Friday, June 3, 2011

राम गणेश गडकरींनी शिवरायांची बदनामी केली आहे काय?

सध्या राम गणेश गदकरींच्या "राजसंन्यास" या अपुर्ण नाटकातील जीवाजी कलमदाने या पात्राच्या तोंडचा एकच संवाद टाकून गडकरींनी शिवरायांची बदनामी केली आहे असा आरोप केला जात आहे. हा संवाद नाटकाच्या दुस-या अंकात येतो. जिवाजी कलमदाने हे मुळात एक खलपात्र आहे, भ्रष्ट आहे आणि तो कलमाने (लिहिण्याने) काय आक्रीत घडवता येवू शकते याची स्व-स्वार्थासाठी देहु या पात्रा जवळ फुशारकी मारत आहे. त्यात तो शिवराय यांच्या कर्तुत्वावर संशय तर घेतोच पण संत रामदासांचीही नालस्ती करतो.

नाटककार कथानकाच्या सोयीसाठी अनेक पात्रे निर्माण करत असतो. त्या त्या पात्राच्या स्वभावधर्मानुसार त्याच्या तोंडी संवाद देत असतो. त्यातच त्या-त्या नाटककाराचे यशापयश असते. "शहेनशहा" या ना.सं.इनामदारांच्या कादंबरीतील औरंगझेबच्या तोंडी अपवाद वगळता महाराजांबद्दल तारीफेचे पुल येवू शकत नाहीत कारण तो शत्रु आहे.

आता रामदासभक्तांनीही गडकरींच्या विरुद्ध मोहिम उघडायची कि काय?

दुसरे असे कि १९०7 पर्यंत मराठीत मुळात शिवरायांवरचा एकच अधिक्रुत चरित्रमय ग्रंथ प्रसिद्ध झाला होता केळुसकरगुरुजींचा, तो म्हणजे १९०७ चा छत्रपती शिवाजी महाराज हा. तत्कालीन जेही संशोधन उपलब्ध होते ते त्यांनी त्यात वापरले आहे. त्यात संभाजीमहाराजांबद्दलच्या तत्कालीन उपलब्ध माहित्या वापरण्यात आलेल्या आहेत आणि त्या संभाजी राजांबद्दल फार आदर निर्माण करतील अशा नाहीत पण आता कमल गोखले यांच्या शिवपुत्र संभाजी या १९६२ च्या ग्रंथाने त्या गैरसमजुती दुरही झाल्या आहेत आणि संभाजी महाराजांचे धवल चारित्र्य प्रकाशात आले आहे. पण गडकरी मुळात वारले ते १९१९ ला. त्यावेळी अन्य कोनताही संदर्भग्रंथ उपलब्ध असण्याची शक्यता नव्हती हेही येथे लक्षात घ्यावे लागते.

मी खाली मुद्दाम "राजसंन्यास" नाटकातील दुस-या अंकातील भाग खाली देत आहे. तो सर्वच वाचावा मगच जिवाजी कलमदाने हे काय पात्र आहे आणि तो असे का बरळत आहे हे लक्षात येईल.


देहू : पंत, तुम्ही तुमच्या कलमाचे एवढे महत्त्व सांगता पण चारचौघात काही तसे पटत नाही! शिवाजीराजांनी तर कधी कलम हाती धरिल्यावाचूनच एवढा ग्रंथ केला!

जिवाजी : काय, काय ग्रंथ केला रे शिवाजीने? मी म्हणतो, तसे म्हटले तर शिवाजीने असे केले आहे तरी काय?

देहू : त्रिखंडत्रिभूवन सांगेल राजांनी काय केले ते! एवढी हिंदुपदपाच्छाई उठवली आणि त्यांना तुम्ही नुसता हुंकार करिता? पंत, हे देवाघरी रुजू होणे मुष्कील नाही!

जिवाजी : आता उघड माप पदरात घालू लागलो तर म्हणशील, की पंत, आडमाप बोलता म्हणून! अरे शिवाजी म्हणजे मूठ दाबल्या हाती साडेतीन हात उंचीचा, नाकीडोळी नीटस, काळगेल्या रंगाचा, राकटलेल्या अंगाचा, हरहुन्नरी ढंगाचा, लिहिणे पुसणे बेतास बात, गुडघ्यात अंमळ अधू, असा एक इसम होऊन गेला! त्याची काय बरी मातब्बरी सांगतोस एवढी? म्हणजे हिंदुपदपाच्छाई उठवली! काय रे, मोगलाई मोडलीन् मराठेशाही झाली म्हणून इकडची दुनिया तिकडे झाली वाटते! शिवाजीच्या राज्यात लिंबोणीला आंबे लागले, का शेळीने आपापली पोर वाघाच्या पेटयाला दिली, का कणसातून माणसे उपजली? अरे, केले काय शिवाजीने असे? मोगलाईत हुकमती केसांची टोळी दाढीखाली लोंबत होती ती मराठेशाहीत कवटीवर चढली एवढाच लाभ! शिवाजी नशिबाचा म्हणून नाव झाले इतकेच! त्यातून तुला खरे सांगू? अरे, खरा मोठेपणा अशा आरडाओरडीवर नसतो! शिवाजीची खरी लायकी चारचौघांना पुढे कळणार आहे! त्या माणसात काही जीव नाही रे!

देहू : ते काही का असेना, माझा तुम्हाला एकच सवाल आहे. तुमच्या कलमाच्या मदतीवाचून राजांनी आपल्या नावाचा एवढा ग्रंथ कसा केला ते सांगा.

जिवाजी : सांगू तुला देहू? कलमाच्या मदतीवाचून कुठल्याही ग्रंथाचे पान हलायचे नाही बघ! अरे, शिवाजी नुसता नावाला पुढे झाला; पण खरी करणी त्या रामदासाची आहे! त्याने आपला 'दासबोध' ग्रंथ लिहिला नसता, तर शिवबाचा एवढा ग्रंथ कदाकाळी होताच ना! आणि दासबोध ग्रंथ कशाने लिहिला सांग बघू? शिवाजीच्या भवानी तलवारीने? नाही! तुझ्या आडदांड करेलीने? नाही! नुसत्या भवानी तलवारीच्या नाचाने मराठेशाहीला रंग चढला नाही; तर दासबोध लिहिणारे कलम त्या सगळया भानगडीच्या मुळाशी होते! आता तूच सांग बघू भवानीचे हातवारे करणारा शिवाजी थोर का कलमाने दासबोध रेखाटणारा रामदास थोर?

देहू : समर्थांची ऐपतच भारी वाटते बुवा!

जिवाजी : बरोबर बोललास! अरे, शिवाजी किस चिडियाका नाम है! शिवबाने जो एवढा ग्रंथ केला त्याची एकूण एक पाने समर्थांनी खरडली होती! अरे, माझा तर असाच होरा वाहतो की, शिवाजीच्या नावात रामदासाइतका काही राम नाही! आता तुला व्हायचे आहे शिवाजी! पण एखाद्या रामदासावाचून तू कसा होणार शिवाजी? बेटा देहू, बच्चा, बोल आता तुझा रामदास कोण ते?

देहू : (जिवाजीच्या पायावर डोके ठेवून) बजरंगबली की, जय जय रघुवीर समर्थ-

जिवाजी : समर्थाघरीचे श्वान, त्यास सर्वही देती मान! बेटा देहू, अखिल त्रैलोक्य तुझ्यासारख्या कुत्त्याला मान देईल!

देहू : पंत आज माझे डोळे उघडले! पण पंत, तुम्ही समर्थांसारखे कसे, ते एकदा नीट पढवा मला. ते बाळब्रह्मचारी आणि तुम्ही तर असे कुटुंबवत्सल!

जिवाजी : अरे, बालपणी म्हणजे सुमारे सात-आठ वषर्ेपर्यंत मी सुदधा बाळब्रह्मचारी होतो. पुढे मात्र शेजारीपाजारी-
(कावेबाजपणाने हसतो.)

देहू : पंत, आता हसण्यावारी नेऊ नका! मला शिवाजी करण्यासाठी तुम्ही समर्थ कसे होणार? समर्थांना तर लहानपणीच लग्नाचा तिटकारा येऊन ते सावधान होऊन पळत सुटले!

जिवाजी : बेटा देहू, या जगात खर्‍याकडे कोणी खोल नजरेने बघत नाही! ऐन मुहूर्तावर नारायण कुलकर्णी 'सावधान' ऐकून सावध झाला आणि संसार सोडून श्रीसमर्थ रामदास झाला एवढेच काय ते लोक बघतात! पण नारायण पळाला का याचा कुणी नीट विचार करीत नाही! त्याला सांगून आलेली मुलगी काय चेहेर्‍यामोहर्‍याची, कुळशीलाची होती याचा कुणी विचार केला का आजवर? अरे, बाबत अगदी साधी आहे! समर्थांच्या गळयात बांधण्यासाठी आणलेल्या त्या लग्नाच्या घोरपडीत काहीतरी मोठी गोम होती! अवत्याभवत्यांनी नवर्‍या मुलाला खूप चिडविले असेल म्हणून आयत्या वेळी पोराच्या जातीने पळ काढिला आणि दुसरे काय? सावधान कसले नि समर्थ कसले? पुढे अशा फकिरी बाण्याने अंगाला राख चोपडून नारायणाचा रामदास झाला, झाले. बाकी खरे म्हणशील तर समर्थाला तर संसाराची मनापासून आवड होती! का म्हणून नाही विचारलेस? तर त्यांनी स्पष्ट म्हटलेच आहे की, आधी प्रपंच नेटका करावा आणि मग म्हातारपणी परमार्थ पाहावा म्हणून! आणि एवढयासाठीच अटकळीचा मनुष्य आधी प्रपंचाचा पसारा फैलावून सोडतो! शिवाजीने सहा बायका का केल्या? नेटका प्रपंच साधावा म्हणून!

देहू : पंत, नेटका प्रपंच कसा करावा हेच ठीक पटवा आधी मला!

जिवाजी : नेटका प्रपंच शिकणे फुकाचे काम नाही बाबा! त्याला रुका पाहिजे त्याला रोकड पाहिजे! तसा शिकायला तयार हो. प्रापंचिकांच्या उध्दारासाठी समर्थांनी जसा दासबोध लिहिला, तसा तुझ्यासाठी मी 'कलमबोध' लिहून टाकीन! श्रीकमलबोध! दासबोधाची वीस दसके तर कमलबोधाची ही वीस पेरे! कबूल?

देहू : मग त्याला पैसा कशाला हवा?

जिवाजी : दाम करी काम! दाम घेतल्यावाचून काम केल्याचे मोल राहात नाही. दाम घेतल्याविना काम करणाराला नेटक्या प्रपंचाची खूण कळली असे कोण म्हणेल? कलमबोध उपदेशायला तो कसला अधिकारी पुरुष? कारकुनी गादीचा कोपरा म्हणजे बारमहा पिकणारे पैशाचे शेत! तिथे पैसा पेरावा, कामाचे पीक घ्यावे!

देहू : पण माझे काम करण्यासाठीसुध्दा पैसा खाणार?

जिवाजी : शिवाजीजवळून समर्थांनी सार्‍या राज्याच्या सनदा काढून घेतल्या आणि त्याला भगवी वस्त्रे धारण करायला लावली! तू कोण? नाणी मोजली नाहीस तर तू कोण? अरे, वडिलांनी सरकारी कामात पैसे नापत्ता केल्याचे पहिल्याने जेव्हा लक्षात आले- त्या वेळी म्हणजे नुसता आठ वर्षाचा चिमखडा होतो-

देहू : वडील पण पैसे खात होते का?

जिवाजी : आम्हा कलमदान्यांत हा वडिलोपार्जित गुण आहे! आमच्या घराण्यातले पुरुष न् पुरुष एकाचढी एक पिढीजाद धोरणाचे होऊन गेले! राम जसा एकबाणी- तसे आम्ही एकटाकी, म्हणजे लिहिताना टाक एकजात! राम एकवचनी- तर आम्ही एकचाकी, सारे एका चकरीने रस्ता काढणारे! तिकडे राम एकपत्नी तर आम्ही एकराखी! किमानपक्षी एकेकाला एकेक राख ही असायचीच!

देहू : राख म्हणजे?

जिवाजी : राख म्हणजे बायको नसलेली बायको- नाकापेक्षा जड मोती! बेटा देहू, तू अजाण बच्चा आहेस! कलमदाने म्हटला की तो एकटाकी, एकचाकी आणि एकराखी ठरलेला! बरे, पुढे वडिलांची ही खादाड खुबी पाहिल्याने ध्यानात आल्याबरोबर त्यांना धाक घातला, तिच्याबद्दल भरदरबारात होळीपुनव गाजवायचा! त्यासरशी वडिलांनी माथ्यात राख घालून घरीच फाल्गुन उरकून घेतला! अखेर त्यांच्याकडून दुप्पट रकमेचा रोखा लिहून घेतला तेव्हा घरातली अब्रू घरात ठेविली! वडिलांशी हे वागणे; मग तुझे काय उरले? अरे, कारकुनी कसबाला प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे डोके लागते! थोरल्या राणीसाहेब- सईबाईसाहेब जेव्हा मेल्या- आपले वारल्या, तेव्हा तर या जिवाजीची तारीफच करायला हवी होती. खाजगी खात्यातून सव्वा खंडी चंदनाचा हुकूम झाला; पण सव्वा शेर चंदनाच्या उटीने सव्वा खंडी बाभळीचे चैत्री हळदीकुंकू आटोपले आणि पंधरा मोहोरांची बचत केली! गडावर धूम बोलवा, की सव्वा खंडी चंदनाने मातोश्रींना मुक्ती दिली म्हणून; पण खरी गोष्ट एक देवाला ठाऊक, त्या जळत्या जिवाला ठाऊक, की एक या जिवाला ठाऊक!

देहू : पंत, भलतेच काय सांगता? इतक्या हलक्या मनाने तुम्ही पंधरा मोहरांची मिळकत केली असे कुणालासुध्दा खरे वाटायचे नाही!

जिवाजी : नाही वाटायचे; साध्याभोळयांना नाही खरे वाटायचे! ''तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे!'' जातीच्या इरसालांना माझे म्हणणे बेचूक पटेल.


......

6 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आम्ही गडकरींचे चाहते आहोत

    by Gautam Meshram on Saturday, June 4, 2011 at 6:32pm


    ललित साहित्याचे वाचन कसे करावे? कथा, कादंबरी, नाटक यातील पात्रांचे संवाद ही लेखकाची मते समजावीत का? खलनायकाचे विचार हे लेखकाचे मत असते काय? ह्याची शाळकरी पोरांना असणारीही माहीती ज्यांना नाही, त्यांनी दिवंगत राम गणेश गडकरींबाबत केलेला अपप्रचार किव करावी याच लायकीचा आहे. इंजिनियर असलेल्या परंतु ललित/वैचारिक साहित्यातील ओ की ठो न कळणारी ही मान्दीयाळी स्व:ताबरोबर नेत्यांचीही अब्रु वेशीवर टांगित आहेत. एखाद्या विषयातील कळत नसेल तर जाणकारांना विचारावे. उगाच तारे तोडू नयेत. अश्यामुळे समग्र बहुजनांचे हशे होते. आम्ही गडकरींचे चाहते आहोत, याचा अर्थ त्यांच्या मतांशी किंवा विचारधारेशी सहमतच असू असे मात्र नाही.

    ReplyDelete
  3. हे पुतळ्याचं सोडा पण खलपात्राच्या तोंडी का होईना पण "शिवद्रोही विधानं" करून उपमर्द करायची शब्द चलाखी गडकरी पंतांनी करायला नको होती.

    ReplyDelete
  4. मुळातून वाचले नव्हतेच. आता वाचले. आता काय या ऍक्टिविस्तांपुढे रडावे कि हसावे. वाङ्मय प्रकार काय आहे? कोणाच्या तोंडी हा मजकूर आहे.रसपरिपोष कशाला म्हणतात.हि मंडळी आधी ज्ञान संपादन करून नन्तर समाजसुधारणेच्या वारुवर का बसत नाहीत. तसे होईल तर असे कलंडणार तरी नाहीत.संजयजी आपला लेख समर्पक आहे एवढेच या घडीला म्हणतो.

    ReplyDelete
  5. Irony म्हणजे काय? खलनायकाच्या तोंडी असलेले वाक्य शिवाजी राजांची बदनामी करते की त्या खलपुरुषाची प्रवृत्ती दर्शवतात ? एवढं साधं कळत नसेल तर संघटना कसली चालवतात? असले प्रकार इतरांना टिकेला वाव निर्माण करत नाहीत काय?

    ReplyDelete
  6. उत्तम लेख आहे आणि गडकरी सरांना न्याय देणारा आहे
    धन्यवाद संजय सर

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...