Sunday, September 1, 2013

सांस्कृतिक अध:पतन; आमची जबाबदारी?

जागतिकीकरणाची सुरुवात होण्यापुर्वीचा भारत आणि नंतरचा भारत याची नुसती वरवर जरी तुलना केली तरी दोन्ही कालखंड सांस्कृतीकदृष्ट्या पुर्णतया विरोधाभासी आहेत हे सहज लक्षात येईल. १९९२ नंतर भारतीय जीवनाचे आर्थिक व सांस्कृतीक संदर्भ वेगात बदलले गेले. आता त्याची गती भोवळ आणेल एवढी वाढलेली आहे. अलीकडेच झालेली नरेंद्र दाभोळकरांची हत्या, महिला पत्रकारावरील व मतीमंद मुलींवर झालेले बलात्कार आणि आता संत म्हणवणा-या आसारामबापुला अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याबद्दल झालेली कोठडी आणि आसारामबापुच्या भक्तांनी घातलेला हैदोस आपल्या सांस्कृतीक पातळीने केवढा रसातळ गाठला आहे याचे हे विदारक चित्र आहे.

धर्म हा मानवी जीवनाला एक मानसिक आधार देणारा पुरातन काळापासुनचा अपरिहार्य घटक आहे. श्रद्धेने आपण संकटांतून तारून जावू असा विश्वास नाही अशी माणसे भुतलावर अत्यंत अल्पच असतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत एक अत्यंत धुसर सीमारेषा असते हेही आपल्या सहज लक्षात येईल. असे असले तरी श्रद्धांचे अवडंबर माजवले जावू लागले कि त्या भिषण अंधश्रद्धांत बदलतात आणि तेथेच धर्म नामक संकल्पनेचे अध:पतन सुरु होते. जागतिकीकरणाच्या विज्ञाननिष्ठ काळात सहजीवनाचे, सहिष्णुतेचे आणि जातीभेदातीत जागतिक समाजाचे जे विचारवंतांचे स्वप्न होते ते इतके कोसळत गेले कि १९९२ पुर्वीचा भारत गरीब व आधुनिक तंत्रज्ञानांपासून दूर असला तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अधिक बलशाली होता असेच म्हणायची वेळ आलेली आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकांत मी खेड्यातच राहिलो आहे. तेंव्हा जातीभेद असले तरी सामाजिक जीवन बव्हंशी सहिष्णुच होते. एकमेकांच्या मदतीला धावून जायची प्रवृत्ती होती. इर्जिकी होत असत. आजचे ग्रामीण वास्तव एवढे बदलले आहे कि जातीच्या कुबड्यांखेरीज उभे राहणे जवळपआस अशक्य झाले आहे. जातिसंस्था नष्ट होण्याऐवजी बळकट व अत्यंत असहिष्णू झाली आहे असे चित्र आपल्याला दिसते.

बुवा-बापू-प्रवचनकार-किर्तनकार तेंव्हा नव्हते असे नाही. परंतू त्यांना ब-याच प्रमाणात नैतिकतेची चाड होती. सामाजिक ददपणही त्याला कारणीभूत होते. अगदी शिक्षकही खरोखरच निष्ठेने आपला पेशा व त्याची प्रतिष्ठा जपत असत. परंतू आताचे वास्तव पाहिले तर बुवा-बापुंचा आध्यात्मिक धंदा पुर्णतया अर्थनिष्ठ बनलेला आहे. तो एक अवाढव्य उद्योग बनलेला आहे. आध्यात्मिकतेची जागा स्वैराचार आणि नैतिक भ्रष्टाचाराने घेतली आहे. हे धर्मसम्स्कृतीचे अध:पतन नव्हे काय? आणि याला जबाबदार कोण आहेत?

"धर्म ही अफुची गोळी आहे..." असे विधान कार्ल मार्क्सने केले होते. धर्मच नव्हे तर विज्ञान व अर्थसत्ताही जेंव्हा अफुच्या गोळ्या बनू लागत मानवी जीवनाला पुरते नशेत ढकलतात तेंव्हा नैतिकतेचे मापदंड बदलणे अपरिहार्यच होते. ज्या इश्वराने विश्व बनवले असे अध्यात्मवादी-धर्मवादी मानतात त्यालाच सोन्या-चांदीचे मुकुट-सिंहासने अर्पण करणारे, दान-देणग्या देणारे वायफळ भक्त जेंव्हा निर्माण होतात तेंव्हा श्रद्धेचेच मुलार्थ बदललेले असतात. परमेश्वरालाच भिकारी करून टाकणारी हे धर्मव्यवस्था आणि भक्ती सर्वस्वी त्याज्ज्य आहे हे अशा अगणित भक्तांच्या लक्षातही येत नाही. या देवांचे प्रतिनिधी म्हणवना-यांच्या पायी आपले शील  व संपत्ती अर्पण करु पाहणा-यांतच जेंव्हा स्पर्धा निर्माण होते तेंव्हा अशा बुवा-बापुंचे अनैतिक सआहस वाढतच जाणार व त्यातून आसारामबापुकडून घदले तसे प्रकार वाढण्याची संभावनाही बळावणार हे या अंध भक्तांच्या कधीही लक्षात येत नाही. खरे तर असे भक्त हे धर्मांचे व अध्यात्मांचे मारेकरी असतात हे लक्षात घ्यायला हवे.

आधुनिकतेच्या काळात आपला समाज नैतिक भ्रष्टाचाराने ग्रासलेला आहे असे चित्र दिसते. आपल्या संवेदनाही बोथट होत गेल्या आहेत असेही दिसते. याचे कारण म्हणजे अर्थप्राप्तीचे मार्ग नैतीक प्रेरणांनी प्रभावित नसून गैरमार्गांचाच अवलंब वाढलेला आहे. भ्रष्टाचा-यांना आणि अनीतिमानांना आता सामाजिक प्रतिष्ठा आहे. अशी अप्रतिष्ठा करुन घेतलेल्या समाजाला अधिकाधिक हाव असल्याने त्यासाठी अथवा आपले भ्रष्टाचार उघडकीस येवू नये यासाठी अशा बुवा-बापुंची व दैवतश्रद्धांची अधिकची निकड भासते. असे भक्तच मुळात अनीतिमान असल्याने त्यांचे आध्यात्मिक गुरुही त्याहुन अनैतिक असले-बनले तरी आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही. आपल्या सामाजिक अध:पतनाचे ते एक प्रकट रुप आहे एवढेच.

अशी अध:पतने थांबवण्यासाठी जेंव्हा दाभोळकरांसारखे अविरत प्रयत्न करीत असतात त्यांची हत्या होणे अथवा हत्येच्या धमक्या मिळनेही तेवढेच क्रमप्राप्त होऊन जाते. प्रा. हरी नरकेंना व अण्णा हजारेंनाही "तुमचा दाभोळकर करून टाकू" अशा धमक्या अलीकडेच मिळालेल्या आहेत यावरून काय ते लक्षात घ्यावे. म्हणजे विचारांनाच मारून टाकायचा हा हिंसक उद्योग फोफावला आहे असे नाही काय? ज्या देशात गुन्हेगार सुरक्षित आहेत पण विचारवंत सुरक्षित नाहीत त्या देशाचे आणि त्या देशातील समाजांचे काय भवितव्य असणार आहे?

विचारांचा विरोध विचारांनी करावा असे म्हणने सोपे अहे परंतू जेंव्हा समाजातुन विचारच हद्दपार होतो तेंव्हा हत्येसारखी वरकरणी सोपी वाटनारी उत्तरे शोधली जातात. विचारकलहातुनच समाज अग्रगामी राहत असतो, प्रागतिक होत असतो आणि वारंवार स्वत:ला तपासत असतो. नवीन पुराव्यांच्या, संशोधनांच्या प्रकाशात आपली मते बदलत जात असतो. सामाजिक सुधारणा समाजस्वास्थ्यासाठी घडवून आणत असतो. परंतू आपली अवस्था वेगळीच आहे. जाती नष्ट व्हाव्यात असे म्हनणारेच स्वजातीच्या संघटना बांधतात. गतकाळातील स्वजातीय महनियाला पुढे आणीत आपसूक प्रस्थापित महनियांपेक्षा आमचीच महनिये कशी श्रेष्ठ होती याचे हिरीरीने दावे केले जातात. प्रसंगी इतिहासाची तोडमोडही केली जाते. स्वजातीय महनियांची चिकित्सा नाकारली जाते. असा समाज कधीही विवेकी आणि विज्ञाननिष्ठ होवू शकत नाही हे उघड आहे. अशा समाजअत बनतात त्या झुंडी. आज आपण अशा असंख्य झुंडींच्या विळख्यात सापडलेलो आहोत आणि त्याचे निराकरण कसे करायचे असा भयभीत प्रश्न यामुळे निर्माण होतो.

पण स्वजातशक्तीच्याच बळावर जेंव्हा न्याय्य हक्क मिळवावे लागतात आणि मिळतात असे वास्तव बनले असेल तर जातीय संघटनांना तरी कसा विरोध करायचा? मुळात आपली राजकीय व्यवस्था समतेच्या तत्वाचा सिद्धांत पाळते काय? न्याय्य प्रश्नांची उत्तरे जी व्यवस्था देत नाही त्या व्यवस्थेत द्वेषाचे आणि हिंसकतेचे स्तोम माजू लागले कि एक नवी अंधश्रद्धा तयार होवू लागते आणि तिचे निराकरंण करण्यासाठी राजकीय शक्तींनी जेवढे समानतेचे धोरण ठेवायला हवे ते ठेवले नाही कि जातीय अंधश्रद्धा फोफावणे स्वाभाविकच आहे. तिची परिणती अनेकदा हिंसकतेत झालेली आहे हे आपण आजवरच्या विविध सामाजिक प्रश्नांवरील आंदोलनांत पाहिली आहे.

आम्ही अर्थसत्ता आणन्यासाठी अविरत धडपडत आहोत. राजकीय सत्तेतील सहभागाचे महत्व आता नव-जागृत जाती-समाज घटकांना
समजू लागले आहे. आपल्याला एकुनातीलच व्यवस्थेत डावलले जात आहे याचेही भान येवू लागले आहे. ही अस्वस्थता कधी उद्रेकात बदलेल याचा नेम नाही. परंतू साकल्याने विचार करून कायदे करत बसण्यापेक्षा न्याय्य वाटपाचे तत्वच अवलंबले तर किती प्रश्न सुटतील? परंतू शक्य तेवढे दमनच करायचे, शक्य तेवढे शोषणच करायचे अशा प्रवृत्ती बळावल्या आहेत हे आपले एक दुर्दैवी वास्तव आहे.

एकुणात आपण सर्वच घटनांकडे तुकड्यातुकड्यात न पाहता त्यांचे समग्र आकलन करून घ्यायला हवे. आसाराम बापुला अटक झाली अथवा कोठल्या तरी बलात्कार घटनेतले आरोपी पकडले...त्यांना फासावर लटकवा वगैरे मागण्या करून आपली सामाजिक भुमिका व जबाबदारी पार पडत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी आपणा सर्वांनाच आपली विवेकशक्ती वाढवावी लागेल. एकुणातीलच समाजाचे सामाजिक भान वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धर्म आणि निखळ धर्मश्रद्धा कोनाच्याही विरोधाचे विषय नाहीत. धर्माच्याच अंगाने पाहिले तरी या सर्वच घटना धर्मांनीच त्याज्ज्य ठरवलेल्या आहेत, अनीतिमान ठरवल्या आहेत हे धार्मिकांनीही लक्षात घ्यावे लागेल. ईश्वराचा कोणीही दूत, माध्यम अथवा प्रतिनिधी नसतो. असू शकत नाही. मनुष्य आणि परमेश्वर यांच्यात थेट संवाद असू शकतो...मध्यस्थाची गर नाही...असे मध्यस्थ हे भोंदूच असतात याचे भान धार्मिकांनी ठेवायला हवे. नैतीकतेचा उद्धार झाल्याखेरीज तुमच्या धर्माचा कसा उद्धार होवू शकतो?  

यावर प्रकट आणि खुल्या मनाने सर्वांनीच चिंतन केले पाहिजे अन्यथा आमच्याच पुढच्या पिढ्या सर्वार्थाने विनाशपथ चालतील याबाबत शंका बाळगायचे कारण नाही.

12 comments:

  1. माणसाच्या priorities बदलेल्या आहेत. कसेही करून पैसा मिळविणे आणि त्याच्या साह्याने ऐषारामाचे आयुष्य जगणे हे आपले अंतिम ध्येय बनलेले आहे. 'सर्वे गुणा: कांचनम आश्रायन्ति' हा नितीशतकातील श्लोक प्रसिद्ध आहेच. सध्याच्या काळात तर या श्लोकाचा शब्दशः प्रत्यय येतो.
    फक्त पैशाने खरे सुख मिळत नाही. माणूस केवळ भाकरीवर जगू शकत नाही. सांस्कृतिक अंगाच्या समृद्धीमुळेच माणसाच्या प्रगतीला अर्थ प्राप्त होत असतो. टिकाऊ सुखाची प्राप्तीही त्यातूनच होऊ शकते.
    पण हे कोणी कोणाला सांगायचे ? चारित्र्यवान आणि सामाजिक क्षेत्रातील कर्तृत्ववान माणसाच्या वचनाला वजन प्राप्त होत असते. पण ही माणसे आता कुठे आहेत.
    या समाजाला प्रबोधनाची आत्यंतिक आवश्यकता आहे. आणि हे प्रबोधन बालपणापासूनच व्हायला हवे.पण आजच्या शाळा , आजचे शिक्षक आणि शिक्षणाचे व्यापारीकरण करणारे राजकारणी हे आपल्या मनात केवळ नैराश्यच निर्माण करतात.

    ReplyDelete
  2. अण्णा हजारेंनाही "तुमचा दाभोळकर करून टाकू" अशा धमक्या अलीकडेच मिळालेल्या आहेत....


    किसन हजारेला धमकी-युक्त पत्र आल म्हणे पत्र आलं मु.पो. राळेगण सिद्धी येथे आणि किसन आहे सध्या अमेरिकेत .

    पत्राचा मजकूर काय तर ? लष्करी राजवटीची मागणी करा नाही तर तुमचा पण दाभोलकर करू .

    सरळ-सरळ तपास यंत्रनेची दिशाभूल करण्यासाठी करण्यात आलेलं हे कारस्थान आहे . यामुळे फार-फार तर किसान हजारे चर्चेत येईल व त्यालाही गुदगुल्या होतील. तपास यंत्रणेने इकडे तिकडे लक्ष न देता तपासाकडे पूर्ण लक्ष द्यावे व मास्टर माइंड सहित सर्व आरोपी कसे पकडले जातील हे पहावे .

    किसन हजारे ला कोण धमकी देत आहे ? हे महत्वाच नाहीये , म्हतार मजेत आहे सध्या तरी अमेरिकेत गुलछर्रे उडवत आहे

    ReplyDelete
    Replies
    1. Jara Bhasha neet waapra...........te tumchya wayache naahit arey turey karayla

      Delete
  3. कृतिशील विचारवंत

    सदानंद मोरे

    श्रद्धांजली
    नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूमुळे आपल्या समाजाची कधीही भरून येणार नाही अशी हानी झाली आहे. अलीकडच्या काळात आपल्याकडे नरेंद्र दाभोलकर म्हटलं की लोकांना जादूटोणाविरोधी विधेयक एवढंच आठवतं. पण दाभोलकरांचं काम या विधेयकापुरतं मर्यादित नव्हतं. त्यांनी आयुष्यभर अत्यंत व्यापक अशा कामाला स्वत:ला वाहून घेतलं होतं. महाराष्ट्रातल्या लोकांना सुबुद्ध करायचं, त्यांना कोणत्याही गोष्टीचा मुळापासून विचार करायला प्रवृत्त करायचं, त्याआड येणाऱ्या धर्माच्या, जातीच्या चुकीच्या समजुती दूर करायच्या हे दाभोलकरांच्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी सुरू केलेलं समाजप्रबोधनाचं काम दाभोलकरांनीही हातात घेतलं आणि व्यापक जीवनदृष्टीने ते आयुष्यभर पुढे नेलं. त्यासाठी त्यांनी स्वत:ची डॉक्टरकीची प्रॅक्टिसही सोडून दिली. त्यामुळे त्यांना जादूटोणाविरोधी विधेयकापुरतं सीमित करणं योग्य नाही. दाभोलकर त्याच्याही पलीकडे खूप मोठे होते.
    ‘साधना’ साप्ताहिक त्यांनी ज्या पद्धतीने चालवलं, त्याला स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभं केलं, त्याला व्यावसायिक रूप दिलं ते पाहा किंवा सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार घ्या. या अर्थाने डॉ. नरेंद्र दाभोलकर हे आगरकर, कर्वे यांच्या परंपरेतले कृतिशील विचारवंत होते. तात्कालिक आविष्कारातून जादूटोणा विरोधी विधेयकाला होणारा विरोध बघून त्यांचा त्यांना खूप खेद व्हायचा. खूपदा अशी काही विधेयकं असतात, ज्यांचा समाजातल्या काही विशिष्ट घटकांना फायदा होणार असतो. जादूटोणाविरोधी विधेयकामुळे असा कुठल्या एका घटकाचा फायदा होणार नव्हता तर त्यात संपूर्ण समाजाचंच हित होतं. वारकरी समाजाचा या विधेयकाला विरोध आहे, असा एक चुकीचा समज उगीचच पसरवला गेला आहे. वास्तविक तसं कधीच नव्हतं. याबद्दल डॉ. नरेंद्र दाभोलकरांशी माझी नेहमी चर्चाही होत असे. आपल्याकडे धर्म आणि पुरोगामी विचार यांचा एकमेकांना विरोध असतो असं मानण्याची पद्धत आहे. पुरोगामी कार्यकर्ते समाजाची धर्माच्या अस्तित्वाची गरज समजून घेत नाहीत, असं माझं म्हणणं आहे. ते मांडलं जावं, त्यावर चर्चा व्हावी यासाठी दोन महिन्यांपूर्वी पुण्यात पिंपरी चिंचवडला त्यांनी एक सभा घेतली होती. त्यात माझं भाषण ठेवलं होतं. तेव्हाही मी हाच मुद्दा मांडला होता की अंधश्रद्धा निर्मूलन हे संतांचंच काम आहे आणि तुम्ही ते करता आहात त्यामुळे तुम्हाला आमचा, वारकऱ्यांचा विरोध असण्याचं काही कारणच नाही. त्यांनी माझं हे भाषण साप्ताहिक ‘साधना’मध्येही प्रसिद्ध केलं.
    आपल्याबरोबरचे वेगवेगळे मतप्रवाह समजून घ्यायचे, त्यांचा आदर राखायचा याचं उत्तम भान डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना होतं. लोकशाहीत जशी माणसं असणं गरजेचं असतं तसे ते होते. ते सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेत. एखादी गोष्ट पटली नाही तरी कधीही चिडत नसत. युक्तिवाद करायची, चर्चा करायची त्यांची नेहमीच तयारी असे. वादविवाद करताना, तत्त्वांसाठी लढताना त्यांचा कधीही पारा चढला नाही. आपल्या विरोधकांनाही त्यांनी सन्मानाने वागवलं. एकीकडे आपल्या तत्त्वांसाठीचा काटेकोरपणा आणि दुसरीकडे अत्यंत मृदूपणा असं अनोखं मिश्रण त्यांच्या स्वभावात होतं. पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये अनेकदा वाद होत. एकमेकांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होत अशा वेळी दाभोलकर स्वत: ते वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेत. मी हा अनुभव घेतला आहे. काही कारणाने माझ्यामध्ये आणि आ. ह. साळुंखे यांच्यात वाद निर्माण झाला होता. आम्ही एकमेकांविरोधी लिखाणही केलं होतं. त्याचा कार्यकर्त्यांवर परिणाम व्हायला लागला होता. तेव्हा दाभोलकरांनी पुढाकार घेऊन बाबा आढाव, डॉ. श्रीराम लागू, पुष्पा भावे आणि अनेकांना बोलवून एक बैठक घेतली होती आणि सामाजिक काम करणाऱ्यांनी एकमेकांबद्दल स्नेहबंध ठेवला पाहिजे असा मुद्दा मांडला होता. वास्तविक या सगळ्यात त्यांचा वैयक्तिक फायदा काहीच नव्हता, पण त्यांची ही तळमळ मला महत्त्वाची वाटते.
    ते नेहमी अत्यंत व्यग्र असत. सतत फिरती, वेगवेगळी कामं पण या व्यस्त दिनचर्येतूनही त्यांनी स्वत:ला फिट ठेवलं होतं. सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचा हा आदर्श ठेवायला हवा.
    डॉ. नरेंद्र दाभोलकरांची ज्या पद्धतीने गोळ्या घालून हत्या झाली आहे ती फुले आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. यामुळे लोक जाहीरपणे आपली भूमिका मांडायला बिचकतील. आपल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी संघर्ष करण्यापेक्षा सोपे मार्ग स्वीकारायला सुरुवात करतील हे दाभोलकरांच्या जाण्यामुळे होऊ घातलेलं मोठं नुकसान आहे.

    ReplyDelete
  4. शरमिंदा महाराष्ट्र !

    विनायक परब

    मथितार्थ
    ‘महाराष्ट्र म्हणजे महान राष्ट्र’ अशा फुकाच्या गप्पा आता पुरे झाल्या.. वस्तुस्थिती काही वेगळीच आहे, असे गेल्या आठवडय़ाभरातील घटनांनी आपल्या साऱ्यांनाच दाखवून दिले आहे. संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे ती महाराष्ट्रामध्ये घडलेल्या दोन निर्घृण अशा घटनांची. देशातील कोणतीही दूरचित्रवाणी वाहिनी पाहा किंवा मग वर्तमानपत्र उघडून पाहा महाराष्ट्रातील या दोन घटनांचा उल्लेख हा पहिल्या पानावरच आहे किंवा ठळक बातम्यांमध्ये आहे. यातील मुंबई बलात्काराच्या बातमीने तर आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत प्रसारमाध्यमांचेही लक्ष वळवले आहे. या बातम्यांमुळे राज्याचे नाव जगभरात पोहोचले, पण ते वाईट आणि नको त्या कारणांसाठी. गेल्या आठवडय़ाभरात महाराष्ट्रातील दोन घटनांनी सर्वानाच सुन्न केले. त्यातील पहिली घटना होती ती अंधश्रद्धा निर्मूलनाचे मूलगामी कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची. हा मजकूर लिहीत असेपर्यंत तरी दाभोलकर यांच्या गुन्हेगारांचा ठाव पोलिसांना कळलेला नव्हता. त्यांची हत्या म्हणजे स्वत:ला पुरोगामी म्हणविणाऱ्या महाराष्ट्रावर लागलेला कलंकच आहे. डॉ. दाभोलकर यांचे कार्य जाणून घेऊन आधुनिक नवनिर्माणाच्या दिशेने नेणाऱ्या त्यांच्या त्या समाजकार्यात सहभागी होण्याऐवजी अनेकांनी ते धर्मविरोधी असल्याची बतावणी करून त्यांना नाहक बदनाम करण्याचेच काम अधिक केले. डॉ. दाभोलकर यांनी धर्म आणि श्रद्धा या दोन्हीही बाबींचे अस्तित्व कधीही नाकारले नाही. मात्र अंधश्रद्धेच्या ते ठाम विरोधात होते. अंधश्रद्धेलाच श्रद्धा सांगून त्यावर स्वत:ची पोळी भाजत समाजाला मध्ययुगाच्या दिशेने नेणाऱ्या प्रथांना त्यांचा ठाम विरोध होता, कारण या प्रथा समाजविघातकच आहेत. पण त्यांच्या कार्याला पाठिंबा तर सोडाच त्याला विरोध करण्यातच अनेकांनी धन्यता मानली. असे असले तरीही आज महाराष्ट्रात उभे राहिलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य पाहता, सक्षम आधुनिक समाजाच्या दिशेने वाटचाल करू इच्छिणाराही वर्ग आता मोठा होतो आहे, याचे समाधान आहे. दाभोलकरांच्या कार्याला राजकीय विरोधही मोठय़ा प्रमाणावर झाला. अर्थात या विरोधामागे मतांचे आणि गुंतलेल्या हितसंबंधांचे राजकारण हेच प्रमुख कारण आहे. अन्यथा समाजाच्या भल्यासाठी लढणाऱ्या डॉ. दाभोलकर यांना राजकीय विरोध होण्याचे काहीच कारण नव्हते. पण त्यांना पाठिंबा दिला असता तर अनेकांनी देवाधर्माच्या नावाने उघडलेली दुकाने बंद करावी लागली असती. सध्या जात- पात, देव- धर्म यांच्याच बळावर तर राजकारण सुरू आहे. डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर पन्नासहून अधिक पोलीस तपास पथकांची निर्मिती करणाऱ्या राज्य सरकारला अद्याप आठवडा उलटल्यानंतरही गुन्हेगारांचा सुगावा न लागणे यामागे आता राजकीय वास येऊ लागला आहे. पुढील वर्षी निवडणुका आहेत, त्यामुळे आता प्रत्येक गणित राजकीय पटावर मांडले जाते ते निवडणुका नजरेसमोर ठेवूनच. त्यामुळे निवडणुकांतील राजकीय गणिते नजरेसमोर ठेवून तर तपासाला राजकीय दिशा देण्याचा प्रयत्न होतोय का, याचाही तपास करण्याची गरज आहे. विरोधात येणारा प्रत्येक आवाज दाबून टाकला जाईल, हाच संदेश डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांनी दिला आहे. हा संदेश पुसून टाकून नवा संदेश लिहिण्याची गरज आहे. त्यासाठी आजवरचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कामाचा राहिलेला वेग आता अनेक पटींनी वाढावा लागेल. गणेश मूर्ती तलावात विसर्जित न करता त्या दान करण्याची मोहीम असो अथवा एक गाव एक गणपती मोहीम असो या समाज हिताच्याच मोहिमा आहेत. मारेकऱ्यांनाही थेट संदेश द्यायचा असेल तर आता येणाऱ्या काळात प्रत्येक समाजहितैषी व्यक्तीला दाभोलकर व्हावे लागेल.

    ReplyDelete
  5. शरमिंदा महाराष्ट्र !CONT................

    एका बाजूला दाभोलकर यांच्या निर्घृण हत्येची घटना घडलेली असताना दुसरीकडे सर्वानाच दिल्ली बलात्कार प्रकरणाची आठवण व्हावी, अशी घटना मुंबईत घडली. महालक्ष्मी परिसरातील पडक्या शक्ती मिल कंपाऊंडमध्ये छायाचित्रण व वार्ताकनासाठी गेलेल्या महिला वृत्तछायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील सर्व आरोपींना पोलिसांना लगेचच चार दिवसांत पकडलेही. त्यानंतर पोलिसांचा आव आपणच आपली पाठ थोपटून घेण्याचा होता. वास्तविक या प्रकरणात कोणतेही राजकीय हितसंबंध गुंतलेले नसावेत असे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे पोलिसांना हे आरोपी तीन दिवसात सापडले, पण दाभोलकर खून प्रकरणातील राजकीय संवेदनशीलतेमुळे, राजकीय हितसंबंधांमुळे त्यांच्या हाती काहीच लागलेले नाही. म्हणूनच ही घटना स्वतकडे असलेले कौशल्य सिद्ध करणारी नाही तर संपूर्ण राज्याच्या दृष्टीने मान लाजेने खाली घालायला लावणारी आहे, याचे भान पोलिसांनी ठेवले पाहिजे. पोलिसांचा असलेला दरारा या राज्याच्या राजधानीतच राहिलेला नाही, हेच ही घटना सांगून जाते. या घटनेच्या आदल्याच दिवशी अमेरिकन महिलेवर मुंबईत लोकल गाडीमध्ये ब्लेडने हल्ला करण्यात आला. या घटनेनंतरही घाटकोपर, गोरेगाव आदी ठिकाणी बलात्काराच्या घटना घडल्या. हे भूषणावह नव्हे तर लज्जास्पदच आहे.
    या घटनेच्या वेळेस आणखी एक महत्त्वाची बाब लक्षात आली, त्याकडेही समाजाचे लक्ष वेधणे हे महत्त्वाचे आहे. सध्या प्रसारमाध्यमांमध्ये जबरदस्त गळेकापू स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेगळे काही तरी करण्याचा किंवा वेगळी बातमी देत इतरांपेक्षा दोन पावले पुढे राहण्याचा प्रयत्न करतो. यात चूक काहीच नाही. पण ते करताना आपण घोडचुका करत आहोत, याचे भान प्रसारमाध्यमांनाही राहिलेले नाही, असे या घटनेच्या वेळेस लक्षात आले. पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार गुन्हेगारांची रेखाचित्रे तयार करण्यात आली आणि ती प्रसृत केली गेली. रेखाचित्रांचा उद्देशच आरोपींना पकडणे हा असल्याने ती प्रसृत होणे साहजिक आहे. पण त्यानंतर एका वर्तमानपत्राने त्यांची खरीखुरी छायाचित्रे प्रसिद्ध केली. एखादी वाईट गोष्ट घडली की, त्या विरोधात समाजामध्ये उद्वेग, संताप व्यक्त होणे साहजिक असते. अशा वेळेस समाजाची प्रतिक्रिया ही कितीही खदखद व्यक्त करणारी असली तरी पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांना मात्र मर्यादाभंग करून चालत नाही. गुन्हेगारांची छायाचित्रे या प्रकरणात प्रसिद्ध झाल्यानंतर समाजातील प्रतिक्रिया ही त्या प्रसिद्धीचे स्वागत करणारी होती. ‘बरे झाले फोटो छापले ते, कारण नराधम कोण आहेत हे कळायलाच हवे होते’ अशा आशयाची ही प्रतिक्रिया होती. पण अशा प्रकारे ओळख परेड होण्याआधीच आपण गुन्हेगार आरोपींचे फोटो प्रकाशित करतो, त्यावेळेस आपणच खटला कमकुवत करत असतो. ओळख परेडच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत, म्हणून तर आरोपींना पकडल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये पोलिसांनी त्यांचे चेहरे कपडय़ांनी झाकण्याची प्रथा सुरू झाली. फोटो आधीच प्रकाशित झालेले असतील किंवा त्यांची ओळख आधीच एखाद्या कृत्याने झालेली असेल तर अशा वेळेस त्याचा फायदा मिळून आरोपी सुटतात. आपल्याला आरोपींना किंवा त्या गुन्हेगारांना कठोर शासन व्हावे, असे अपेक्षित असेल तर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश लक्षात घेऊन आपण ओळख परेड होऊन त्याची व्यवस्थित कायदेशीर नोंद होईपर्यंत तरी वाट पाहायलाच हवी. पण या संवेदनशील प्रकरणामध्ये प्रसारमाध्यमांनी भावनिक होऊन ते भान राखलेले नाही. प्रसारमाध्यमांचे एक महत्त्वाचे कार्य हे समाजप्रबोधनाचे असते. त्यामुळे समाज भावनिक झाला तरी त्यांनी स्वतचे भान न सोडणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.

    ReplyDelete
  6. शरमिंदा महाराष्ट्र !CONT................

    या घटनेमधील समोर आलेली एक सकारात्मक गोष्ट म्हणजे पीडित मुलगी अतिशय धैर्याने या घटनेला सामोरी गेली. ‘मी पुन्हा जोमाने उभी राहीन’ हे तिचे शब्द धीरोदात्त असेच आहेत. केवळ तीच नव्हे तर तिच्या कुटुंबियांनाही एक चांगला आदर्श समोर ठेवला आहे. या घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. त्यात ही माता केवळ स्वतच्या नव्हे तर समाजातील सर्वच महिलांच्या वतीने बोलली आहे. ती आई म्हणते, ‘न्याय मिळवण्याच्या लढाईत केवळ माझ्या मुलीच्याच नव्हे तर समाजातील प्रत्येक पीडित मुलीच्या व तिच्या कुटुंबीयांच्या मागे सर्वानी खंबीरपणे उभे राहावे. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य केलेल्या नराधमांना कठोर शिक्षा जलदगतीने झाली तर कोणीही विकृत मनुष्य असे अमानवी व संवेदनाशून्य कृत्य करण्यास धजावणार नाही. माझ्या मुलीसह देशभरातील मुलींना न्यायहक्कासाठी लढताना सर्वाचाच खंबीर पाठिंबा हवा आहे.’ बलात्काराच्या घटनेत पीडित महिलेची चूक काहीच नसते, पण समाज तिला आणि तिच्या कुटुंबीयांना वाळीत टाकतो, जणू काही त्यांचीच चूक आहे, असे म्हणत. समाजाची ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रस्तुत प्रकरणात मुलीचे कुटुंबीय ठामपणे तिच्यासोबत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कारण आजवर आपण संबंधित सर्वाचाच धीर खचल्याचे पाहिले आहे. आईने निवेदन करताना केवळ आपल्या मुलीच्या नव्हे तर सर्व पीडित मुलींच्या बाजूने समाजाने उभे राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कारण अशा घटनांमध्ये सोबत न देणाऱ्या समाजाच्या भेदक वास्तवाची त्या मातेला जाण असावी. त्यांना निवेदनात अशी आशा व्यक्त करावी लागणे हे मात्र समाज म्हणून आपण चुकतो आहोत, याची जाणीव करून देणारे आहे. एका आईला समदुखींसाठी असे व्यक्त व्हावे लागणे हे समाजासाठी लांछनास्पद आहे. एका पाठोपाठ एक अशा घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली आहे!
    END.

    ReplyDelete
  7. यासाठी मूल्यशिक्षण हाच उपाय आहे पण एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे कोणते मुल्य शिकवायचे? आपण तर निधर्मी मग मूल्यांना कोणता आधार घ्यायचा. याच भारत देशात एकेकाळी पैश्यापेक्षा ज्ञानाला महत्व होते आणि म्हणूनच मोठमोठे राजे राजवाडे योगी व ऋषी समोर नतमस्तक व्हायचे. परंतु रामायणा वा तत्सम दाखले देणे म्हणजे पुन्हा 'मनुवाद' आणि छुपा ब्राम्हण वर्चस्ववाद असे तुम्हीं म्हणणार. शाळेत सरस्वती पुजायाची तर पुन्हा तोच प्रश्न. मनाचे श्लोक शिकवायचे तर तेच. संस्कारित पिढ्या ह्या शाळेतच तयार होतात आणि त्यासाठी धर्माचा आधार लागतोच. त्यावर पुन्हा स्त्रीस्वतान्त्र्याच्या विचित्र कल्पना. यातून मार्ग कसा काढणार. शेवटी सामाजिक नितीमत्ता हि धर्माच्या मार्गानेच नियंत्रित होत असते निधर्मी म्हणजे कोणाचेच नियंत्रण नाही. हेही विसरून चालणार नाही कि माणसाचा मूळ पिंड हा अनैतीकातेचाच आहे आणि त्याला धर्म आणि अध्यात्म हेच नियंत्रित करीत असते पण सध्याच्या भारतात ते शक्य नाही कारण आपल्याला अलीकडे सगळ्याच प्रश्नांची सोपी उत्तरे शोधण्याची सवय लागलेली आहे आणि त्यातील सगळ्यात सोपे उत्तर म्हणजे ह्या सर्व बाबींना जबाबदार कोण तर हिंदू धर्म आणि ब्राह्मण संपली आपली जबाबदारी. जसे मागे एकदा रामटेके नावाच्या गृहस्थांनी त्यांच्या ब्लोगवर बलात्काराच्या घटनांना कृष्ण लीलांच्या कथांना जबाबदार धरले होते. त्यामुळे अशा घटना ह्या घडताच राहणार आणि समाजाची हि तथाकथित पुरोगामी गती थांबवणे आता कोणाच्याच हातात नाही.

    ReplyDelete
  8. माफी असावी सर पण हे सगळे पूर्वी पण होते. आता फक्त बाहेर येत आहे. दुसरे म्हणजे भारत हा सगळ्यात duttapi/हिपोक्रट लोकांचा देश आहे. आपण भारतीय संस्कृतीचे गोडवे गातो पण एकत्र कुटुंबाचे तोटे मान्य करत नाही. त्यात पुन्हा प्रचंड अंधश्रद्धा आहेत/ अजूनही सरंजामी वृत्ती सोडायला तयार नाही. मग हे असेच होणार. कायदा आहे तसा राबवला तर लगेच माझ्या जातीचा माझ्या धर्माचा त्यामुळे लोक कुठल्याच गोष्टीकडे धड बघत नाहीयेत. त्याचा दोष उदारीकरणाला देणे अत्यंत चुकीचे आहे.

    ReplyDelete
  9. आपण एक वेगळा विचार करून बघू या

    आपल्याकडे मिडीयाचा उत्तम वापर करायची संस्कृती कशी जोपासली गेली ते आठवाल का जरा

    १- इंदिरा गांधी यांना दगड लागून जखम झाली

    २ - इंदिरा गांधी बस्तरच्या आदिवासींना हत्तीवरून भेटायला गेल्या

    ३ - इंदिरा गांधीना विनोबांनी - फिरत रहा - हा संदेश दिला - इंदिरा गांधी जिंकल्या विनोबाना भारत रत्न मिळाले



    ४ - अडवाणी आणि मंडळीनी बाबरी मशीद पाडली

    ५ -सध्या आण्णा हजारे यांचे आंदोलन - पहिले उपोषण गाजलेले

    ६ - त्यांचेच दुसरे मिडीयाने तोंडघाशी पाडलेले



    असा प्रवास पाहिला तर भारतीय आंदोलनात मिडीयाचा वाटा लक्षणीय आहे . स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय वृत्तपत्रे ही एक जबरदस्त मिडिया लॉबी होती


    ७ - एखादी लाट निर्माण करण्याचे पण एक शास्त्र झाले आहे - नव्हे ते असतेच अअण्णा हजारेंची लागोपाठ ची दोन आंद्लाने काय सांगतात ?आपापल्या परिट घडीच्या साड्या आणि सफारी सावरत केलेली आचरट मेणबत्ती आंदोलने , उपोषणे पाहून अशी हवा झाली होती की अण्णा म्हणजे प्रती गांधी किंवा लोहिया - पण अण्णांचे इंग्रजी कच्चे असल्यामुळे सगळेच विस्कटत गेले ,उच्च मध्यम वर्ग आणि नव श्रीमंत वर्गाला ते जिंकू शकले नाहीत आणि त्यांना उतरती कळा लागली . अण्णांचा " फुसका बार " सर्व प्रथम ओळखला तो शरद पवारांनी हे नोंद करण्या सारखे आहे आता अण्णा पूर्ण संपले आहेत

    ८ - यापुढे अशीच चमचमीत चटकदार आंदोलने घडवून आणणे हेच राज्यकर्त्या आणि विरोधी पक्षाचेही कार्य राहील असे दिसते - ठोस कार्यक्रम कुणालाच नको आहे - गांधी घराण्याची पुण्याई किती पिढ्या चालणार ?एक मोडी आणि एक नितीश काय करणार - हा चक्क इमेजचा धंदा आहे - एखाद्या २०० कोटी फिल्म सारखा !राजकीय जत्रा आहे ! ५ वर्षांनी भरणारी !

    साहित्य संमेलने तरी काय वेगळी असतात थोडीच - तो पण यातलाच प्रकार !


    तात्पर्य बऱ्याच अंशी लोकशाहीचा हा चौथा पिलर बरीच चहाच्या कपातील वादळे निर्माण करतो आणि शमवतो सुद्धा -हा एक खरी लोकशाही आंदोलने टाळण्याचा खेळ ही भांडवलदारी वृत्तपत्रे करत असतात - सत्ता आणि वृत्तपत्रे हा चुहा बिल्लिका खेळ सर्व जगात चालत असतो - एन जी ओ संस्था पण थोड्याफार फरकाने हेच काम करत असतात -खरी वैचारिक सांस्कृतिक क्रांती होऊ न देणे हेच त्यांचे जीवित कार्य असते


    आपला तथाकथित धर्म १०० वर्षे गुंडाळून ठेवून फक्त राष्ट्र बांधणी करायला हाक दिली तर किती प्रतिसाद मिळेल -शून्य !

    कारण निधर्मी राष्ट्र हि काल्पनिक गोष्ट आहे

    ReplyDelete
  10. चैतन्य सर

    हरिहर सारंग सर

    प्रशांथ सर


    " निधर्मी राष्ट्र " हे एक अतिशय अवाजवी आदर्शवादी आणि आगंतुक

    राबवले जाणारे स्वप्न आहे


    आज जगात कुणीही निधर्मी राष्ट्राची कल्पना राबवत नाही - एकटे आपण सोडून -

    कारण संस्कृती म्हटलं की आचार विचार आणि " धर्म " आलाच - नाही का ?

    धर्म आला की धर्माचा इतिहास पण आला - आणि तो बहुधा अत्याचारांनी बरबटलेला असतो - मग तो मुसलमान असो किंवा ख्रिस्ती वा हिंदू - अरबस्तान , युरोप यांचा इतिहास बघा - धर्म् युद्धे आणि धर्म सत्तांनी दिलेले आदेश आणि त्याच्याशी सृजनानी केलेला मुकाबला या बाबतीत आपल्या पेक्षा युरोपात जास्त छळ झाला ,असे म्हणता येईल - आपल्याकडे जातीतून बहिष्कृत करण्यात येई,पण तिकडे क्रुसावर चढवले जात असे आपल्याकडे सती जाणे हा आत्म सन्मान समजला जात असे पण तिकडे दोषी ठरवून जिवंत जाळण्यात येत असे !


    प्रत्येक ठिकाणी यंत्रणा आली की अन्याय आलाच आणि अन्याय झाला की पेटून उठणारे आणि पेटवणारे असे दोन तट असणारच !


    पण धर्माची गरज कुणाला जास्त होती ? किंवा असते ? प्रजेला की राजसत्तेला ? संघटीत धर्म आणि त्याचे नियम हे राजसत्तेला आवश्यक वाटत असत - राजकारण आणि अर्थकारण या मार्गाने धर्मसत्ता बळकट होत जात असताना

    प्रसंगी राजे आणि धर्म् पीठे यात संघर्ष अटळ होत असे -

    पण धर्माचे महत्व कायम रहात आले आहे हे नक्की

    त्यातील अंधश्रद्धा हा भाग तर जगभर प्रचलित होता आणि आहे

    आपण आपापल्या परीने त्याचा मुकाबला करत आहोत हे तर फारच प्रशंसनीय आहे !

    डॉ दाभोळकर यांच्या सारखे आज समाजाला नवीन दिशा देत असत - झोपलेल्या समाजाला जागे करणे फार फार अवघड - ते काम त्यांनी अहोरात्र केले !एका व्रतस्थपणे !


    आपल्याकडे अभ्यास करण्यासारखी अजून एक गोष्ट आहे

    बहुतेक अभिनव चळवळीचे नेतृत्व ब्राह्मणांनी केलेले दिसतेकदाचित ती अनेक जणांना पटणार नाही

    - डॉ दाभोलकर असोत किंवा एसेम जोशी मधु लिमये असोत -साने गुरुजी असोत किंवा आगरकर असोत -

    ( म .फुले हा अपवाद म्हणता येईल ) कारण राष्ट्रीय शिक्षण आणि स्वदेशी अशा राष्ट्रीय कार्यात स्वतः लो टिळक आगरकर असे नेते होते दादासाहेब खापर्डे होते लोकनायक अणे होते - कम्युनिस्ट संघटना पण बांधण्यात आणि कामगारांचे हित जपण्यात ब्राह्मण लोकांचे योगदान विसरता येणार नाही -

    इंग्रजी शिक्षण असो किंवा नवीन मेडिकल शिक्षण असो ब्राह्मण वर्गाने नेतृत्वच केले आहे

    फक्त या नथुराम गोडसेने घाण केली आणि ब्राह्मण नेतृत्वाला रसातळाला नेले ते कायमचेच - तो भाग निराळा !

    पाखंडी पणा करणारेपण ब्रह्मवृंदच आणि पहिले इंग्रजी पुस्तक हातात पकडणारे सुद्धा ब्राह्मणच - बदलाचे महत्व लक्षात आल्यावर त्यातही नेतृत्व करणारे ब्राह्मणच होते !

    आज भारतीय जनता पार्टीला अपेक्षित असलेले विखारी धर्मराज्य या नेतृत्वाला कधी अपेक्षितच नव्हते !मुस्लिम द्वेशवर आधारलेले राजकारण हा त्यांच्या राजकारणाचा कणा कधीच नव्हता

    भारतीय जनता पार्टी हा एक प्रस्थापित हिंदू विस्तारवादी गटाचा चेहरा असलेला पक्ष आहे - त्याला स्वतःचे आर्थिक धोरण नाही - वारा वाहील तशी पाठ फिरवून सत्ता मिळवणे हेच त्यांचे ध्येय आहे - कोङ्ग्रेस्पेक्शा ते वेगळे नाहीत !

    आज असे लाखो ब्राह्मण महाराष्ट्रात आहेत ज्याना पक्षीय राजकारण हे कालबाह्य वाटते आणि ज्यांचा धर्म्संस्थेवाराही विश्वास नाही - हा एक अतिशय महत्वाचा भाग आपण विसरता कामा नये !

    ReplyDelete
    Replies
    1. आपली भूमिका समजण्यासारखी आहे. महात्मा बसवेश्वर आणि चक्रधर स्वामी हे सातशे आठशे वर्षापूर्वीचे आत्यंतिक पुरोगामी आणि बंडखोर विचारवंत ब्राह्मण होते. आता हे सांगूनही पटत नाही. प्रश्न तो नाहीच. परंतु सर्वसामान्य ब्राह्मण मंडळी खाजगी, आपापल्या घरात, आपापल्या गटांमध्ये काय चर्चा करतात हे आपल्याला माहित नाही काय?
      आपल्या ब्राह्मण पूर्वजांनी काही चुका केल्या असतील, काही प्रतिगामी विचार मांडले असतील तर त्यांचे समर्थ कशासाठी करायचे? आडून आडून मनुस्मृतीचे समर्थन का करायचे आणि तेही मनुस्मृती न वाचताच. ‘आपुन आपले नव्हतो बाप, मग कासया पश्चाताप’ हे केशवसुतांचे वचन अनुसरायला नको का?
      आपण ज्या सामाजिक, वैचारिक, धार्मिक पर्यावरणात वाढलो, त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होणे मी स्वाभाविक मानतो. परंतु आता आपण यातून बाहेर पडायला हवे. कोणत्याही जातीयवादाला आपल्या वैचारिक मांडणीतून किंवा कृतीतून समर्थन मिळायला नको. आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध आणि सुसंवादात्मक आयुष्य हेच आपले ध्येय असले पाहिजे. वादासाठी वाद नको. तो बोधासाठी असायला हवा. परंतु आपले मनच पुर्वाग्रहयुक्त असेल तर त्याला काय उपाय

      Delete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...