Sunday, April 13, 2014

शैव धर्म

भारतात सिंधुकालापासून अव्याहत वाहत राहिलेली धर्मधारा म्हणजे शैवप्रधान धर्मधारा. ही प्रतिमापूजक, तांत्रिक, यातुमय आणि विशेष कर्मकांडे नसलेली धर्मधारा. पूजा हेच काय ते महत्वाचे कर्मकांड. सिंधू संस्कृतीतील उत्खननांत अगदी आपण आज पुजतो तशीच शिवलिंगे सापडलेली आहेत. अनेक शक्तीप्रतिमा स्वतंत्रपणे मिळालेल्या असून त्यांना लागलेल्या काजळीच्या अवशेषांमुळे दीप-धूप त्यांना दाखवला जात असला पाहिजे असा पुरातत्ववेत्त्यांचा कयास आहे. मृद्भांड्यांवरील अनेक प्रतिमांमुळे तांत्रिक प्रथांचाही निर्देश होतो. सनपूर्व ७०० पसून पहिल्या शतकापर्यंत मिळालेल्या बव्हंशी नाण्यांवरील तांत्रिक प्रतिमांची चर्चा आपण एका स्वतंत्र लेखात केलेलीच आहे.

इसपू १००० च्या आसपास भारतात वैदिक धर्माचा उदय झाला. ही भारतीय धर्मेतिहासातील मध्यकालीन घटना होय. या धर्माचे कर्मकांड हे यज्ञविधींशी निगडित होते. या धर्माचा भूगोल सुरुवातीला सरस्वती नदीच्या खो-यापुरता सिमित होता...पुढे तो गंगेच्या खो-यापर्यंत विस्तारल्याचे ऋग्वेदावरुनच दिसते. शैवप्रधान धर्माचा भुगोल मात्र भारतव्यापी होता हे या धर्माच्या व्यापक आणि सर्वकश स्वरुपावरुन दिसून येते. म्हणजे वैदिक धर्माच्या उदयानंतर वैदिक धर्मधारा शैव तन्त्रधारेला समांतर झाली असली तरी ती छोटी होती. त्यामुळेच कि काय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी म्हणतात, "वैदिक धर्माचा उदय ही मध्योद्गत घटना असून आजच्या हिंदू धर्मावर तिचा विशेष प्रभाव नाही." (वैदिक संस्कृतीचा इतिहास.)

शैवप्रधान धर्मात. म्हनजेच मुर्तीपुजकांच्या धर्मात विशेष कर्मकांडेच नसल्याने तो नेहमीच साधा सोपा आणि  आचरण्यास सुलभ होता हेही त्याच्या आजतागायत टिकून राहण्यामागचे रहस्य आहे. पण याच वैशिष्ट्यांमुळे त्यात विविध तत्वज्ञानात्मक वैचारिक धाराही निर्माण झाल्या. सांख्य, वैशेषिक ई. तत्वज्ञाने एकीकडे तर आगमिक तंत्रशास्त्रे, योग दुसरीकडे असा बहुमुख विकास शैव धर्मात होत राहिला. पारमार्थिक सत्तेपेक्षा विधिविधानाला तंत्रशास्त्रांनी बळ पुरवले व त्यातुनच शेतीशास्त्र, धातुशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, गर्भशास्त्र आणि औषधशास्त्राचा उदय आणि विकासही झाला. (मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती- डा. सुधाकर देशमुख) तंत्राचा उगम शिवापासून झाला असे आगमिक शास्त्र मानते तर योगाचा आरंभ आदिनाथ शिवापासून झाला असे योगशास्त्र मानते. पुढे पांचरात्र संप्रदायही तंत्र आणि योगातून निर्माण झाला.

ज्ञात इतिहासात भारतावर वैदिक धर्माचा प्रभाव इसपू सहाव्या शतकात प्रबळ झालेला दिसतो. परंतू त्याला प्रतिक्रिया म्हणून जैन व बौद्ध धर्म उदयाला आले आणि वैदिक धर्म मागे फेकला गेला. शैवप्रधान धर्म हा व्यक्तिगत आचरणधर्म असल्याने त्याचा प्रवाह अव्याहत वाहत राहिला. हजारोंनी तंत्रशास्त्रे लिहिली जात राहिली. तंत्रांतही कौलाचार, वामाचार ई. अनेक भेद पडून शाखा निर्माण होत राहिल्या. बृहद्रथाच्या खुनानंतर सत्तेवर आलेल्या श्रुंगांनी त्यांच्या राज्यात वैदिक धर्माचे पुनरुत्थान करण्याचा अल्पजीवी प्रयत्न केला असला तरी जशा परकीय सत्ता भारतात आल्या त्यांनी मात्र शैव धर्मालाच आपल्या नाण्यांवर व शिलालेखांतही स्थान दिले. इसपू ३०० ते सन २०० पर्यंतच्या पाचशे वर्षांच्या कालात नाण्यांवर शिव, शक्ती, तंत्रोक्त प्रतिमा व प्राणी यांचे व ग्रीक/झोरोस्तरीयन देवतांचेच संपुर्ण वर्चस्व दिसते. सातवाहनांचा नाणेघाट शिलालेख सोडला तर इंद्र-वरुणादी देवतांचे साधे उल्लेखही कोठे सापडत नाहीत.

याचा अर्थ हाच कि वैदिक धर्म खूप मागे पडला व शैव धर्म अन्य बौध-जनांदींबरोबर प्रबळपणे वाहत राहिला. वैदिक धर्माला बरे दिवस पहायला मिळाले ते गुप्त काळात. या काळात वैदिक धर्माने सोयीने आपल्यातही बदल करुन घेतले. शैव आणि बौद्ध धर्माला तोंड देण्यासाठी विष्णू या देवतेला पुढे आनले गेले व वैदिक धर्मात जरी पुजेला स्थान नसले तरी विष्णूपूजा सुरु केली. असे असले तरी देशभर जो सांस्कृतिक संघर्ष निर्माण झाला त्यामुळे वैष्णव पंथ जरी स्थिरावला तरी त्यांना "हरी-हर" ऐक्याची महती गात शिवाचे स्थान बदलवता आले नाही.

उलट तोवर तंत्रांनी भारतातील सर्वच धर्मात प्रवेश केला. बौद्ध धर्मही त्याला अपवाद राहिला नाही. प्रत्येक धर्माने आपापल्या पद्धतीने तंत्रे निर्माण करत तंत्र देवता बदलल्या असल्या तरी शैव-शाक्त मुळगाभा मात्र कायमच राहिला. वैदिकांनी गुप्त काळात वैदिक वर्णाश्रम व्यवस्थेचे जे गारुड निर्माण केले होते ते तंत्रमार्गामुळे पुन्हा मागे पडले. त्यात नाथ-सिद्ध ई. शैव विचारधारांनी समतेची मुळ नांव पुन्हा मार्गावर आणली.

पण मी "जातीसंस्थेचा इतिहास" या लेखमालिकेत स्पष्ट केल्याप्रमाने दहाव्या शतकानंतर भारतातील सर्वच परिस्थिती अत्यंत विपरित झाली. लागोपाठ पडनारे भिषण दु:ष्काळ आणि सातत्याने होणारी परकीय इस्लामी आक्रमणे यामुळे समाजजीवन, एकुणातील अर्थव्यवस्था ढासळून पडायला सुरुवात झाली. मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती या ग्रंथात डा. सुधाकर देशमुख पृष्ठ-२८२ वर म्हणतात कि,

"समाज जेव्हा जेव्हा स्वत:ला असुरक्षित असल्याचे अनुभवतो, तेव्हा तेव्हा तो मूलतत्ववादाकडे वळतो. दहाव्या शतकानंतर जवळजवळ १४ व्या, १५ व्या शतकापर्यंत भारतात वैदिक धर्मीयांनी पुन्हा एकदा आपला धर्म शुद्ध रहावा म्हणून वर्णाश्रमधर्म, यज्ञविधी आणि कर्मकांड यांचे तसेच वैदिक श्रुती आणि स्मृती यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. ...... वैदिक स्मृतींवर अनेकांनी टीका लिहिल्या, त्यांना निबंध म्हणतात आणि या काळाला निबंधकाळ म्हणतात.....या निबंधकारांनी मूलतत्ववादाकडे प्रवास केल्याने तंत्र आणि नाथपंथ यांच्यामुळे जी स्वातंत्र्य आणि समतेची झुळूक जाणवत होती, तीही लुप्त झाली."

वरील विधान पुरेसे बोलके आहे. शैव धर्म हा मुळात समतेचा धर्म. या काळात शैवधर्माला लोकाश्रय आणि स्थानिक सत्तांचा आश्रय असला तरी अपरार्क, विज्ञानेश्वर, हेमाद्री हे त्या काळातील दक्षीणेतील प्रमूख वैदिकवादी सिद्धांतक. एकुणातील सामाजिक परिस्थितीमुळे व सामाजिक नैराश्यजनक स्थितीमुळे वैदिक वर्णव्यवस्थेतील उतरंड, व्रत-वैकल्ये लोक स्विकारत गेले. त्यातून जातीभेदाचा पुर्वी नसलेला भस्मासूर जन्माला आला आणि शैवोक्त समतेच्या मुलतत्वांना हरताळ फासला गेला. नंतरची भक्ती चळवळही जनमानस बदलू शकली नाहे कारण मुळात जे वैदिक वर्णीय तत्वच मुळात नाकारायला पाहिजे होते ते नाकारले गेले नाही. ते नाकारण्यासाठी वैदिक धर्माचे पृथक आस्तित्व लक्षात घेत वैदिक धर्मतत्वांनाच नाकारण्याची बंडखोरी बसवेश्वरांचा अपवाद वगळता कोणीही केली नाही.

आजही लोकाचरणातील धर्म हा शैवप्रधान आहे. तंत्रोक्तच आहे. योगप्रधानच आहे. समतेचा आद्य आक्रोश आहे. परंतू वैदिक वर्णीय व वेदमाहात्म्याच्या मानसिक प्राबल्यकारी ठिगळांमुळे समतेचे मुलतत्व मात्र अवैदिकांच्या मनातून हद्दपार झाले आहे.

स्वत:चा धर्म त्यासाठीच समजावून घेणे आवश्यक आहे.



4 comments:

  1. शैव संप्रदाय.........

    शिवदेवतेला एकमेव उपास्य दैवत मानणारे संप्रदाय. त्यांचे तत्त्वज्ञान ⇨ बादरायणा च्या ⇨ बह्मसूत्रां पूर्वी निर्माण झाले होते, असे बह्मसूत्रे व त्यांवरील शांकरभाष्या वरुन सिद्घ होते. इ. स.चे दुसरे शतक हा बादरायणाचा काळ असावा, असे मानले जाते. विजयानगर सामाज्याचे प्रधान मंत्री ⇨ माधवाचार्य (सु.१२९६-१३८६) ह्यांनी आपल्या सर्वदर्शनसंगहा त ल(न)कुलीश पाशुपत दर्शन,शैव दर्शन, प्रत्यभिज्ञादर्शन, रसेश्वरदर्शन अशा चार शैव संप्रदायांचे विवेचन केलेले आहे. ह्यांखेरीज ⇨कापालिक, कालामुख, हरिहर, मार्तंड-भैरव, अर्ध-नारीश्वर आणि ⇨नाथ संप्रदाय, ⇨वीरशैव संप्रदाय असे अन्य काही शैव संप्रदायही आहेत. हे संप्रदाय आपल्या शैव तत्त्वज्ञानावर वा दर्शनांवर आधारित आहेत.

    पाशुपत दर्शनाचा प्रवर्तक नकुलीश (पर्यायी नाव लकुलीश) हाहोय. गुजरातमधील भडोचजवळील कारवान ह्या गावी विश्वराजनामक एका अत्रिगोत्री अग्निहोत्र्याच्या घराण्यात त्याचा जन्म झाला. नकुलीशाच्या काळाबद्दल मतभेद आहेत. ⇨ रा. गो. भांडारकर ह्यांच्या मते तो इ. स. पू. दुसऱ्या शतकात होऊन गेला, तर डॉ. ⇨ देवदत्त भांडारकर ह्यांच्या मतानुसार तो इ. स.च्या दुसऱ्या शतकात होऊन गेला. बहुतेक विद्वानांचा कल त्याचा काळ इ. स.चे दुसरे शतक मानण्याकडे आहे. पशुपती हे शिवाचे अभिधान आहे. पशू म्हणजे बद्घ झालेले जीव आणि त्यांचा पती म्हणजे त्यांचा निर्माता व रक्षणकर्ता. पशू (कार्य), पती (कारण), दु:खान्त, योग आणि विधी अशा पाच पदार्थांचे पाशुपतशास्त्र आहे. पशू म्हणजे जग, पती म्हणजे ईश्वर, दु:खान्ताचे प्रकार दोन: अनात्मक व सात्मक. अनात्मक दु:खान्त म्हणजे सर्व दु:खांचा नि:शेष उच्छेद. सात्मक दु:खान्तात ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती, ह्या दोन शक्तींच्या स्वरुपाचे ऐश्वर्य प्राप्त होते. दु:खान्त म्हणजे अद्वैतवाद्यांचा मोक्ष नव्हे. मोक्षावस्थेत जीव महेश्वराच्या वा शिवाच्या जवळ, पण स्वतःचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व राखून असतो. योग म्हणजे आत्मा आणि ईश्वर ह्यांच्या संबंधास कारण होणाऱ्या गोष्टी. उदा., जप, ध्यान, शिवावर पूर्ण निष्ठा. विधीमध्ये निरनिराळी वते आणि नियम अंतर्भूत आहेत. पाशुपत संप्रदायाची काही वैशिष्टये अशी : (१) त्यात कैलास ह्या पौराणिक कल्पनेला स्थान नाही. (२) कितीही तपश्चर्या वा सत्कर्मे केली, तरी ईश्वरी अनुगहाशिवाय दु:खान्त वा मोक्ष प्राप्त होत नाही. (३) पुनर्जन्माबद्दल पाशुपत दर्शन स्पष्ट असे काही म्हणत नाही. (४) सगुण वा निर्गुण उपासना पद्घतींचाही निर्देश हे दर्शन करीत नाही. (५) ॐकार जपावर भर. (६) वेदान्त मताचा किंवा जैन-बौद्घ मतांचा उल्लेख नाही. ह्या संपदायाचा प्रसार भारतात अनेक ठिकाणी झाला. उदा., बिहार, ओरिसा, केरळ. भारताबाहेर नेपाळमधील पशुपतिनाथाचे मंदिर प्राचीन आहे. [→ पाशुपत पंथ ].

    शैव दर्शन मुख्यतः दक्षिण भारतात प्रचलित आहे. येथे पती, पशू आणि पाश असे तीनच पदार्थ मानले आहेत. पती म्हणजे शिव वा ईश्वर. ईश्वराचे अस्तित्व अनुमानाने सिद्घ करता येते. आपण जे जग अनुभवतो, ते कार्य (परिणाम) आहे; आणि ते कार्य असल्यामुळे कोणा बुद्घिमान व्यक्तीने ते निर्माण केले आहे, असे अनुमान होते आणियावरुन अनुमानाच्या द्वारा परमेश्वराच्या अस्तित्वाची सिद्घी उपपन्न ठरते. कर्तृत्वासाठी शरीर आवश्यक आहे असे मानले, तरी ईश्वराचे शरीर शक्तिरुप अशा पाच मंत्रांनी बनलेले आहे. ते आपल्यासारखे नाही. मल, कर्म इ. पाशांच्या समूहाने हे ईश्वरशरीरव्याप्त नसते. ईश्वराचे शरीर ज्या मंत्रांनी बनलेले असते ते पाच मंत्र असे : (१) ईशान- हा मंत्र ईश्वराचे मस्तक होय. (२) तत्पुरुष-हे ईश्वराचे मुख. (३) अघोर-हा मंत्रईश्वराचे हृदय होय. (४) वामदेव-हेईश्वराचे गुह्यस्थान आणि (५)सद्योजात-मंत्र म्हणजे ईश्वराचे पाय. हे शरीर ईश्वराच्या स्वेच्छेने निर्मित झालेलेआहे. ह्या शक्तींपासून निष्पन्न झालेले ईश्वराचे शरीर अनुकमे अनुग्रह करणे, तिरोधान पावणे, सृष्टीचा संहार करणे, स्थिती राखणे आणि उत्पत्ती करणे ह्या पाच कृत्यांना कारणीभूत होत असते.

    पुढे चालू.....

    ReplyDelete
  2. पशू वा जीवात्मे अनेक आहेत. ते नित्य, विभू (सर्वव्यापी), कर्ता व भोक्ता ह्या स्वरुपाचे आहेत. दृक् व क्रिया ह्या दोन प्रकारच्याचैतन्याने युक्त होणारे असे ते आहेत. विविध पाशांचे जाल जेव्हा दूर होते, तेव्हा उपर्युक्त दृक् आणि क्रिया ह्यांच्या स्वरुपाच्या चैतन्यरुपी शिवत्वाची प्राप्ती होते. पशू हा विज्ञानाकल, प्रलयाकल आणि सकल अशा तीन प्रकारचा आहे. विज्ञान, योग आणि संन्यास ह्यांच्या द्वारा किंवा कर्मफलाचा भोग केल्यामुळे कर्मांचा क्षय होऊन जीव हा केवळ मलरुपी पाशाने युक्त राहतो. हा जीवात्मा विज्ञानाकल होय. प्रलयकाली इतर पाश अस्तित्वात नसल्यामुळे जो मल आणि कर्म ह्यांनी युक्त असतो, तो पशू प्रलयाकल होय. ह्या दोन प्रकारांव्यतिरिक्त इतर सर्व जीव सकल ह्या प्रकारातले होत. हे मल, माया आणि कर्म अशा तिन्ही प्रकारच्या पाशांनी युक्त असतात. जीवांच्या ह्या ज्या वेगवेगळ्या अवस्था असतात, त्यांच्या अनुरोधाने परमेश्वर त्यांना वेगवेगळी स्थाने अर्पण करतो. उदा., कोणी विद्येश्वर, कोणी मंत्रेश्वर इत्यादी.

    पाश हे चार प्रकारचे : मल, कर्म, माया आणि रोधशक्ती. मल हा दृक्‌शक्ती (ज्ञानशक्ती) आणि क्रियाशक्ती ह्यांना झाकून टाकतो. तांब्यावर चढणाऱ्या काळ्या पुटाप्रमाणे तो आहे. माया ही मूलप्रकृती. प्रलयकाली सर्व जग तिच्यात विलीन होते आणि सृष्टीच्या वेळी तिच्यातून अभिव्यक्त होते. रोधशक्ती ही शिवशक्ती आहे. ती पाशांमध्ये अधिष्ठित होऊन आत्म्याला झाकते म्हणून औपचारिक अर्थाने तिला पाश म्हटले आहे. बिंदू हा पाचवा पाश कोणीकोणी स्वीकारतात; परंतु तो पाश असताही विद्येश्वरपदाची प्राप्ती वा अपर मुक्तीचा लाभ संभवत असल्यामुळे खृया अर्थाने पाश म्हणून त्याची गणना होत नाही. बिंदूला शिवतत्त्व असे दुसरे नाव देण्यात आले आहे.

    प्रत्यभिज्ञादर्शन हे इ. स.च्या नवव्या शतकात काश्मीरमध्ये उदयास आले. शैव संप्रदायाची ही अद्वैतवादी शाखा होय. शैव तंत्रागमाचा अनुयायी वसुगुप्त (इ. स. ८२५) ह्याने शैवमताला अद्वैतवादी स्वरुप दिले. पुढे ह्या शाखेत काही मतभेद झाल्यामुळे सोमानंदनाथ (इ. स. ८५०) ह्याने ह्या पंथाची दुसरी शाखा प्रवृत्त केली. प्रत्यभिज्ञा म्हणजे स्वतःच्या स्वरुपाची पुन्हा होणारी ओळख. महेश्वराची प्रत्यभिज्ञा म्हणजे त्याच्याकडे (प्रति) अभिमुख झाल्याने (अभि) होणारे ज्ञान (ज्ञा). अगोदरच ज्ञात असलेल्या वस्तूला समोर आलेली पाहून प्रतिसंधानाने होणारे ज्ञान म्हणजे प्रत्यभिज्ञा. प्रस्तुत संबंधातही प्रसिद्घ पुराणे, सिद्घ आगमग्रंथ, अनुमान इत्यादींच्या द्वारा, परमेश्वराच्या ठायी परिपूर्ण शक्ती आहे असे ज्ञान अगोदरच झालेले असते, जेव्हा स्वतःचा आत्मा त्या परमेश्वराला अभिमुख होतो, तेव्हा त्या शक्तीची स्वतःत ओळख पटून ‘ मी खरोखर तोच ईश्वर आहे ’ हे ज्ञान उत्पन्न होते. हीच प्रत्यभिज्ञा. पण जीवच जर परमेश्वर असेल, तर प्रत्यभिज्ञेच्या प्रदर्शनाचा खटाटोप कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्याला उत्तर असे, की स्वयंप्रकाशित असल्यामुळे आत्मा सतत प्रकाशमान होत असला, तरी मायेच्या प्रभावामुळे तो अंशतःच प्रकाशमान होतो. तो पूर्णपणे प्रकाशमान होण्यासाठी दृक्‌शक्ती व क्रियाशक्ती ह्यांच्या आविष्काराद्वारा प्रत्यभिज्ञा प्रकट केली जाते. हे दर्शन असेही मानते, की ईश्वराच्या केवळ इच्छेवर जगाची निर्मिती अवलंबून आहे. ही निर्मिती म्हणजे शिवशक्तिरुप परमशिवाने पदार्थ आरशातल्या प्रमाणे स्वतःत प्रतिबिंबरुपाने अवभासित करणे. हा संप्रदाय काश्मीर शैव संप्रदाय म्हणूनही ओळखला जातो. [→काश्मीर शैव संप्रदाय].

    पुढे चालू.....

    ReplyDelete
  3. रसेश्वरदर्शन हे शेवटचे शैव दर्शन मानले जाते. ह्या दर्शनात ‘ रस ’ ह्या शब्दाचा अर्थ पारा. पाऱ्यावर करावयाच्या वेगवेगळ्या प्रकियांच्या द्वारा होणाऱ्या दिव्यदेहप्राप्तीवर येथे भर दिला आहे. पारा किंवा पारद जीवाला संसाराच्या पलीकडच्या तीरावर नेऊन पोहोचवितो. संसाराच्या पलीकडचा पार तो देतो म्हणून तो पारद. शरीराला स्थिरता प्राप्त झाली, तर जीवन्मुक्ती प्राप्त होईल आणि ही स्थिरता देण्याचा उपाय पारा वा पारद हा होय. जीव जीवन्मुक्त झाला, तरच तो ईश्वरस्वरुप होऊ शकतो. ह्या दर्शनानुसार जीवन्मुक्ती म्हणजे अजरामर होणे. जरा, व्याधी, मृत्यू यांपासून देह मुक्त हवा. त्यासाठी पारदाचा उपयोग आवश्यक आहे. पारदाप्रमाणेच अभकही महत्त्वाचे. पारद महेश्वराच्या बीजापासून निष्पन्न होतो, तर अभक हे गौरीच्या बीजापासून निष्पन्न होते. ह्या दोहोंच्या योग्य उपयोगाने दिव्यदेह प्राप्त होतो. पाण्याच्या सिद्घीचा विधी करताना त्यावर स्वेदन, मर्दन, मूर्च्छन, स्थापन, पातन इ. अठरा प्रकारचे संस्कार करणे आवश्यक असते. त्यामुळे विविध सिद्घी पाप्त होतात. रसाचे बह्माशी साम्य आहे; रस म्हणजेच परबह्म असेही ह्या दर्शनात मानले आहे.

    वीरशैव पंथाच्या नावातील वीर ह्या शब्दाचा अर्थ निर्धाराने परमार्थ-प्रवण राहून ईश्वरभक्ती करणारा. मबसवेश्वर (११३१ - ६७) ह्यांनी ह्या पंथाची स्थापना केली, असे काही विद्वान मानत असले, तरी बसवेश्वरांचा जीवनवृत्तांत सांगणाऱ्या ⇨बसवपुराणा वरुन तसे दिसत नाही. वीरशैव हे आपली परंपरा बसवाचार्यांच्या पूर्वीची असल्याचे मानतात. वर्णव्यवस्था, जातिभेद, कर्मकांडांचे स्तोम, हिंसाचार ह्यांना वीरशैवांनी प्रखर विरोध केला. शिवभक्ती, आध्यात्मिकता, सामाजिक समानता ह्यांचा त्यांनी पुरस्कार केला.

    ह्या पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार विश्व हे शिवाचे दृश्य रुप आहे. शिव हा आपल्या शक्तीद्वारे हे विश्व निर्माण करतो आणि यथाकाल त्याचा लयही आपल्या ठायी घडवून आणतो. शिवाच्या ठायी सर्व प्रकारच्या सूक्ष्म चिद्शक्ती आहेत, तर जीवाच्या ठायी स्थूल स्वरुपाच्या चिद्शक्ती आहेत. शिव सर्वज्ञ, तर जीव अल्पज्ञ. तरीही शिव आणि जीव ह्यांच्यांत अद्वैत आहे, असे हे तत्त्वज्ञान सांगते आणि ते ‘ शक्तिविशिष्टाद्वैत ’ ह्या नावाने ओळखले जाते. लिंग म्हणजे परमतत्त्व, शाश्वत बह्म. लिंगाच्या वरील भागास शिव, तर खालील पीठाला म्हणजे भागाला शाळुंकाशक्ती असे म्हटले जाते. शिवाशी ऐक्य पावण्यासाठी आध्यात्मिक प्रगतीच्या सहा पायऱ्या पार कराव्या लागतात. त्यासाठी करावयाच्या साधनेस षट्स्थल साधना असे म्हणतात. ह्या साधनेने वीरशैव व्यक्तीस एकाच जन्मात मुक्ती मिळते. [→ वीरशैव पंथ ].

    अन्य काही शैव संप्रदायांपैकी कापालिक हा पंथ पाशुपत संप्रदायापैकी आहे. तंत्रमार्गावर त्याचा भर आहे. माणसाची कवटी ते जवळ बाळगतात व तीतूनच अन्न, मद्य-मांस इत्यादींचे सेवन करतात म्हणून ते कापालिक. शिवाच्या पौराणिक वर्णनाप्रमाणे ते स्मशानवास, चिताभस्माचे लेपन, खट्‌वांगधारण इ. गोष्टी करत असल्याचे कूर्मा दी पुराणांत सांगितले आहे. कापालिकांत पंचमकारात्मक तंत्रसाधना, नरबळी इत्यादींचे प्रस्थ खूप माजल्यामुळे तो पंथ घृणास्पद ठरला. ह्या पंथाचे आकारग्रंथ किंवा प्रकरणग्रंथ फारसे उपलब्ध नाहीत; तथापि बृहत्संहिता, कथासरित्सागर, गाथासप्तशती, शांकरदिग्विजय व पुराणग्रंथ तसेच मालतीमाधव, प्रबोधचंद्रोदय इ. नाटके यांतून त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती मिळते.

    पुढे चालू.....

    ReplyDelete
  4. कालामुख ही पाशुपत संप्रदायाचीच आज लुप्तप्राय झालेली शाखा आहे. हे कपाळावर काळ्या रंगाचा आडवा पट्टा लावतात, म्हणून त्यांना ‘ कालामुख’ म्हणत असावेत. अकराव्या-तेराव्या शतकांत मुख्यतः कर्नाटकात व आंध प्रदेशात हा संप्रदाय होता, असे दिसते. शक्तिपरिषद व सिंहपरिषद असे ह्या संप्रदायाचे दोन उपपंथ होते. ह्या संप्रदायाचे संस्थापक-प्रचारक काश्मीरी बाह्मण असावेत, असे काही शिलालेखांवरुन दिसते. हे वर्णभेद न करता सर्वांना ज्ञानदान करीत. ह्या पंथांच्या आचार्यांची विद्वत्ता, आचरण ह्यांमुळे त्यांच्याबद्दल लोकांत आदराची भावना होती. काहींच्या मते हा संप्रदाय म्हणजे वीरशैव पंथाचे पूर्वरुप होय. कालामुख आणि वीरशैव पंथ ह्यांच्यांत काही लक्षणीय समान वैशिष्टये आढळतातही. कालामुखांची मुख्य देवालये, मठ वीरशैवांच्या ताब्यात आहेत. वीरशैव त्यांना पुण्यक्षेत्रे मानतात. ह्या दोन्ही पंथांत लिंगपूजेवर भर आहे. वीरशैव धर्मगुरु आणि कालामुख धर्मगुरु ह्यांना ‘ जंगम ’ असे समान नाव आहे. कालामुख संप्रदायाची तात्त्विक भूमिका स्पष्ट होण्यासारखी साधने फारशी उपलब्ध नाहीत.

    हरिहर संप्रदायाची दृष्टी शिव आणि विष्णू ह्यांच्या उपासनांत समन्वय साधण्याची आहे. हरिहराच्या मूर्तीत उजवा भाग शिवाचा, तर डावा भाग विष्णूचा असतो. हरिहराची मंदिरे महाराष्ट्रात आढळतात; तसेच गुजरातेतील वीसनगरला हरिहराचे एक मंदिर असून त्यात काळ्या पाषाणाची सुंदर मूर्ती आहे. आंधमधील तिरुपतीच्या मूर्तीला तमिळी शैव संतकवी हरिहराचे प्रतीक मानतात. हरिहराच्या मूर्ती भारताबाहेर जावा, कांपुचिया येथेही आढळतात. इ. स.च्या पहिल्या शतकापासून ह्या संप्रदायाचा प्रारंभ झाला असावा.

    मार्तंड-भैरव ह्या संप्रदायात शिव व सूर्य ह्या देवतांचे एकत्व मानले आहे. मार्तंड-भैरवांच्या मूर्ती ह्या मुख्यतः ओरिसा आणि बंगाल येथे आढळतात.

    अर्धनारीश्वर हाही एक शैव संप्रदाय होय. अर्धनारीश्वराचे वर्णन मत्स्य-पुराणा त तसेच समरांगणसूत्रधार, अपराजितपृच्छा वगैरेंत आढळते. ह्या मूर्तीचा उजवीकडचा अर्धा भाग शिवाचा आणि डावा भाग उमेचा असतो. महाराष्ट्र (घारापुरी, वेरुळ), राजस्थान, बंगाल, ओरिसा, उत्तर प्रदेश (मथुरा), कर्नाटक (बादामी) इ. ठिकाणच्या मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हा संप्रदाय पूर्वी भारतात अनेक ठिकाणी होता, असे दिसते. ह्या संप्रदायाचे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल काही सांगता येत नाही.

    नाथपंथ वा नाथ संप्रदाय हा शैव संप्रदायातील एक योगप्रधान संप्रदाय असून ह्याचा उगम (सु. आठवे ते बारावे शतक) आदिनाथ परमेश्वर शिव ह्याच्यापासून झाला, अशी ह्याच्या अनुयायांची समजूत आहे. योगमार्गाने सिद्घावस्था प्राप्त करणे, हे ह्या पंथाचे ध्येय होय. ⇨ मच्छिंद्रनाथ हे ह्या संप्रदायाचे पहिले मानवी गुरु. गोरखनाथांनी ह्या संप्रदायाला नावारुपाला आणले. ह्या संप्रदायाचा उगम कोठे झाला, ह्याबद्दल मतभेद आहेत. ह्या संप्रदायाच्या तत्त्वज्ञानाचे विस्तृत विवेचन उपर्युक्त नाथ संप्रदाय ह्या विश्वकोशीय नोंदीत आढळेल; तथापि शिव हेच अंतिम सत्य असून तोच पिंड बह्मांडाचा आधार होय, ही ह्या संप्रदायाची भूमिका आहे. नाथांचे नवनाथ कोण ह्याविषयी अभ्यासकांत ऐकमत्य नाही. नाथपंथीयांना सिद्घी प्राप्त असून ते अनेक प्रकारचे चमत्कार घडवून आणू शकतात, अशी समजूत आहे. भारतात आणि महाराष्ट्रात ह्या पंथाला महत्त्वपूर्ण स्थान आहे ⇨ ज्ञानेश्वर हे नाथपंथाशी संबद्घ होते. ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदायाची शिकवण त्यांचे वडील बंधू ⇨ निवृत्तिनाथ ह्यांच्याकडून मिळाली होती. त्यामुळे वारकरी संप्रदायाशी नाथपंथाचा संबंध आला. भारतातील वेगवेगळ्या धर्मपंथांशी नाथपंथाचा कोणत्या तरी स्वरुपात संबंध आलेला दिसतो. [→ नाथ संप्रदाय ].

    समाप्त.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...