Friday, June 28, 2013

झरथुष्ट्राचा आणि ऋग्वेदाचा काळ!




अवेस्त्याची भाषा काही प्रमानात ऋग्वैदिक भाषेच्या जवळची मानली जाते. अवेस्तन व्याकरण हे वैदिक भाषेपेक्षा वेगळे असले तरी शब्द साधर्म्ये अनेक आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे अवेस्तन दैवतशास्त्र वैदिक दैवत शास्त्रापेक्षा वेगळे असले तरी अनेक देवतांच्या नांवात व कर्मकांडातही साम्य आहे. सोम (अवेस्तन "अहोम), यज्ञ (अवेस्तन यस्न) असूर (अवेस्तन अहूर) ई. साम्ये नक्कीच महत्वाची आहेत. ही साम्ये असण्यची कारणे ईंडोयुरोपिय भाषा बोलणा-या आर्य वंशीयांची विस्थापने आणि एक आर्य शाखा इराणमद्ध्ये स्थायिक झाली तर एक भारतात आली अशी दिली जातात.  त्यावर आपण नंतर चर्चा करुयात. येथे आपल्याला झरथ्रुष्टाचा नेमका काळ कोणता यावर चर्चा करायची आहे.

सर्वात आधी अवेस्तन धर्म आणि वैदिक धर्म यातील विभेद लक्षात घ्यायला हवा व तो म्हणजे अवेस्तन धर्म हा इस्लाम, ख्रिस्ती व ज्युंप्रमाणेच व्यक्तीप्रणित आहे तर वैदिक धर्म हा  किमान साडेतिनशे ऋग्वैदिक मंत्रकर्त्यांनी विकसीत केला आहे. असो.

झरथुष्ट्र

झरथ्रुष्ट या शब्दाचा अर्थ कनिंगह्यम "वृद्ध उंट" असा देतो. जरा+उष्ट्र =अवेस्तन झरथुष्ट्र अशी त्यची उकल आहे. खरोष्टी लिपीचे नांव झरथुष्ट्रीचे खरष्टी असे रुपांतर झाले असेही तो म्हणतो. परंतू भारतीय संस्कृती कोशात झरथ म्हणजे सुवर्ण आणि उश्ट्र म्हणजे प्रभामंडित अशी त्याच्या नांवाची उकल केलेली आहे. झरथुष्ट्राच्या नांवाच्या अर्थाची उकल संस्कृताधारीत केली तरी असे भिन्न टोकाचे अर्थ निघतात हेही येथे लक्षात घ्यावे. झरथुष्ट्र या शब्दाचे अनेक अर्थ लावण्यचा प्रयत्न झाला आहे. झरथुष्ट्राचे स्पितमा असे कुळनांव आहे परंतू त्याच्या व्युत्पत्ती लागलेली नाही. त्याचे जन्मस्थळ अज्ञात असले तरी पुर्व इराणमद्धे त्याचा जन्म झाला असावा असा बव्हंशी विद्वानांचा तर्क आहे. त्याचा जो इतिहास म्हणुन मिळतो तो बव्हंशी दंतकथांनी भरलेला आहे. विश्ताश्प राजा हा त्याचा पहिला शिष्य मानला जातो. विवाहानंतर त्याने एका पवित्र पर्वतावर तप केले व दहा वर्षांनी त्याला आत्मज्ञान झाले. वोहुमना हा अहूर माझ्दाचा मुख्य दूत त्याला प्रत्यक्ष भेटला आणि त्यला अहूर माझ्दाकडे नेले व दीव्य ज्ञान दिले. त्यानंतर त्याला वेळोवेळी सहा साक्षात्कार झाले. झरथुष्ट्राने वेळोवेळी जो उपदेश केला तो गाथांमध्ये संग्रहीत केला आहे.

याचा अर्थ हा होतो कि सेमेटिक (ज्यु/ख्रिस्ती/इस्लाम) धर्मांच्या संस्थापकांप्रमाणे झरथुष्ट्र हाही एक संदेष्टा (Prophet) होता. ही संकल्पना वैदिक अथवा एकाही भारतीय धर्मात नाही.

झरथुष्ट्राचा काळ इसपू सहावे शतक आहे असे विसाव्या शतकापर्यंत मानले जात होते. "वैदिक संस्कृतीचा विकास" या ग्रंथात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनीही त्याचा काळ हाच मानला आहे. हा काळ कसा निश्चित केला गेला त्याचा इतिहास असा आहे:

सनपूर्व ३३० मद्ध्ये अलेक्झांडरने अकेमेनिद साम्राज्यावर स्वारी केली होती. अलेक्झांडरच्या मृत्युनंतर सेलिस्युड राजे सत्तेत आले. त्यांनी अलेक्झांडरच्या म्र्युत्युपसून कालगणना सुरु केली पण ही बाब झोरोश्टरीय पुरोहितांना आवडली नाही. त्यामुळे त्यांनी झरठुष्ट्राचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यांनी पिढ्यांची उलटगणना करुन झरथुष्ट्राचा काळ अलेक्झांडरपुर्व २५८ वर्ष एवढा काढला. म्हणजेच तो इसपू ५८८ वर्ष एवढा जात होता. असे करतांना पुरोहितांनी ग्रीक आणि ब्यबिलोनियन स्त्रोतांचाही आधार घेतला असला पाहिजे असेही मत आहे. हा अंदाज अगदीच तीक्ष्ण आहे असे म्हनता येत नाही कारण अलेक्झांडरच्या पुर्वी म्हणजे, अलेक्झांडरच्या मृत्युपुर्वी कि जन्मापुर्वी आणि झरथुष्ट्राच्या जन्मापर्यंत कि त्याला दीव्य ज्ञान प्राप्त झाले तेंव्हापर्यंत...याबाबत नक्केच गोंधळ आहे. त्यामुळे हाच काळ इसपू सातवे शतक ते सहावे शतक या दरम्यानचा असावा असा ढोबळ तर्क आहे.  हाच अंदाज नवव्या व बाराव्या शतकातील ग्रंथातून व्यक्त केला गेला होता.

ग्रीक तत्वज्ञ अरिस्टोझिनस (इसपू चवथे शतक) याने झरथुष्ट्राचा काळ इसपू ५७० हा दिला आहे. झरथुष्ट्र हा पायथागोरसच्या (इसपू सहावे शतक) समकालीन होता अशा नोंदी ग्रीक साहित्यात मिळतात. एवढेच नव्हे तर सोक्रेटिसपुर्व काळातील हेराल्किटस या तत्वज्ञावर त्याचा प्रभाव होता. तो जर अलीकडच्या खाली सांगितलेल्या विद्वानांच्या मताप्रमाने इसपू १००० पुर्वीचा असतात तर त्याचा प्रभाव उत्तरकालीन ग्रीक तत्वज्ञावर पडणे शक्य नव्हते असे मत मांडले जाते. (पिटर किंग्जले "The Greek origin of the sixth century dating of zoroaster.")

एवढे पुरावे झरथुष्ट्राचा अंदाजित कालखंड ठरवायला पुरेसा असल्याने विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत हा पारंपारिक कालखंड सर्वमान्य होता.

परंतू एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात  बार्थोल्मी आणि ख्रिस्तन्सन या विद्वानांनी झरथुष्ट्राच्या काळावर प्रथम प्रश्नचिन्ह उभे केले. यामागील कारणे ऐतिहासिक नसून भाषाशास्त्रीय होती. ऋग्वेदाचा काळ हा सनपूर्व १५०० मानला गेला असल्याने व गाथ्यांतील (अवेस्ताचा पुरातन भाग) भाषा व ऋग्वेदाच्या भाषेत साधर्म्ये असल्याने झरथुष्ट्र ऋग्वेदानंतर हजार वर्षांनंतर जन्माला आला असेल हे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे झरथुष्ट्राचा काळ मागे नेण्याची चढाओढ सुरु झाली असली तरी तो सनपुर्व एक हजार ते अकराशे येथवरच नेता आला.

हा काळ मागे नेतांना गाथांमधील समाजजीवनही विचारात घेतले गेले. म्हणजे झरथुष्ट्राचा समाज हा द्विस्तरीय आहे जो भटक्या अथवा ग्रामीण समाजातच दिसू शकेल...म्हणजे शेतकरी व पशुपालक. साम्राज्यकाळात समाजाची तीन घटकांत, म्हणजे योद्ध्ये, पुरोहित आणि शेतकरी यांत वाटनी झाली असा तर्क दिला जातो. त्याच वेळीस काही विद्वानांच्या मते झरथुष्ट्र हा बहुदा ग्रामीण भागाचा रहिवासे असावा. पण मग विश्ताश्पसारखा राजा त्याचा पहिला शिष्य होता ही बाबच निकालात निघते हे येथे लक्षात घ्यायला हवे. मुलात गाथा या धार्मिक उपदेशांचा संग्रह असून समाजजीवन वर्णन करणारा ग्रंथ नाही ही बाब येथे लक्षात घ्यायला हवे. त्यामुळे समाजजीवनाच्या वर्णनावरुन झरथुष्ट्राचा काळ काढता येत नाही.

त्याउलट पारशी पुरोहितांनी व ग्रीक स्त्रोतांनी दिलेला कालखंड ब-यापैकी अचूक आहे असे म्हणता येते.

ऋग्वेदात झरथुष्ट्र

आश्चर्य वाटेल पण झरथुष्ट्राचा उल्लेख ऋग्वेदात येतो. तो असा:

"विश्वा अग्नेSप दहारातीर्येभिस्तपोभिरदहो जरुथम" (ऋ. ७.१.७)

अर्थ: हे अग्ने, ज्या तेजाने तू कर्कश शब्द करना-या जरुथाला जाळलेस, त्या तेजाने राक्षसांना जाळुन टाक." 

ऋग्वेदात ७.९.६ व १०.८०.३ या ऋचांतही झरथुष्ट्राला जाळल्याचा उल्लेख आहे. अवेस्तन दिनकर्द, बेहेराम्यश्त, दाहेस्तन ई. ग्रंथावरुनही झरथुष्ट्राला अग्नीत जाळुन मारल्याचा उल्लेख आहे.

ऋग्वैदिक मंडळींना झरथुष्ट्राचा राग असणे स्वाभाविक आहे कारण जे यांना देव होते ते त्यांचे सैतान होते...

एवढेच नव्हे तर अवेस्त्यातील विश्ताश्प राजा हाच ऋग्वेदात इष्टाश्व (ऋ. १.१२२.१३) होय तर अरजास्प हाच ऋग्वेदातील ॠजाश्व होय असेही काही विद्वानांचे मत आहे.

जरुथ हे नांव, त्याला जाळुन मारण्याचा उल्लेख अवेस्तन ग्रंथांत असने व तसाच उल्लेख ऋग्वेदातही येणे व अजून काही नामसाधर्म्ये असने यातून काही प्रश्न उपस्थित होतात.

पहिला प्रश्न म्हणजे ऋग्वेद (अथवा त्यातील हा भाग) हा झरथुष्ट्राच्या नंतरच्या काळातील आहे काय? हा प्रश्न साहजिक आहे कारण झरथुष्ट्र जळुन मेल्याचा वृत्तांत ऋग्वेदातच येत असल्याने झरथुष्ट्र हा किमान हा भाग लिहिण्याच्या आधीच होऊन गेला हे स्पष्टच आहे.

आणि दुसरा प्रश्न म्हणजे ऋग्वेदचा काळ हा सहाव्या शतकानंतरचा आहे काय?

या प्रश्नावर सविस्तर चर्चा गरजेची आहे. पारशी पुरोहितांनी झरथुष्ट्राचा काळ काढला तो त्यांच्याजवळ असलेल्या पिढ्यांच्या यादीवरुन. त्याला ग्रीक आणि ब्यबिलोनियन स्त्रोतांचाही आधार आहे.

ऋग्वेदचा काळ इसपू १५०० (किंवा तत्पुर्वी कितीही जुना) एकदा ठामपणे ठरवून टाकल्यानंतर मग त्या काळाशी झरथुष्ट्रच्या काळाची सांगड घालण्याचा प्रयत्न कितपत शास्त्रीय आहे हा प्रश्न यामुळे निर्माण होतो.याचे कारण म्हणजे ऋग्वेदाचा अचुक अथवा सत्याच्या जवळपास जाईल असा काळ नक्की करण्यचे मुळात एकही साधन उपलब्ध नाही. ऋग्वेदात जरी झरथुष्ट्राचा उल्लेख येत असला तरी अवेस्त्यात मात्र वेद अथवा वैदिक मंत्रकर्त्यांचे नांव येत नाही. सिंधु संस्कृतीचे अवशेष सापडल्यानंतर ऋग्वेदाचा काळ तेथेवर मागे नेण्याची प्रथा आली. समजा अजून पुरातन अवशेष सापडले तर ऋग्वेदाचा काळ तेवढा मागे नेला जावू शकतो कारण त्यात आपले विद्वान वाकबगार आहेत हे आजवर सिद्ध झालेले आहे.

पण वास्तव हे आहे कि ऋग्वेदाचा काळ निश्चित करण्याचे ऋग्वेदांतर्गतचे एकही साधन नाही. ऋग्वेदातील नाक्षत्रस्थितीच्या आधारावर ऋग्वेदाचा काळ काढण्याचे प्रयत्न अयशस्वी झालेले आहेत. लो. टिळकांचे याबाबतचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत, पण त्यांच्या ओरायनवरच "कल्पोपकल्पित आर्य व त्यांच्या स्वा-या" या ग्रंथातुन डा. नी. र. व-हाडपांडे यांनी टिळकांचे सर्व दावे ऋग्वेदाचाच आधार घेत खोडुन काढले आहेत. ऋग्वैदिक भाषा सिंध/पंजाब प्रांतात आज आहे तशीच्या तशी अस्तित्वात होती याचाही एकही भौतिक पुरावा मिलत नाहे हीही आपण पाहिले आहे. ऋग्वेदात झरथुष्ट्राचा मात्र स्पष्ट उल्लेख आहे हेही आपण वर पाहिले आहे. अवेस्ता हा अलेक्झांडरच्या काळात (व पुढे नंतरही) अवेस्तन लिपीत लिखित स्वरुपात अस्तित्वात होता तसेही वेदांचे नाही. अशा परिस्थितीत वैदिक लोकांना झरथुष्ट्र व त्याचे जळुन म्रूत्यू होण्याचे प्रकरण माहित असावे व त्यांनी ते नोंदवावे यावरुन एक निश्कर्ष स्पष्ट निघतो व तो हा कि ऋग्वेदाचा बराचसा भाग हा झरथुष्ट्रोत्तर काळातील आहे. झरथुष्ट्रआचा काळ इसपू सहावे शतक असा निश्चित असल्याने ऋग्वेदाचा काळही त्याच्या काही मागे व थोडा पुढे (इसपू सातवे शतक ते इसपु पाचवे शतक) आहे असे म्हणता येते. अन्यथा झरथुष्ट्राचा उल्लेख ऋग्वेदात येण्याचे कसलेही संयुक्तिक कारण नाही.

ऋग्वेदाचा काळ मागे नेण्यासाठी झरथुष्ट्राचाही काळ मागे नेण्याची युक्ती फारशी यशस्वी ठरु शकत नाही कारण एक नव्हे तर दोन विभिन्न स्त्रोतांतुन त्याचा काळ निश्चित होतो. आणि त्याचा काळ हा ऋग्वेदरचनेचा काळ नक्की करण्यास आपल्याला मदत करतो. म्हणजेच ऋग्वेदरचना सुरु होण्याचा काळ कोणत्याही परिस्थितीत सातव्या शतकापार जावू शकत नाही. ऋग्वेदाचे सातवे मंडल हे प्राचीन मंडलांपैकी (तिसरे ते सातवे) एक मानले जात असल्याने ही कालनिश्चिती अधिक संयुक्तिक आहे असे म्हणता येते. ऋग्वेद रचणा-यांना झरथुष्ट्र माहित होता याचा अर्थ त्यांना त्याच्या गाथाही माहित होत्या हेही स्पष्ट आहे. त्यात अशक्य काही नाही कारण भौगोलिक सान्निध्य असल्याने परस्पर सांस्कृतीक घटना एकमेकांना माहित असणे तसेच भाषिक निकटता असणेही स्वाभाविक आहे. त्यासाठी इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांताची आवश्यकता नाही अथवा आर्य म्हणवणा-या लोकांची एका विशिष्ट भौगोलिक स्थानावरुन अन्यत्र निगर्मणे होण्याचीही आवश्यकता नाही.

पुढील प्रकरणात आपण अवेस्ता, त्याच्या भाषेत काळानुसार होत गेलेले बदल व त्या धर्माचे व ऋग्वैदिक धर्माचे स्वरुप याचा आपण तुलनात्मक अभ्यास करुयात!

6 comments:

  1. झरथुष्ट्र आणि ऋग्वेद निर्मितीचा काळ यावरील लेखकाने मांडलेला नवीन सिद्धांत हा निश्चितचं धक्कादायक असा असला तरी तो सहजासहजी खोडून काढता येण्यासारखा नाही. श्री. सोनवणी यांच्या या नवीन सिद्धांतामुळे प्राचीन इतिहासाचे सर्व संदर्भ बदलले आहेत. तथाकथित आर्य आक्रमणाचे गोडवे गाणाऱ्या आणि त्याचे भांडवल करून गळे काढणाऱ्यांना मात्र हे संशोधन पचणार नाही हे निश्चित !

    ReplyDelete
    Replies
    1. तसही आर्य आक्रमणाचा सिद्धांत केंव्हाच बाद झाला आहे. ह्या सिद्धांतावर पुरातत्व विभागातले लोक सध्या अळीमिळी गुपचिळी साधून असतात. पण बाकीचे हिरीहीरीने ब्राह्मण बाहेरून आले असे सांगत असतात. कारण ते सोयीस्कर आहे. पण असे आहे की ब्राह्मण इथलेच आहेत असे सिद्ध झाले तर सध्याच्या राजकीय लोकांची गोची होईल त्यामुळे सगळेच गप्पा आहे. तसेही प्रत्येक सिद्धान्त हा काही पुरावे शोधून रचलेला असतो. तो खरा का खोटा हे सांगताच येत नाही. कारण दर काही वर्षांनी कोणतरी वेगळे शोधून काढते. त्यामुळे हे सगळे गोल गोल घुमून ज्याला जे पाहिजेल तो ते सिद्ध करू पाहतो असे वाटते.

      Delete
  2. gautam buddha aani bhagwan mahavir yanchya kalat konti bhasha hoti aani tyache samkalin purave ya baddal jara mahiti dili tar bar ...

    ReplyDelete
  3. अवेस्था आणि ऋग्वेद यांच्या संबंधातलं आपलं संशोधन निर्विवाद आहे. भारतीय इतिहास संशोधनाला क्रांतिकारी वळण लावणारा संशोधक म्हणून आपलं नाव सर्वांना मान्य करावं लागेल. ते इंग्रजीत पोचलं पाहिजे. - कपिल पाटील

    http://kapilpatilmumbai.blogspot.in/

    ReplyDelete
  4. It is possible especially since kurus are related to Kurosh (cyrus the great). Kuru dynasty in northen india is supposed to be related to Kurosh (there were many kings with the same name around 600 bc in Persia). Vedic period is supposed to be just before kuru dynasty period.

    My own thesis vedic people were split from Avestans because of religious differences and really north west people.

    Arjun's obsession with varnasankara speaks directly about him being worried about diluting his iranian blood by marrying locals signifying that during his period one can identify a kuru vs a local based on varna.

    ReplyDelete
  5. Can you please read following text and compare with existing theories?

    www.indianembassy-tehran.ir/india-iran_historica_links.php

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...