास बाहेर काढण्याकरिता जसा स्पर्श करावा लागतो; अथवा अंत्यजाशी बोलू नये परंतु अंत्यजाचा त्याग करण्याकरिता ' दूर हो ' म्हणून बोलावे लागते. विष्ठेला हात लावू नये परंतु शौचाचे वेळी हाताने मळाला धुतले पाहिजे.

    ज्ञानेश्वरांसारख्या संताने अस्पृश्यांचा उल्लेख शौचाशी , विष्ठेशी केला आहे हे ध्यानी धरावे.

    ब्राह्मणांचे तीर्थ जे नर सेविती । हरिहर येती वंदावया ।

    विठ्ठलाचा बाट काढन्याची परंपरा सुद्धा पंढरपूर ला आहे

    या परंपरांचा अर्थ विठ्ठल खरोखरच अंत्यज होता. त्याची कीर्ती संपवता आली नाही म्हणून त्याच मूळ रूप बदलून आपल्या ताब्यात घेऊन त्याला अश्याप्रकारे भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला.

    देहास विटाळ म्हणती सकळ । आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध ।

    पंढरपूर लक्ष्मी तिर्थाजवळ दिंडीर वन नावाचे ठिकाण आहे. या दिंडीरवनाच्या अवती भोवतीअस्पृश्यांची वस्ती आहे. या वस्तीजवळ लखूबाई नावाच्या देवीचे ठिकाण असून हि लखूबाई म्हणजेच कृष्णावर रुसून आलेली रुक्मिणी असे म्हणतात.
    (रा.चि. ढेरे - विठ्ठल एक महासमन्वय)

    1835 साली भारत सरकारने जी अस्पृश्य समाजाची यादी तयार केलि होती. त्या यादिमध्ये मुंबई प्रांतात आढळणारी विठोलिया नावाची एक अस्पृश्य जात आहे

    अश्या प्रकारे अंत्यजांचा संबंध विठ्ठलाशी येतो.

    महाड जवळची पांडव लेणी त्या लेण्यांवर ताबा महारांचाच होता. प्रतिवर्षी कोजागिरी पौर्णिमेला किती तरी महार स्त्री पुरुष लेण्यांवर जातात , खातात ,पितात, नाचतात रात्रभर मुक्काम करतात
    (महाडचा मुक्तिसंग्राम - प्रा. राम बिवलकर)

    पृष्ठ १६

    ReplyDelete
  42. वेरुळला असलेल्या बौद्ध लेण्यांना धेड लेणी किंवा महार लेणी म्हटले जाते. धेड हा शब्द थेर (थेरिगाथा) ह्या बौद्ध शब्दापासून बनलेला आहे

    कान्हेरी लेण्यातील शिलालेखात नकनाक , अपरनाक, धमनाक , गोलनाक , व मित नाक यांचा उल्लेख आहे

    कार्ले लेण्यातील शिलालेखात महारठी अगिमितनाक , मित्तदेवनाक , उसभनाक यांचा उल्लेख आहे.

    महारठीय हे शब्द त्यांचं महार पद दर्शवणारे असावे. परंतु त्याचा संबंध काही अभ्यासक मराठा या जातीशी जोडतात.

    डॉ. आंबेडकर यांनी आपल्या अस्पृश्य मूळचे कोण ? या ग्रंथात अस्पृश्य (अंत्यज) हे ब्रोकन मॅन लोक होते व ते बौद्ध धर्मी होते हे साधार सिद्ध केलेले आहे.

    बौद्ध धर्मात महायान पंथाच्या निर्मितीनंतर बोधिसत्वांना फार महत्व प्राप्त झाले. हे बोधीसत्व समाजाच्या वेगवेगळ्या घटकातून निर्माण झाले होते.

    नागार्जुनाला महायान पंथीयांचा मानसपिता, महायान विचारसरणीचा जनक मानले जाते. चीन, जपान, तिबेट मधील बौद्ध त्यांना द्वितीय बौद्धच मानतात.

    असंग व वसुबंधु इ.स.४ थ्या शतकात, दिन्नाग ५ व्या शतकात, धर्मकीर्ती ७ व्या शतकात होऊन गेलेले महान बौद्ध विचारवंत होते. ८ व्या शतकात होऊन गेलेले आचार्य पद्मसंभव यांनाही बुद्ध मानले गेले.

    असाच मल्लांमध्ये होऊन गेलेला एक बोधिसत्व होता. त्यालाही बुद्धच मानलं गेलं. त्याच खर नाव जरी आपल्यासमोर नसले तरी तो आता पांडुरंग-विठ्ठल या नावाने ओळखला जातो.

    विठ्ठल अंत्यजांमधील महायानी बौद्ध श्रमण (बोधिसत्व) होता. म्हणून विठ्ठल हे नाव त्याच अंत्यज रूप दर्शवितं तर पांडुरंग हे नाव त्याच बौद्ध रूप.

    पृष्ठ १७

    ReplyDelete
  43. संदर्भ :-

    १ पंढरीचा पांडुरंग बोधिसत्व होता - डॉ. जावळे बी. जी.

    २ विठ्ठलाचा नवा शोध - संजय सोनवणी

    ३ जगन्नाथ पुरी हे प्राचीन बौद्ध क्षेत्र - बबन लव्हात्रे

    ४ मासिक - मार्च/एप्रिल २०१३ - भारतीय जनता - संत साहित्य आणि डॉ. आंबेडकर - प्रा. अरुण कांबळे

    ५ आद्य शंकराचार्य जीवन आणि विचार - तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी

    ६ हिंदुत्वाचे कोडे - डॉ. आंबेडकर

    ७ दास शुद्रांची गुलामगिरी खंड १: भाग १ - कॉ. शरद पाटील

    ८ पेशवेकालीन गुलामी व अस्पृश्यता - डॉ. पी. ए. गवळी

    ९ अस्पृश्य मूळचे कोण ? - डॉ. आंबेडकर

    १० महार एक शूर जात - शी. भा. गायसमुद्रे

    ११ महार कोण होते ? - संजय सोनवणी

    १२ महाराष्ट्राचा महार - वि. तू. जाधव

    १३ हिंदू विरुद्ध वैदिक - पार्थ पोळके

    १४ हिंदी संस्कृती आणि अहिंसा - धर्मानंद कोसंबी

    १५ महाराष्ट्रातील बौद्ध धम्माचा इतिहास - मां. शं. मोरे

    १६ श्री. विठ्ठल : एक महासमन्वय - रां. ची. ढेरे

    १७ दक्षिणेचा लोकदेव श्री. खंडोबा - रां. ची. ढेरे


    (विशेष टीप :- या लेखाचा उद्देश बौद्ध अनुयायांना विठठलाचा भक्त बनवणे हा नसून बौद्धांच्या विरूद्ध जी प्रतीक्रान्ती घडवली गेली. जिच्यात अनेक बौद्ध विहारांचे मंदिरात रूपांतर करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून विठ्ठल मंदिराच सत्य शोधनाचा हा प्रयत्न होता)

    पृष्ठ १८


    सौजन्य: सत्यशोधक

    समाप्त

    ReplyDelete
  44. वरील लांबलचक प्रतिक्रिया खुपच उद्बोधक वाटली, मूळ लेखासारखी किमान एकतर्फी तरी नव्हती. खूप माहित नसलेली माहिती मिळाली. धन्यवाद "सत्यशोधक"

    संजय कासेगावकर

    ReplyDelete
  45. कानडा राजा पंढरीचा.........


    कानडा राजा पंढरीचा
    नाही कळला अंतःपार याचा

    निराकार तो निर्गुण ईश्वर
    कसा प्रकटला असा विटेवर
    उभय ठेविले हात कटिवर
    पुतळा चैतन्याचा

    परब्रम्ह हे भक्तांसाठी
    मुके ठाकले भीमेकाठी

    उभा राहिला भाव सावयव
    जणु की पुंडलिकाचा

    हा नाम्याची खीर चाखतो
    चोखोबांची गुरे रखतो
    पुरंदराचा हा परमात्मा
    वाली दामाजीचा

    -ग. दि. माडगूळकर

    ReplyDelete
  46. लीळाचरित्राच्या ज्या लीलेत विठ्ठलाचा तुच्छतापूर्वक उल्लेख केलेला आहे, ती लीला अपभ्रष्ट आहे,हे त्या लीलेवरूनच स्पष्ट होते. डॉ. वि.भी. कोलते यांनी हेच स्पष्ट केलेले आहे. लीळाचरित्रात विठ्ठलाला वीर म्हटलेले आहे. गाईंचे संरक्षण करताना हा वीर हुतात्मा झाला, असा गौरवपूर्ण उल्लेख लीळाचरित्रात आलेला आहे. डॉ. रा.चि. ढेरे यांना हे मान्य नाही. त्यांच्या मते एवढ्या साध्या घटनेतून एवढे मोठे महात्म्य निर्माण होऊ शकणार नाही. खरे तर असा युक्तिवाद ढेरेसारख्या विद्वानांना शोभत नाही.
    प्राचीन काळी इथला समाज प्रामुख्याने पशुपालक होता. म्हणूनच या समाजाच्या दृष्टीने पशुपालन व पशुसंरक्षण ही कामे सगळ्यात महत्त्वाची ठरणे स्वाभाविक ठरणार नाही काय?
    खरे तर महाराष्ट्रातील सर्वच लोकदैवते ही पशुपालक समाजाची नायक असावीत. म्हणूनच त्याना एवढे महत्त्व प्राप्त झालेले आहे. एवढ्या महत्त्वाची दैवते सर्वच धार्मिक गटांना आपलीच असणे आवश्यक वाटणे स्वाभाविक नाही काय?

    ReplyDelete
  47. Sanjay Sonawani sir need to more study..

    ReplyDelete
  48. फार साधकबाधक चर्चा
    वाचुन फार बरे वाटले
    नवनवीन माहीती मिळाली

    पौंड्रकपुर (पंढरपुर) हे तर्कसंगत वाटते

    ReplyDelete
  49. आता रखुमाई कोण होत्या ? त्या शब्दाची व्युत्पत्ती काय ? यावरही संशोधन होऊ द्या की.मला वाटतं अद्भुत इतिहास बाहेर येईल.वैदिकांनी केलेली प्रतिक्रांतीच जबाबदार असेल ह्या सगळ्याला.वैदिकांनी नुसत्या सर्वांच्या देवता hijack केल्यात ह्याच निष्कर्षावर येऊया आपण.तुम्ही जर ह्या अश्या तर्कांना संशोधन म्हणत असाल तर well and good. राहा आपल्याच कोषात. वर काही जणांनी अभंगांचा उल्लेख दिलाय त्यात बौद्ध/बुद्ध शब्द आलाय असं सांगितलंय.आणि तेवढ्याच ओळी दिल्यात , जर पूर्ण अभंग दिले असते तर अर्थ कळला असता ना, दिशाभूल करता आली नसती.पण जर मूळ अभंग बघितले तर तो शब्द बोध्य असा आहे. आता बोध्य चा अर्थ काय होतो हे शोधा. सुतावरून स्वर्ग गाठण्याची सवयच झाली आहे.

    ReplyDelete
  50. वा खूपच छान, एकूणच तुम्ही सर्व "बुद्ध" जीवी कोण, तुमचे विचार काय आणि तुमचा सगळा हेतू काय हे सर्व काही उमगलं, माझा एकच प्रश्न आहे की हे बुद्ध आधी कोण होते बौद्ध की हिंदू बस्स..

    ReplyDelete
  51. आषाढी व कार्तिकी ला पशुपालक समाज येथे मध्यअश्मयुगीन काळापासून यात्रा करत आहे.

    ReplyDelete
  52. विट्ठल पांडुरंग यांची उत्पत्ती कुठून व कशी झाली याबाबत फार छान विवेचन केले आहे पण रुख्मिणी बाबत आपण कोणतेही स्पष्टीकरण केले नाही.आपला अभ्यास अपुरा वाटतो.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...