Sunday, May 22, 2011

वाघ्या...पुन्हा...

वाघ्याचा विषय निघाल्यानंतर मी लिहिले. त्याला इतिहासाची डुब होती....ती माणसांच्या. माणसांचा इतिहास हा बव्हंशी क्रुतघ्नतेने भरला आहे हे आपण अनुभवतोच. प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या पातळीवर क्रुतघ्न असतेच. अपवाद असतो...पण अपवादांनीच नियम सिद्ध होत असतात.

शिकारी-मानव पशुपालक झाला ही जागतीक इतिहासाला मिळालेली एक फार मोठी कलाटणी आहे. कुत्रा हा प्राणी तसा शिकारीच...कळप करून झूडीने शिकारी करणारा. पण पशूपालक मानवाने या प्राण्याला सर्वात आधी माणसाळवले. कुत्राला माणसाळवणे आणि त्याला आपल्या जीवनाचा नुसता रक्षक नव्हे तर त्याला देवत्व देणे हा मानवी क्रुतद्न्यतेचा एक महत्वाचा टप्पा आहे. महराष्ट्रातील पशुपालक धनगर-क्रुरुब समाजाने कुत्र्याला असेच देवत्व दिले. त्याची पुजा बांधली. आपल्याच आराध्य अशा पुर्वज-दैवत खंडोबाशी त्याची अखंड नाळ जुळवली. त्याला आपल्या भावविश्वात अनन्य साधारण असे स्थान दिले. धनी गावी जातोय असे दिसले कि मागोमाग मैलोंमैल धावणा-या प्रेमळ कुत्र्यांच्या कथा कमी नाहीत. धनी संकटात सापडला कि जीवाच्या बाजी लावणा-या कुत्रांच्या कथा कमी नाहीत. जीव देणारे कुत्रेही कमी नाहीत. मी वरुडे गावात मालक सर्पदंशाने मेला तेंव्हा कुत्राने अन्नत्याग करून जीव दिल्याचे प्रत्यक्ष उदाहरण मी पाहिले आहे.

शिवाजी महाराजांनी कुत्रा पाळला याचे पुरावे नाहीत म्हणुन वाघ्या ही फक्त एक दंतकथा घ्यावी असे म्हणणे समजावून घेउयात. मुख्यत: माणसांचाच इतिहास हा पुरेसा लिहिला गेला नाही तर मुक्या प्राण्यांचा कोण लिहिणार? तानाजीच्या घोरपडीला कोणत्या इतिहासाचा आधार आहे? पण ती जनमानसातील एक श्रद्धा आहे आणि ती वेगळ्या अर्थाने घ्यावी लागते. ती जनसामान्यांच्या प्रतिभेचे एक आविश्करण म्हणुन पहावी लागते. कवि भुषण त्याच्या शिवकाव्यात अति-आलंकारिक लिहितो त्याला आपण इतिहास मानत नाही. पण म्हणुन आपण कवि भुषण हा अनैतिहासिक लिहिणारा कवि म्हणुन नाकारतही नाही. हा आपल्या मानव जातीचा दांभिकपना नव्हे काय?

पण येथेच थांबता येत नाही. वाघ्या होता कि नव्हता हा प्रश्न महत्वाचा नसून त्याच्या स्मारकाचा वाद का हा प्रश्न निर्माण होतो कारण जनमानसातील प्रांजळ भावना आणि दंतकथा यातील आंतरसंबंध समजावुन न घेता इतिहासात नाही ते तोडुन टाका या विध्वंसक प्रेरणा यामागे आहेत असे दिसते.

शिव-स्मारक व वाघ्याचे स्मारक तुकोजीराव होळकर यांच्या देणगीतुन झाले हे मी आधीच्या लेखात लिहिलेच आहे. गडकरींच्या राजसंन्यास या नाटकातील अचाट कल्पकतेतुन वाघ्या साकारला हे मत मान्य केले तरी त्याला दंतकथेचा आधार होताच. कोणताही लेखक कल्पनेने काहीही फुलवू शकतो...पण त्याला कोठेतरी ऐकिव का असेना माहितीचा अधार असतो. मी राजसंन्यास वाचलेले नाही. पण मला वाघ्याची कथा शिंगाडवाडीच्या धनगरांकडुन लहाणपणी ऐकायला मिळालेली आहे. म्हणजे ती जनमानसात रुजलेली कुत्र्याच्या इमानीपणाची कहानी होती. या धनगरांनी राजसंन्यास वाचले वा पाहिले असल्याची शक्यता नाही.

म्हणजे शिवस्मारक (समाधी) ते कुत्र्याचे स्मारक होळकर या धनगराने करावे आणि तेंव्हा सातारकर आणि कोल्हापुरकर चिडीचूप असावेत आणि आता आयजीच्या जीवावर बायजी उधार या न्यायाने ज्यांचा कसलाच या प्रकरणाशी संबंध नाही त्यांब्नी मात्र कांगावा करावा हे काहीतरी विचित्र आहे.

बरे...तुकोजीराव होळकरांचे शिवराय प्रेमींवर अन्य अनंत उपकार आहेत. श्री, क्रुष्णाजी अर्जुन केळुस्कर यांनी १९०६ साली पहिले गद्य शिवचरित्र सिद्ध केले. पण या प्रकरणात त्यांना रु. २०,०००/- चे कर्ज झाले. हे कर्ज छत्रपतींच्या वारसदारांनी नव्हे तर खुद्द तुकोजी होळकरांनी फेडले...एवढेच नव्हे तर त्याचे अनेक भाषांत भाषांतर करवून घेवुन जवळपास ४५०० प्रती जगभरच्या ग्रंथालयांना पाठवल्या. हे कार्य करणारे मराठा नव्हे तर एक धनगर संस्थनिक होता याचे सोयिस्कर विस्मरण होते आहे.

येथे जातीचा प्रश्न नाही. असूही नये. प्रश्न आहे तो त्या समाजापोटीच्या क्रुतद्न्यतेचा. कुत्र्याच्या समाधीलाही पैसे दिले ते होळकरांनी. ते पैसे घेणारे आणि ते स्मारक बांधणारे अजुन वेगळ्या जातीचे असतील. पण त्यामागे शिवरायांचा अवमान व्हावा असे कोणाला तरी वाटेल काय?

वाघ्याचे स्मारक हटवणे हा अट्टाग्रह जो अचानक उफाळुन आला आहे त्यामागची कारणे आपणास वरील विवेचनात आढळतील. ज्यांनी शिवसमाधी जवळपास १०० वर्ष दुर्लक्षित ठेवली त्यांना याबद्दल बोलायचा मुळात अधिकारच नाही. ज्या धनगर संस्थानिकाने तीची नव-उभारणी केली आणि भले इतिहासात असो कि नसो- शिवरायांचा असो कि नसो-अशा धनगरांच्या प्रिय वाघ्या कुत्राची समाधी बनवली असेल तर ती आहे तशीच रहायला हवी. त्यावर बोट ठेवण्याचा अधिकार या नव-ब्राह्मणांना कोणीही दिलेला नाही. ती सईबाईंची मुळ समाधी होती कि पुतळाबाईंची...यावर वाद घालत रहा...कारण ती मुळ कोणाची हे तुम्हाला सांगता येतच नाही यातच सारे काही आले.

IN ADDTION: UPDATE:


सतीचे व्रुंदावन असते...मंदिरही बनली आहेत. राजस्थानमधील अलीकडचेच उदाहरणही सर्वद्न्यात आहेच. परंतु शिवरायांच्या सती गेलेल्या पुतळाबाईंचे व्रुंदवन वा मंदिर कोठेतरी रायगडावर असायला हवे. दुसरे असे कि समजा आताचा चौथरा हा पुतळाबाई वा सईबाईंचा आहे तर तो त्या पत्नी असल्याने शिवरायांच्या समाधीच्या बाजुला असायला हवा...समोर नव्हे.

पण सईबाईंची समाधी ही पद्मावती माची (राजगड) येथे पद्मावती देवीच्या मंदिरासमोर आहे. म्हणजे शिवस्मारकासमोरील चौथरा सईबाईंचा नाही हे नक्की सांगता येते. पद्मावतीचे मंदिर स्वता: शिवरायांनी बांधुन घेतले होते.

शिवमंदिरात शिवलिंगाच्या समोर नंदी असतो...तसेच येथेही आहे. पत्नीची समाधी असती तर ती बाजुला जोडीने असती.यावरही विचार करावा लागेल.

आणि आताच्या वाघ्याचा म्हनवला जाणारा चोव्थरा हे व्रुंदावन नाही हे तर नक्कि. व्रुंदावन वर निमुळते होत जाते. चौथ-या प्रमाणे नसते. म्हणजे हा चौथरा पुतळाबाईचे स्मारक असू शकणे अत्यंत अवघड आहे. आणि ती सईबाईंची समाधी असणे तर शक्यच नाही कारण ती राजगडावर आहे. जे समोर आहे ते वाघ्याचेच मुळचे स्मारक असले पाहिजे असे आता अधिक तीव्रतेने जाणवू लागले आहे. सत्यशोधन ही टप्प्या-टप्प्याने होणारी बाब आहे. अजून काहीतरी सामोरे येईल.

म्हणजे सईबाईंची समाधी कोठे आहे हे आता आपल्याला माहितच आहे. हा चौथरा आता पुतळाबाईचा आहे कि वाघ्याचा एवढाच प्रश्न उरतो. महाराणी सईबाईंचा म्रुत्यु १६५९ ला झाला. त्यांची समाधी आजही सर्वांना माहित आहे. जनस्मरणात आहे. प्रश्न असा पडतो कि शिव-निधनानंतर (१६८०) सती गेलेल्या पुतळाबाईंचे स्मारक कोणाच्याही स्मरणातून जाणे असंभाव्य आहे. सतीस्थान हे अंधश्रद्धाळु लोकांना जास्त प्रिय असते हे वेगळे सांगायची गरज नाही. त्यामुळे १८१८ ला ब्रिटिशांनी रायगड तोफांचा भडिमार करून उद्ध्वस्त केला असला तरी जनमानसातुन सतीचे स्मारक गेले नसते. पण तसे झालेले दिसत नाही.

पुतळाबाई शिवनिधनानंतर लगोलग सती गेल्या कि नंतर याबद्दल विवाद आहेच. सईबाई आणि सोयराबाई यांचे शिवजीवनात जेही काही स्थान आहे तेवढे अन्य पत्न्यांबद्दल नव्हते हेही आपण इतिहासात पाहू शकतो. पुतळाबाईंना अपत्य नसल्यामुळे त्यांना सती जाण्यास भाग पाडले गेले असल्याचा संशय या निमित्ताने उद्बवतो. तसे असले तरी त्यांचे व्रुंदावन वा मंदिर उभे करणे आवश्यक झाले असते. आणि झाले असते तर ते हिंदु समजुतींनुसार एक पुज्य ठिकाण बनले असते. त्या जागी वाघ्या कुत्र्याचे स्मारक बनणे असंभाव्य होते. सतीस्थानाचे पावित्र्य अगदी ब्राह्मनही बिघडवू शकण्याची धार्मिक शक्यता नाही. त्या काळातील धर्मप्रभावाचे माहात्म्य या संदर्भात तपासुन पहावे. त्यामुळे ब्राह्मणांनी होळकर म्हणा कि मराठ्यांचा अवमान करण्यासाठी पुतळाबाईंच्या चौथ-याठिकाणी कुत्राची समाधी बनवली याची शक्यता दिसत नाही. त्यामुळे असे आरोप अद्न्यानमुलक आहेत असेच आता तरी म्हणावे लागते.

आता प्रश्न उद्भवतो तो हा कि मग पुतळाबाईंचे व्रुंदावन वा स्मारक वा मंदिर गेले कोठे? ते मुळात केले गेले होते कि नाही? त्यासाठी शिवरायांच्या दुर्दैवी म्रुत्युनंतरच्या ज्याही काही वेगवान राजकीय घटना घडल्या त्यांचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे. संभाजीराजे हे जणु काही स्वराज्याचे शत्रू अहेत असेच वातावरण निर्माण करण्यात आले होते आणि त्यांना अटक करण्याचे हुकुम रवाना होते. र्रायगडाचे दरवाजे बंद होते आणि महाराजांचा म्रुत्यु लपवण्यात आला होता. लगोलग झालेल्या सताप्राप्तीच्या संघर्षात पुतळाबाई कोण स्मरणात ठेवणार? त्यात त्या निपुत्रिक...त्यामुळे तत्कालीन राजकारणात काही उपयोगाच्या नाहित असे वाटणे स्वाभाविक. असो. त्यांचे व्रुंदावन वा स्मारक मुळात त्या राजकीय धामधुमीत केले गेले कि नाही हा प्रश्न आहेच आणि केले गेले नसावेच असे वाटावे अशी स्थिती दिसते. कारण तो काळ अतिवेगवान राजकीय घडामोडींचा होता आणि शेवटी कोणाचे वर्चस्व याचा निकाल लावण्यासाठी होता.

मग प्रश्न असा उद्भवतो तो चौथरा कोणाचा? तो सती पुतळाबाईंचा असेल तर त्याची स्म्रुती अल्पावधीत कशी विस्मरणात गेली? तो नेमका कधी बांधला? त्या चौथ-याचे कार्बन डॆटींग करून पहायला काय हरकत आहे? वघ्याचा पुतळा नंतर वसवला हे आपणास माहितच आहे. तत्पुर्वी तो चौथरा कोणाचा हे कोणालाच माहित नव्हते असे म्हनने अनैतिहासिक आहे कारन जनस्म्रुती या अतिरंजित झाल्या तरी इतिहासाचे पदर बव्हंशी असतात. सर्वात महत्वाचे म्हणजे जसे वाघ्या कुत्र्यचे संदर्भ तत्कालीन इतिहासात-बखरींत-पवाड्यांत मिळत नाहीत तसेच पुतळाबाईंच्या स्मारकाचेही मिळत नाहीत. हे स्मारक फक्त शंभुराजांच्च्या नव-कारकिर्दीत शक्य होते...ते केल्याचे उल्लेख शंभुराजांच्या इतिहासातही सापडत नाही. यावर अधिक विचारमंथनाची गरज आहे.

7 comments:

  1. ज्या लोकाना आयुष्यात काही बांधता आलेले नाही त्याना अश्या एतिहासिक वास्तु पाडण्याचा तर दुरच त्याबद्दल बोलायचाही अधिकार नाही.

    ReplyDelete
  2. सोनवणीजी, आपण या ठिकाणी इंद्रजित सावंत यांनी लिहिलेल्या संशोधनपर पुस्तकाचा किंवा त्यांनी मांडलेल्या भूमिकेचा कुठेही उल्लेख केलेला नाही.हे पुस्तक आल्यानंतर वाघ्याशी सम्बंधित वाद तीव्र झाला.

    ReplyDelete
  3. लीलाधरजी, सावंतांनी कसलेही पुरावे दिलेले नाहित...फक्त अंदाज मांडले आहेत आणि अंदाजांवर इतिहास चालत नाही.

    ReplyDelete
  4. वा रे वा जेर् बहुजनांनी अश्या गोष्टी वर लक्ष दिले नाही टेर त्याना महमूर्ख ठरवायच. ..आणि जेर् त्यानी या वर आशेप घेतला तर "त्यावर बोट ठेवण्याचा अधिकार या नव-ब्राह्मणांना कोणीही दिलेला नाही. "
    अस माहणायच. . .कुणाला काही तरी दुखतय. . .

    ReplyDelete
  5. वाघ्या कुत्रा हा वादाचा मुद्दा नाहीच. कोणाला कुत्रा तिथे नकोय. इंद्रजीत सावंत हा काही संशोधक नाहीये. आज पर्यंत झालेल्या लिखाणावर फक्त टिका त्याच्या पुस्तकात असते. संशोधक तो जो नवीन, अज्ञात काही समाजाला शोधून देतो. असे सावंतने आज पर्यंत तरी असे काही केले नाही. सावंत म्हणतो की हे तुकोजी होळकरांना बदनाम करण्यासाठी रचलेली कथा. याला कसे माहीत ??? याने कोणता नवा कागद देशासमोर आणला. केवळ जातीभेद या तत्त्वावर टिका. जी कथा खरी आहे तिच खरी. सावंतने शोध लावावा की समाधीचा जेर्नोधार कोणी केला !

    ReplyDelete
  6. Mr. sonawni you are so woried about waghya dog and trying to express your poor knowledge insted of that why don't you spend energy in studying history for those bloody manuwadis who made man & some caste to live worstly than dog's life....

    ReplyDelete
  7. खूपच अभ्यासपूर्ण लेख. असे वाद निर्माण करणाऱ्यांना दुष्काळ, बेकारी, स्त्री भ्रूण हत्या, लाचखोरी, भ्रष्टाचार, व्यापाऱ्यांची नफेखोरी, शेतकऱ्यांची फसवणूक, स्त्रियांची सामाजिक कुचंबना हे आपले खरे प्रश्न हे कधी कळलंच नाही. दोन वेळचं अन्न विनासायास मिळतं तेव्हा लोकांना असे वाद रंगवण्यात मजा वाटते. बऱ्याचदा केवळ प्रसिद्धीच्या हव्यासा पोटीही लोक असं वादग्रस्त लिखाण करत असतात. लेखन स्वातंत्र्या असलं तरी ऎतिहसिक , पौराणिक पात्रांविषयी काल्पनिक लेखण करताना उपलब्ध ऎतिहसिक , पौराणिक लेखनातले संदर्भ बदलण्याचा अधिकार कोणालाच नाही. किंवा असं काल्पनिक लेखन करताना ते काल्पनिक आहे याला इतिहासाचा अथवा पुरणाचा कोणताही आधार नाही अशी टीप सदर लिखाणात ठळक अक्षरात नमुद करण्याचा कायदा करायला हवा.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...